नागपूर : राज्यातील युवक युवतींच्या सर्जनशीलतेला वाव मिळवून राज्यात स्वयंरोजगाराचा पूरक वातावरण तयार करण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती (Mukhyamantri Rozgar Yojana) कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. या अंतर्गत 2022-23 या वर्षाकरिता 10 ते 25 लाखापर्यंत प्रकल्प उभारणीसाठी अनुदान मिळणार आहे. नागपूर जिल्ह्यातील युवक-युवतींनी याचा लाभ घेण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाने (Khadi Village Industries Department) केले आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत ज्यांच्याकडे कौशल्य आहे, अशा युवकांचे खेड्यातून शहराकडे होणारे स्थलांतर थांबविण्यासाठी ग्रामीण भागातील युवकांसाठी खादी ग्रामोद्योग विभाग ही योजना राबवित आहे. तथापि नागपूर महानगरातील (Nagpur Metropolitan) युवकांना यामध्ये सहभागी व्हावेत, यासाठी ही योजना राबविली जात आहे. महाराष्ट्र शासनाने एक ऑगस्ट 2019 रोजी या संदर्भात शासन निर्णय जाहीर केलाय. यामध्ये या योजनेबाबतची संपूर्ण माहिती आहे. नागपूर महानगर व नागपूर ग्रामीण भागातील युवक-युवतींनी या योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी उद्योग उर्जा व कामगार विभागाच्या एक ऑगस्ट 2019 च्या शासकीय निर्णयाचा संदर्भ घ्यावा. असे आवाहन महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ तसेच जिल्हा उद्योग केंद्र यांनी केले आहे.
या योजनेच्या लाभार्थ्यासाठी 18 ते 45 वयोगटातील स्वयम रोजगार करू इच्छिणारे उमेदवार पात्र ठरू शकतात. विशेष म्हणजे अनुसूचित जाती जमाती, महिला अपंग माजी सैनिक यांच्यासाठी ही वयोमर्यादा पाच वर्षे शिथिल करण्यात आली आहे. रुपये दहा लाखांवरील प्रकल्पासाठी केवळ सातवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. पंचवीस लाखांवरील प्रकल्पासाठी दहावी उत्तर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पासपोर्ट साईज फोटो, जन्मदाखला, शैक्षणिक पात्रता संबंधित कागदपत्रे आधार कार्ड जातीचे प्रमाणपत्र विशेष प्रवर्गासाठी पूरक प्रमाणपत्र हवे. स्वयम् साक्षांकित विहित नमुन्यातील वचनपत्र, प्रकल्प अहवाल व वाहतुकीसाठी परवानगी व वाहन चालवण्याचा परवाना आवश्यक आहे. यासंदर्भात जीएएमईजीपी ईपोर्टल वर सर्व माहिती उपलब्ध आहे. ऑनलाइन पद्धतीनेही या ठिकाणी अर्ज करण्यात येतो.
महाराष्ट्राच्या अन्य जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात या योजनेचा लाभ युवक-युवती घेत आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये देखील या योजनेसाठी उमेदवारांनी अर्ज करावे असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग कार्यालयाने केले आहे. जिल्हा ग्राम उद्योग कार्यालय ग्रामीण भागातील युवकांसाठी ही योजना लागू होत आहे. तर शहरी भागासाठी ही योजना जिल्हा उद्योग केंद्राकडून राबविण्यात येत आहे. त्यामुळे नागपूर शहरातील युवकांनी जिल्हा उद्योग केंद्र तर ग्रामीण भागातील युवकांनी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाची संपर्क साधावा असे, आवाहन करण्यात आले आहे.