मुंबई-पुणे एक्सप्रेस वेच्या ‘ब्लॅक स्पाॅट’वर आता अपघातांचे आकडे

| Updated on: Nov 30, 2022 | 10:37 AM

वाढते रस्ते अपघात कमी करण्यासाठी तसेच वाहनचालकांमध्ये शिस्त निर्माण करण्यासाठी आगामी सहा महिने धडक मोहिम राबविली जाणार आहे. मोटार वाहन विभागातील मुंबई, पुणे, पनवेल, पिंपरी-चिंचवड आरटीओ कार्यालयाच्या अधिकाऱ्यांचे पथक या मोहिमेसाठी निवडण्यात आले आहे.

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेच्या ब्लॅक स्पाॅटवर आता अपघातांचे आकडे
rto
Image Credit source: rto
Follow us on

अतुल कांबळे, TV9 मराठी, मुंबई :

सिगारेटच्या पाकिटावर किंवा तंबाकूच्या उत्पादनांवर जशी सावधानता बाळगण्याची सूचना दिलेली असते तशी सूचना आता तुम्हाला मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर पाहायला मिळाल्यास आश्चर्य वाटून घेऊ नका. कारण वाहतूक विभागाने बेफान वाहन चालविणाऱ्या चालकांचे प्रबाेधन करण्यासाठी मुंबई-एक्सप्रेस हायवेवर असे अफलातून सूचना फलक झळकविण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई ते पुणे एक्सप्रेस वे वर होणारे वाढते प्राणांकीत रस्ते अपघात पाहून या महामार्गावरील सर्वाधिक अपघात घडलेल्या ‘ब्लॅक स्पाॅट’वर आता वाहन चालकांच्या प्रबोधनासाठी तेथे घडलेल्या अपघातांची संख्या दर्शविणारे बोर्ड झळकणार आहेत. वाहन अपघाती मृत्यूमुळे ऐन उमेदीतील तरुण पिढीच नष्ट हाेत आहे. त्यामुळे कुटुंबांचा आधार तर नष्ट होतोच शिवाय राष्ट्राचेही नुकसान हाेत असते.

मुंबई ते पुणे नविन द्रुतगती मार्ग आणि जुना अशा दोन्ही महामार्गांवर वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी आणि वाढत्या अपघातांची संख्या कमी करण्यासाठी वाहतूक विभाग येत्या 1 डिसेंबरपासून महामार्गावर 24 तास पहारा करणार आहे.

रस्ता सुरक्षा जनजागृती आणि अंमलबजावणी उपक्रमांर्तगत सहा महिन्यांसाठी ही 24 तास सुरक्षा मोहीम राबविली जाणार आहे. अपघातप्रवण क्षेत्रांचे ( ब्लॅक स्पॉट ) सर्व्हेक्षण करणे, उपाय योजना करणे याबरोबर यंदा प्रथमच चालकांसाठी तेथे घडलेल्या अपघातांची आकडेवारी दर्शविणारे फलक लावण्यात येणार आहेत. त्यामुळे ही सावधान करणारी सूचना पाहून तरी वाहन चालकांना शिस्त लागावी असा हेतू असल्याचे परिवहन उपायुक्त रस्ता (सुरक्षा कक्ष ) भरत कळसकर यांनी टीव्ही नाइन मराठी बेवसाइटशी बोलताना सांगितले.

रस्त्यावर पार्कींग केलेल्या वाहनांवर कारवाई करणे, उजव्या मार्गिकेत धावणाऱ्या अवजड वाहनांवर कारवाई करणे, रस्त्यावर वाहतूकीसाठी निर्माण झालेले अडथळे दूर करणे, टोलनाक्यांवर उद्घोषणेद्वारे जनजागृती आदी उपायही करण्यात येणार आहेत.

आरटीओच्या इंटरसेप्टर गस्तीवाहनांद्वारे अतिवेगाने धावणाऱ्या वाहनांवर कारवाई करणे, चुकीच्या पद्धतीने लेन कटींग करणाऱ्यांवर कारवाई करणे, विना हेल्मेट तसेच विनासिटबेल्ट प्रवाशांवर कारवाई करणे अशाप्रकारे कारवाई केली जाणार आहे. सुरूवातीचे सात दिवस दोन्ही महामार्गाच्या टोल नाक्यांवर वाहनांतील पीए सिस्टीमद्वारे वाहतूक नियमांविषयी जनजागृती करण्यात येईल. त्यानंतर दंडात्मक कारवाईला प्रत्यक्षात सुरुवात करण्यात येईल असे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी म्हटले आहे.

या उपक्रमासाठी मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, या प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांची 12 पथकांची निर्मिती केली जाणार आहे. या पथकात 30 अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. यातील सहा पथके आणि 15 अधिकारी या दोन्ही महामार्गावर 24 तास कार्यरत राहणार आहेत.

महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ, सार्वजनिक वाहतूक विभाग, वाहतूक पाेलीस विभाग, महामार्ग पाेलीस, स्वयंसेवी संस्था यांची देखील मदत या माेहिमेत घेतली जाणार आहे. वाहन चालकांना वाहतूक करताना सिग्नल न दिसणे, तीव्र उतार असणे, रस्ता निसरडा असणे, वृक्ष किंवा फांद्या चालकाच्या दृष्टीआड येणे आदी दोष दुर करण्यासाठी संबंधित यंत्रणांची मदत घेतली जाणार असल्याचे परिवहन उपायुक्त रस्ता (सुरक्षा कक्ष ) भरत कळसकर यांनी सांगितले.

राज्यात  तब्बल 1324 ब्लॅक स्पॉट आहेत. त्यात राज्य महामार्गावर 325 ब्लॅक स्पॉट आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीतील राष्ट्रीय महामार्गावर 510 आणि राष्ट्रीय प्राधिकरणाच्या महामार्गांवर 370  ब्लॅक स्पॉट आहेत. एकूण 1324 ब्लॅक स्पॉटपैकी 757 ब्लॅक स्पॉटवर कायम स्वरूपी उपाय योजना केल्या आहेत. तर 499 ब्लॅक स्पॉटवर कायम स्वरूपी उपाय करण्याचे काम सुरू आहे.

माेटार वाहन अपघातातील 80 टक्के अपघात मानवी चुकीमुळे, चालकांच्या निष्काळजीपणा, बेफीरवृत्ती आणि वाहतूकीचे नियम न पाळल्यामुळे घडत असतात असे राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी स्पष्ट केले आहे.