श्रेय घेता, पण पंकजांना अडचणीत का टाकता, भुजबळांचा सरकारला सवाल

| Updated on: Jul 05, 2019 | 4:57 PM

सुनील काळे, टीव्ही 9 मराठी, मुंबई : विधानसभेत एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजतोय, तर दुसरीकडे दुष्काळाच्या मुद्द्यावरही सरकारला विरोधकांनी कोंडीत पकडलंय. जनावरांना चारा मिळत नाही, तर लोकांना पाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतोय. त्यामुळे फडणवीस सरकारला विरोधकांसह पक्षातील नेत्यांनीही धारेवर धरलंय. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात दुष्काळाच्या चर्चेसाठी सभागृहात मंत्री उपस्थित नव्हते. तेव्हा सरकारच्या मदतीसाठी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे […]

श्रेय घेता, पण पंकजांना अडचणीत का टाकता, भुजबळांचा सरकारला सवाल
छगन भुजबळ आणि पंकजा मुंडे.
Follow us on

सुनील काळे, टीव्ही 9 मराठी, मुंबई : विधानसभेत एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजतोय, तर दुसरीकडे दुष्काळाच्या मुद्द्यावरही सरकारला विरोधकांनी कोंडीत पकडलंय. जनावरांना चारा मिळत नाही, तर लोकांना पाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतोय. त्यामुळे फडणवीस सरकारला विरोधकांसह पक्षातील नेत्यांनीही धारेवर धरलंय.

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात दुष्काळाच्या चर्चेसाठी सभागृहात मंत्री उपस्थित नव्हते. तेव्हा सरकारच्या मदतीसाठी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे धावून आल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनीही सरकारला यावरुन टोला लगावला. सरकार अडचणीत आलं की पंकजा मुंडेंना धावावं लागतं. श्रेय घेताना मात्र पंकजा मुंडे आठवत नाहीत. अडचणीतच त्यांना का त्रास दिला जातो? असा सवाल भुजबळांनी केला.

दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आणि छगन भुजबळ यांचे मैत्रीचे संबंध राजकारणाच्या पलिकडे होते. मुंडे कुटुंबीयांशी भुजबळांचे अजूनही चांगले संबंध आहेत. भुजबळ तुरुंगात आणि रुग्णालयात असताना पंकजा मुंडेंनी अनेकदा त्यांची रुग्णालयात जाऊन विचारपूस केल्याचं भुजबळांनी स्वतः बोलून दाखवलं होतं. शिवाय त्यांनी अनेकदा मुंडे साहेबांची आठवणही काढली होती.

खडसेंचाही सरकारला घरचा आहेर

सरकारला दुष्काळाचं गांभीर्य नाही, असं म्हणत माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते यांनी सरकारला धारेवर धरलंय. वीज बिल भरलं जात नसल्यामुळे वीज कापली जात आहे. पिण्याच्या पाण्याचं कनेक्शन कापू नये, असं म्हणत आपण आंदोलनाच्या तयारीत असल्याचा इशाराही खडसेंनी दिला. सर्वांना भेटल्यानंतरही माझ्या मतदारसंघात पाणी मिळत नाही, अशी हतबलता खडसेंनी बोलून दाखवली.

दुष्काळाची तीव्रता भीषण आहे. आगामी काळात चाऱ्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. चाऱ्याला जिल्हाबंदी करण्यात यावी. अन्य ठिकाणचा निधी मनरेगासाठी वापरला गेला पाहिजे, अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली.

प्रशासकीय स्तरावर अनेक पदं रिक्त आहेत. मग दुष्काळाचा सामना करणार कसा? अनेक ठिकाणी तलाठी, ग्रामसेवक, बीडीओ यांच्या जागा रिक्त आहेत. दुष्काळाचा पोरखेळ चालवलाय का तुम्ही? वीज मंडळाचे अधिकारी कलेक्टरचंही ऐकत नाहीत, असं म्हणत एकनाथ खडसे विधानसभेत कडाडले.