जळगाव, धुळे, नंदुरबारलाही झोडपले; तितूर नदीला वर्षातला पाचवा महापूर, 300 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले, एक जण गेला वाहून

| Updated on: Sep 29, 2021 | 12:21 PM

जळगाव, धुळे आणि नंदुरबारमधील अनेक भागाला पावसाने झोडपून काढले आहे. तब्बल 20 मंडळामध्ये अतिवृष्टी झाली असून, चाळीसगावातल्या तितूर नदीला वर्षातला पाचवा महापूर आला आहे.

जळगाव, धुळे, नंदुरबारलाही झोडपले; तितूर नदीला वर्षातला पाचवा महापूर, 300 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले, एक जण गेला वाहून
जळगावमध्ये पावसाने कहर केला आहे. त्यामुळे वाघूरचे धरणाचे 20 दरवाजे उघडण्यात आले आहेत
Follow us on

नाशिकः जळगाव, धुळे आणि नंदुरबारमधील अनेक भागाला पावसाने झोडपून काढले आहे. तब्बल 20 मंडळामध्ये अतिवृष्टी झाली असून, चाळीसगावातल्या तितूर नदीला वर्षातला पाचवा महापूर आला आहे. (Heavy rains in Jalgaon, Dhule Nandurbar, fifth flood of the year on Titur river, 300 people evacuated, one carried away)

गेल्या दोन दिवसांपासून राज्यभरात पावसाचे थैमान सुरू आहे. नाशिकसह साऱ्या उत्तर महाराष्ट्रात पावसाचे प्रकोपाने हाहाकार उडाला आहे. जळगाव जिल्ह्यातल्या 20 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. त्यात चाळीसगाव, जामनेर, पाचोरा आणि भडगावचा समावेश आहे. चाळीसगावमध्ये तितूर नदीला पाचवा महापूर आला आहे. पाचोऱ्या तालुक्यातल्या हिवरा नदीच्या पुरात साहेबराव पांचाळ (वय 25) हा तरुण वाहून गेला आहे. पुरामुळे अनेक गावांमधील घरात पाणी शिरले आहे. हातातोंडाशी आलेला खरिपाच्या पिकाचा घास हिरावून नेला आहे. जोरदार पावसाने भागातील धरणे भरत आली आहेत. त्यात गिरणाचा पाणीसाठा 80 टक्क्यांवर पोहचला आहे. मन्याड धरणातून पाच हजार क्यूसेक आणि जामदरा बंधाऱ्यातून पंधरा हजार क्यूसेकचा विसर्ग सुरू आहे. सोबतच या भागातले हिवरा, अग्नावती, मंगरूळ, तोंडापूर हे मध्य प्रकल्प भरले आहेत. पारोळा तालुक्यातील बोरी प्रकल्पाचे दरवाजे उघडून त्यातून 4 हजार 59 क्यूसेकने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

भयंकर नुकसान

जळगाव जिल्ह्यात या महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे 69 गावांमध्ये अडीच हजारांच्या जवळपास घरे, दुकाने, झोपड्या पडल्या आहेत. पुरामध्ये पावणेतीन हजार जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर 16 हजार हेक्टवरील पिकांचे नुकसान झाले असून, तिघा जणांचा मृत्यू झाल्याचे समजते. हे सारे नुकसान 31 ऑगस्टच्या पुराने घडले आहे. तर 7 आणि 8 सप्टेंबरलाही जिल्ह्याला पावासने झोडपून काढले होते. यात साडेपाच हजार हेक्टरवरील पीक मातीमोल झाले. नांदे, सायगाव भागातल्या जवळपास चारशे घरांची पडझड झाली असून, 80 जनावरांचा मृत्यू झाल्याची नोंद सरकार दफ्तरी आहे. 28 सप्टेंबर रोजी आलेल्या पुरानेही अनेक घरात पाणी शिरले. पिकांचे मोठे नुकसान झाले. पंचनामे केल्यानंतर यातील भयंकरपणा समोर येणार आहे.

वाघूर धरणाचे 20 दरवाजे उघडले

जळगावमध्ये पावसाने कहर केला आहे. त्यामुळे वाघूरचे धरणाचे 20 दरवाजे उघडण्यात आले आहेत. जिल्ह्यात अजूनही अतिवृष्टीची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. धुळे येथून राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे 35 जणांचे पथक शहरात आले आहे. त्यातील दहा जणांचे पथक बोटीसह पाचोऱ्याला मदतीसाठी गेले आहे. जळगाव जिल्ह्यातल्या वावदडा येथे पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे या मार्गावर पर्यायी पूल उभारण्यात आला होता. मात्र, हा पूल वाहून गेला आहे. त्यामुळे येथील वाहतूक बंद पडली आहे. म्हसावदकडे जाणाऱ्या कुळकुळे येथे पुलावरून पाणी गेल्याने वाहतूक बंद पडलीआहे. (Heavy rains in Jalgaon, Dhule Nandurbar, fifth flood of the year on Titur river, 300 people evacuated, one carried away)

इतर बातम्याः

भिंत खचली, चूल विझलीः नाशिक जिल्ह्यात हाहाकार, दोघांचा बुडून मृत्यू; 3 हजार हेक्टरवरले पीक आडवे, गोदावरीला येणार महापूर

द्राक्ष बागायतदारांना धाकधूक; 15 दिवस बेमोसमी पाऊस नको, अन्यथा तोंडाशी आलेला घास हिरावणार!