मुंबई : त्रिपुरात घडलेल्या घटनेचे तीव्र पडसाद आज महाराष्ट्रात उमटले. महाराष्ट्रातील मुस्लिम बहुल शहरांमध्ये काही मुस्लिम संघटनांकडून आज बंद पुकारण्यात आला होता. यामध्ये अमरावती, नांदेड, परभणी, मालेगाव, भिवंडी शहरांचा समावेश आहे. त्रिपुरा घटनेविरोधात काही ठिकाणी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला हिंसक वळण लागले आणि दंगलीची परिस्थिती निर्माण झाली. यावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ट्विटरवरुन आपली प्रतिक्रिया दिली आहे. परिस्थिती नियंत्रणात असून पोलिस प्रशासनाने दक्ष राहावे असे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस महासंचालकांना दिले आहेत.
त्रिपुरात मुस्लीम समाजावर होणाऱ्या अत्याचारांच्या निषेधार्थ आज निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काही ठिकाणी नांदेड, अमरावती, मालेगावमध्ये थोडंसं हिंसक वळण देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे माझी सर्व मुस्लिम समाजाला विनंती आहे की आपण शांतता राखावी. राज्य सरकार पूर्णपणे परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहे. मी स्वतः या संदर्भात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्फत मॉनिटरींग करण्याचं काम करतो आहे. याच्यामध्ये जे दोषी सापडतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. परंतु आज आपण सर्वांनी एक सामाजिक ऐक्य राखणं अतिशय आवश्यक आहे आणि त्या दृष्टीकोनात आपण सर्वांनी सहकार्य करावं अशी माझी विनंती आहे. माझ्या पोलीस बांधवांनाही माझी हीच विनंती आहे ही परिस्थिती आपण संयमाने हाताळावी आणि राज्यात शांतता कशी राहिल यासाठी कार्य करावं, असे वळसे पाटील म्हणाले.
त्रिपुरामध्ये मस्जिद पाडल्याच्या कथित घटनेचा निषेध करण्यासाठी अमरावती मध्ये मुस्लिम बांधवानी आपली दुकाने बंद ठेवली व घटनेचा निषेध केला होता. निषेध करण्यासाठी काढण्यात आलेल्या15 ते 20 हजार लोकांच्या या मोर्चाला हिंसक वळण लागले. यावेळी मोर्चा करांनी जयस्थभ चौकातील व शहरातील विविध भागातील 20 ते 22 दुकानांची प्रचंड तोडफोड केली तसेच एका दुचाकीचीही तोडफोड केली.
त्रिपुरातील कथित घटनेचे पडसाद राज्यातील काही शहरात उमटले आहेत. मालेगाव, अमरावती आणि नांदेडमध्ये मुस्लिम बांधवांनी काढलेल्या मोर्चाला गालबोट लागलं आहे. जमावाकडून मोठ्या प्रमाणात दगडफेक, तोडफोड आणि काही भागात जाळपोळ करण्यात आलीय. नांदेडमध्ये दुपारी जमावाने देगलूर नाका, शिवाजीनगर, कलामंदिर, पावडेवाडी नाक्यासह अनेक भागात दगडफेक केली. त्यात अनेक वाहनं, दुकानांचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, पोलिसांकडून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
त्रिपुरा राज्यात आयोजित एका रॅलीमध्ये पैगंबर इस्लाम हजरत मोहम्मद यांच्याबाबत अपशब्द वापरल्याने महाराष्ट्रातही त्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. महाराष्ट्रातील विविध ठिकाणी मुस्लिम समाज आक्रमक झाला असून रॅली मार्फत याचा निषेध नोंदवण्यात येत होता. नाशिकमधील मालेगावातही मुस्लिम संघटनांनी बंद पुकरला होता. या बंदला सायंकाळी गालबोट लागले. आंदोलकांकडून रॅली दरम्यान दगडफेक करण्यात आली. (Home minister of maharashtra Dilip Walse Patil reaction on muslim violence in state)
इतर बातम्या
VIDEO: त्रिपुरा घटनेचे थेट भिवंडीत पडसाद, रॅलीनंतर संपूर्ण शहरात कडकडीत बंद
Video: अमरावतीत मुस्लिमांच्या मोर्चाला हिंसक वळण, भाजपाचं उद्या बंदचं आवाहन, काय घडतंय अमरावतीत?