Sant Gadge Baba | कीर्तनातून केले समाजप्रबोधन; कबीर-तुकाराम परंपरेतील संत गाडगेबाबा

गाडगेबाबांनी शिक्षणाचा प्रसार कीर्तनातून केला. ते सांगायचे ''आता तरी सुधरा, मुलांना शिक्षण द्या, पैसे नाही म्हणाल तर जेवणाचे ताट मोडा, हातावर भाकरी खा, बायकोले कमी भावाचे लुगडं घ्या, विद्या हे मोठे धन आहे. मोडक्या घरात राहा. पण मुलाले शिक्षण दिल्याविना राहू नका.''

Sant Gadge Baba | कीर्तनातून केले समाजप्रबोधन; कबीर-तुकाराम परंपरेतील संत गाडगेबाबा
Gadgebaba
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Dec 20, 2021 | 6:37 AM

गाडगेबाबा यांनी माणसात दडलेल्या ईश्वराची सेवा केली. शेंदूर फासलेल्या देवावर त्यांनी हल्ला केला. दूषित पाण्याच्या तिर्थाची टरही उडविली. स्वच्छता, शिक्षण आणि स्वावलंबन हा त्यांच्या कीर्तनाचा गाभा होता. समाजातील अंधश्रद्धेवर त्यांनी टीका केली. त्यांनी गोरक्षणे, धर्मशाळा बांधल्या. अन्नछत्रे चालविली ती निराधारांसाठी. कीर्तनात हजारो मुद्दे येतात. शेकडो प्रश्न येतात ते प्रश्न व त्यांची उत्तरे ऐकणाऱ्याच्या हृदयाला जाऊन भिडत. त्यांच्या कीर्तनाला ‘गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’ एवढाच परमेश्‍वराच्या नावाचा उल्लेख येतो. त्याचाही उपयोग आपला उपदेश लोकांच्या मनावर ठसावा यासाठी ते करतं.

गाडगेबाबांच्या कीर्तनाचे तंत्र विलक्षण

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पिढ्यांनी झाडू मारायचे काम केले. त्यांच्या वडिलांनी आंबेडकरांना शिकविले. शिक्षण घेतल्यामुळं आंबेडकर साहेबाने भारताची राज्यघटना लिहिली, असं गाडगेबाबा सांगत. जर कोणी जात विचारली तर काय सांगायचं, स्त्री आणि पुरुष अशा दोनच जाती माणसाच्या आहेत. या दोन्ही जातीत प्रेम असावे, जातीवाद आणि शिवाशिवीने हिंदुस्थानच्या लाखो लोकांचे जगणे नरकमय झाले. लोकांनी हिंदू धर्माचा त्याग केला. इस्लाम, ख्रिश्‍चन धर्म स्वीकारला. लोकांवर होणारा अन्याय अत्याचार थांबवा. जातीभेद विसरा, समानता निर्माण करा. गरिबांना मदत करा, पीडितांना आधार द्या. परोपकार व लोकसेवा करा. असे लोकसेवेचे संस्कार बाबा लोकांवर करायचे. गाडगेबाबांच्या कीर्तनाचे तंत्र विलक्षण होते. ते सर्व श्रोत्यांना हात वर करून टाळ्यांच्या तालावर भजन सांगतं.

कानातील फुटक्या कवडीचे मालक

संत नामदेव महाराजांचा वसा गाडगेबाबांनी पुढे चालविला. श्रीमंत लोकांनी दिलेल्या दाननिधीतूनच गाडगेबाबांनी धर्मशाळा, गोरक्षणे, घाट आणि इतर लोकोपयोगी कामे केली. एक निर्धन माणूस श्रीमंताचे दातृत्व जागे करतो. लोकोत्तर कार्य करणारे गाडगेबाबा फक्त कानातल्या फुटक्या कवडीचे मालक होते. पंढरपूर येथे 24 नोव्हेंबर 1956 ला गाडगेबाबांचे कीर्तन झाले. 6 डिसेंबरला डॉ. आंबेडकराचे महापरिनिर्वाण झाले. त्यानंतर पंधरा दिवसांनी 20 डिसेंबर 1956 रोजी गाडगेबाबांचे देहावसान झाले.

 

गाडगेबाबांचे बालपण

शेणगावात झिंगराजी आणि सखुबाई या जानोरकर दाम्पत्याच्या पोटी 13 फेब्रुवारी 1876 रोजी जन्म झाला. लहानपणाचे त्यांचे नाव डेबू होते. परमेश्वरावर भक्ती असलेले वडील लहानपणीचं गेले. आई डेबूला घेऊन दापुरे या त्याच्या मामाच्या गावी आली. सकाळी उठून गुरांचा गोठा स्वच्छ करणे. दुपारी कांदा-भाकरीची न्याहारी खाणे. गुरांना स्वच्छ पाणी पाजून झाडाच्या सावलीत उभे करणे. डेबू गावातील भजनात जाऊन बसतं. वयाच्या 16 व्या वर्षी लग्न झाले. डेबूला कन्यारत्न झाले. पण, त्यांचे मन काही संसारात रमत नव्हते.

 

गाडगेबाबांच्या जीवनातील महत्त्वाची वर्षे

23 फेब्रुवारी 1876 रोजी अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील शेणगाव येथे जन्म झाला. एक फेब्रुवारी 1905 या दिवशी पहाटे तीन वाजता सुखाचा संसार सोडून गाडगेबाबा देशाला सुखी करण्यासाठी घराबाहेर पडले. 1925 मध्ये मूर्तीजापूर येथे गोरक्षण, धर्मशाळा व विद्यालय निर्माण केले. 1931 वरवंडे येथे गाडगेबाबांच्या प्रबोधनातून पशुहत्या बंद झाली. 1954 मध्ये मुंबईतील जे. जे. हॉस्पिटल येथे धर्मशाळा बांधली. मृत्यू 20 डिसेंबर 1956 अमरावती जिल्ह्यातील वलगाव येथे झाला.

इतर बातम्या

Bhandara, Gondia ZP Election | प्रचार तोफा थंडावल्या, उद्या छुपा प्रचार, 21 ला होणार मतदान, प्रशासकीय यंत्रणा सज्ज

Gondia murder | भाऊच ठरला कर्दनकाळ, उपचाराला खर्च लागतो म्हणून संपविले, मतिमंद भावाची गळा दाबून हत्या!

Nagpur | 40 वर्षीय चौकीदाराचा जळून मृत्यू, मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडला; मृत्यूचे कारण काय?

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us