नाशिक-सुरत फक्त 75 मिनिटांत, केंद्रीय मंत्री गडकरींची ग्रीनफिल्ड भेट काय; कसा होणार प्रकल्प?

| Updated on: Feb 12, 2022 | 11:33 AM

चेन्नई-सुरत हा सहा पदरी ग्रीनफिल्ड उभारण्यात येणार आहे. हा मार्ग नाशिक जिल्ह्यातून जाणार आहे. त्यामुळे नाशिक आणि सुरतचे अंतर कमी होणारय. विशेष म्हणजे येणाऱ्या चार वर्षांत हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता वर्तवली जातेय.

नाशिक-सुरत फक्त 75 मिनिटांत, केंद्रीय मंत्री गडकरींची ग्रीनफिल्ड भेट काय; कसा होणार प्रकल्प?
ग्रीनफिल्डच्या उभारणीनंतर नाशिकचा चेहरा-मोहराच बदलून जाणार आहे.
Follow us on

नाशिकः नाशिक-सुरत (Nashik-Surat) हे 176 किलोमीटरचे अंतर आता फक्त सव्वा तासात म्हणजेच अवघ्या 75 मिनिटांत गाठणे शक्य होणार आहे. त्यासाठीच तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी ग्रीन-फिल्ड (Greenfield) महामार्गाची घोषणी केलीय. त्यानुसार मार्च 2023 मध्ये या कामाला सुरुवात होणारय. त्यात चेन्नई-सुरत हा सहा पदरी ग्रीनफिल्ड उभारण्यात येणार आहे. हा मार्ग नाशिक जिल्ह्यातून जाणार आहे. त्यामुळे नाशिक आणि सुरतचे अंतर कमी होणारय. विशेष म्हणजे येणाऱ्या चार वर्षांत हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता वर्तवली जातेय. हा महामार्गा पूर्ण झाल्यानंतर नाशिकचे महत्त्व वाढणार आहेच. सोबतच नाशिकचा भाजीपाला थेट दाक्षिणात्या राज्यातही जाईल. माल थेट बंदरात पोहचविता असल्याने इतर खर्च कमी होईल. शिवाय नाशिक पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची त्यामुळे मोठी सोय होणारय. स्वतः गडकरींनी ही माहिती दिलीय.

काय म्हणाले गडकरी?

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाकडून पहिला कार्यक्षम खासदार पुरस्कार दिल्ली येथे त्यांच्या निवासस्थानी प्रदान करण्यात आला. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, खासदार हेमंत गोडसे उपस्थित होते. यावेळी मान्यवरांना गडकरी यांनी या महत्त्वकांक्षी प्रकल्पाची माहिती दिली. नव्या महामार्गामुळे सुरत-चेन्नई हे 1600 किलोमीटरचे अंतर 1270 किलोमीटवर येईल. त्यामुळे 350 किमीचा प्रवास कमी करावा लागेल. मोठ्या शहरातील प्रदूषण यामुळे कमी होईल. मुंबई, पुणे, सोलापूर येथील वाहतूक 50 टक्के घटेल. सध्या नाशिक ते सुरत दोन मार्गाने जाता येते. पहिला मार्ग नाशिक-दिंडो-सापुतारा. हे अंतर 240 किलोमीटर आहे. तर नाशिक-धरमपूर-सुरत हे अंतर 225 किमी आहे. सध्या या प्रवासासाठी पाच तासांचा वेळ लागतो.

भूसंपादन कुठे?

ग्रीनफील्ड महामार्गाचे भूसंपादन 2022 पर्यंत केले जाणार आहे. पुढील तीन वर्षांत रस्ता तयार असेल. नाशिक जिल्ह्यात त्यासाठी 996 हेक्टर जमीन संपादित केली जाईल. या मार्गाचे नाशिक जिल्ह्यातील अंतर हे 122 किलोमीटर असेल. जिल्ह्यातील एकूण 69 गावांमधून हा महामार्ग जाणार आहे. सुरगाणा, पेठ, दिंडोरी, नाशिक, निफाड व सिन्नर तालुक्यामधून हा महामार्ग जाणार आहे. त्यात दिंडोरी तालुक्यातील सर्वाधिक तेवीस गावांचा समावेश आहे.

कोणत्या शहरांना फायदा?

नाशिक जिल्ह्यातील 609 गावांमधून हा ग्रीनफील्ड महामार्ग जाणार आहे. त्यासाठी 996 हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे. पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत भूसंपादन प्रक्रिया करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीपूर्वी 2024 मध्ये हा महामार्ग तयार होणार आहे. या मार्गाचे अनेक फायदे आहेत. यामुळे सुरत, नगर, सोलापूर, हैदराबाद, चेन्नई ही शहरे जोडली जातील. सोबतच सुरत-चेन्नई हे 1600 किमीचे अंतर 1250 किमीवर येईल. त्यातही म्हणजे नाशिक-सुरत अंतर फक्त 176 किमी आहे. त्यामुळे नाशिककर एकदम सुसाट दोन तासांत सुरत गाठतील.

कोणत्या तालुक्यातून जाणार?

नाशिक तालुक्यातील आडगाव, ओढा, विंचूरगवळी, लाखलगाव येथून हा मार्ग जाईल. निफाड तालुक्यातील चेहेडी खुर्द, चाटोरी, वऱ्हे, लालपाडी, रामनगर, दारणासांगवी, सावळी, तळवाडे, पिंपळगाव निपाणी गावातून हा महामार्ग जाईल. सुरगाणा तालुक्यातील बेंडवळ, बहुडा, दुधवळ, गहाळे, रक्षाभुवन, हस्ते, जहुळे, कहांडोळसा, कोटंबा, मर्दंड, पिंपळचोंड, संबरकहाळ गावातून हा मार्ग जाईल.

दिंडोरीतली 23 गावे

दिंडोरी तालुक्यातील तेटमाळा, रडतोंडी, कवडासर, चिल्हारपाडा, महाजे, चाचडगाव, उमराळे बुद्रुक, जांबुटके, नाळेगाव, इंदोरे, राशेगाव, ननाशी, पिंपळनेर, रामशेज, आंबेदिंडोरी, ढकांबे, शिवनाई, वरवंडी, गांडोळे, गोळशी, जर्लीपाडा, आंबेगाव, बहूर आदी गावांमधून हा महामार्ग जाणार आहे. पेठ तालुक्यातील पाहुचीबारी, विर्मळ, कळंबरी, वडबारी, हरणगाव येथून हा महामार्ग जाणार आहे. सिन्नर तालुक्यातील देशवंडी, पाटपिंप्री, निमगाव देवपूर, बारागाव पिंप्री, गुळवंच, देवपूर, खोपडी बुद्रुक, धारणगाव, फर्दापूर, पांगरी बुद्रुक, भोकणी, पांगरी खुर्द, फुलेगनर, कहांडळवाडी, घोटेवाडी, वावी या गावातून हा महामार्ग जाणार आहे.

सोलापूरही जवळ

राज्यात राक्षसभुवन (ता. सुरगाणा) येथे हा महामार्ग प्रवेश करेल. अक्कलकोट (ता. सोलापूर) येथे या महामार्गाचे राज्यातील शेवट असेल. हा महामार्ग सिन्नरमधील वावीत समृद्धी एक्स्प्रेसला ओलांडणार आहे. त्यासाठी सोलापूर, नाशिक, नगर जिल्ह्यात प्रकल्पाची उभारणी होणार आहे. विशेष म्हणजे या महामार्गामुळे नाशिक ते सोलापूर हे अंतर चक्क 50 किलोमीटरने कमी होणार आहे.