सिंधुदुर्ग : तळकोकणात सोमवारी संध्याकाळच्या सुमारात जोरदार सरींनी हजेरी लावली. वेंगुर्ले तालुक्यासह कुडाळमध्ये जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे पुन्हा एकदा हातातोंडाशी आलेला घास हिरावण्याची भीती बागायतदारांमध्ये निर्माण झाली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे सगळ्यांचीच तारांबळ उडाली होती. संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास पाऊस बरसायला सुरुवात झाली. या पावसामुळे ऐन मोहरलेला आंबा पुन्हा कोमेजण्याची शक्यता आहे. हापूस आंब्याला या पावसाचा फटका बसण्याची भीती असून काजूदेखील नासण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. पूर्वेकडून येत असलेल्या बाष्पयुक्त वाऱ्यांच्या प्रभावामुळे पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यानुसार कोकण आणि गोव्यातील बहुतांश भागात पावसानं हजेरी लावली आहे.
दरम्यान, कुडाळ तालुक्यातील बिबवणे पिंगुळीतही पावसाच्या जोरदार सरी संध्याकाळच्या सुमारास बरसल्या. ऐन कडाक्याची थंडी तळकोकणातील सर्वच तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून जाणवू लागली आहे. अशातच सोमवारी संध्याकाळी झालेल्या पावसानं आता शेतकऱ्यांची चिंता आता आणखी वाढवली आहे.
कोकणासह गोव्यातील उत्तर तालुक्यांमध्ये पावसानं हजेरी लावली. उत्तर गोव्यातील सत्तरी तालुक्यात मुसळदार पावसानं एकच तारांबळ उडवली होती. पूर्वेकडून येत असलेल्या बाष्पयुक्त वाऱ्यांच्या प्रभावामुळे पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. दरम्यान, अचानक आलेल्या पावसानं सगळ्यांचा एकच गोंधळ उडाला होता.
दरम्यान, यंदा कोकणातून आंब्याचं भरघोस उत्पादन येण्याची बागायतदारांना अपेक्षा होता. अनुकूल वातावरणामुळे आंबा पिकातून चांगलं उत्पन्न यंदा शेतकऱ्यांना मिळेल, अशा आशेवर असलेल्या शेतकऱ्यांना अवकाळी पावसानं निराश केलं आहे. सोमवारी संध्याकाळी झालेला पाऊस हा आंबा पिकासाठी प्रतिकूल ठरेल, अशी शक्यता आहे. त्यामुळे शेतकरीही चांगलेच धास्तावले आहेत.