मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी भाजपकडून शिवसेना नेते आणि राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून संजय राठोड यांच्यावर आरोप करण्यात येत आहेत. विशेष म्हणजे येत्या 1 मार्चपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होणार आहे. संजय राठोड यांच्यावरील आरोपांमुळे राज्य सरकारवर दबाव वाढत आहे. त्यामुळे शिवसेना अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी संजय राठोड यांच्या राजीनाम्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. याच विषयावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी शिवसेना नेत्यांची बैठक बोलावली (Shiv Sena meeting on Sanjay Rathore). या बैठकीत राठोड यांच्या राजीनाम्याबाबत अद्याप निर्णय झाला नाही. तर राठोड प्रकरणावर रणनिती आखण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राठोड प्रकरणावर रणनिती आखण्यावर चर्चा झाली, मात्र संजय राठोडांच्या राजीनाम्यावर अद्याप कोणताही निर्णय
राजीनाम्यावर तूर्तास चर्चा नाही, अधिवेशनाचं कामकाज कसं करायचं? या विषयावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहेय
“संजय राठोड अवघड जागेवरचं दुखणं झालंय, राष्ट्रवादी आणि काँग्रेसला देखील त्याचा जबाब द्यावा लागतोय. प्रसारमाध्यमातून रोज नवनवीन बातम्या समोर येत आहेत. पोलीस कोणाच्या तरी दबावात आहेत ते जवळपास निश्चित झालंय. जितक्या लवकर संजय राठोड राजीनामा देतील तेवढं बरंय, जेवढा उशिर होईल तेवढा त्याचा इम्पॅट राहणार नाही. जर सीबीआयपर्यंत हे प्रकरण गेलं तर पूजा आत्महत्या प्रकरणापर्यंत मर्यादित राहणार नाही, शिवसेनेच्या अनेक दिग्गज नेत्यांना त्याचा फटका बसू शकतो, याशिवाय केंद्र सरकार आणि केंद्रीय यंत्रणाचा संबंध सर्वश्रूत आहे”, अशी प्रतिक्रिया राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे यांनी दिली.