बदलापूरमध्ये रिक्षा चालकांचा बेमुदत संप सुरूच, साखळी उपोषणही सुरू; कारण काय?

| Updated on: Nov 21, 2022 | 9:39 AM

परिणामी बदलापूर शहर आणि आसपासच्या ग्रामीण भागात जाणारी रिक्षा आणि टॅक्सी सेवा संपूर्णपणे ठप्प झाली आहे. याचा साहजिकच प्रवाशांना मात्र मनस्ताप सोसावा लागतोय.

बदलापूरमध्ये रिक्षा चालकांचा बेमुदत संप सुरूच, साखळी उपोषणही सुरू; कारण काय?
बदलापूरमध्ये रिक्षा चालकांचा बेमुदत संप सुरूच, साखळी उपोषणही सुरू; कारण काय?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

बदलापूर: बदलापूर शहरातील सर्व रिक्षा चालकांनी बेमुदत संप पुकारला असून आज सलग तिसऱ्या दिवशीही हा संप सुरूच आहे. सोबतच रिक्षा स्टॅन्डच्या मागणीसाठी रिक्षा चालकांनी साखळी उपोषणाला सुद्धा सुरुवात केली आहे. त्यामुळे बदलापूर शहरातील रिक्षा सेवा मात्र पूर्णपणे ठप्प झाली असून त्यामुळे चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत आहेत. आधीच रिक्षा बंद, त्यात एसटीची सुविधा नाही, त्यामुळे प्रवाशांना चालतच स्टेशनवर जावं लागत असल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

बदलापूर रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील रिक्षा स्टॅन्ड शुक्रवारी बदलापूर पालिकेने कारवाई करत जमीनदोस्त केलं. रेल्वेच्या होम प्लॅटफॉर्मसाठी आणि पादचारी पुलासाठी ही जागा लागणार असल्यानं हे रिक्षा स्टॅन्ड तोडण्यात आलं.

हे सुद्धा वाचा

वास्तविक हे रिक्षा स्टॅन्ड रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला स्थलांतरित करून मग तोडण्यात येणार होतं. त्यासाठी स्वतः बदलापूर पालिकेचे मुख्याधिकारी योगेश गोडसे आणि माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी रिक्षा चालकांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी स्थलांतराला सहमती दर्शवली होती.

मात्र पर्यायी जागा देण्यापूर्वीच पालिकेने अनधिकृत गाळ्यांवर केलेल्या कारवाईसोबत रिक्षा स्टॅन्डवर सुद्धा कारवाई केली. त्यामुळे संतापलेल्या रिक्षाचालकांनी बेमुदत संप पुकारला. शुक्रवारपासून सुरू झालेल्या या संपाचा आजचा तिसरा दिवस असून यासोबतच रिक्षाचालकांनी साखळी उपोषण सुद्धा सुरू केलं आहे.

रिक्षा चालकांच्या या बंदमध्ये बदलापूर शहरातील तब्बल 4 हजार रिक्षाचालक सहभागी झाले आहेत. यामध्ये बदलापूर पश्चिमेकडील 45, तर बदलापूर पूर्वेकडील 30 स्टॅन्डवरील रिक्षा चालकांचा समावेश आहे. सोबतच बारवी डॅम आणि मुरबाडकडे जाणाऱ्या काळ्यापिवळ्या टॅक्सीचालकांनी सुद्धा या बंदमध्ये सहभाग घेतला आहे.

त्यामुळे ग्रामीण भागात जाणाऱ्या जवळपास 50 टॅक्सी सुद्धा बंद आहेत, असं रिक्षा चालक-मालक वेल्फेअर असोसिएशनचे सेक्रेटरी सुरेश रोकडे यांनी सांगितले.

परिणामी बदलापूर शहर आणि आसपासच्या ग्रामीण भागात जाणारी रिक्षा आणि टॅक्सी सेवा संपूर्णपणे ठप्प झाली आहे. याचा साहजिकच प्रवाशांना मात्र मनस्ताप सोसावा लागतोय.

मात्र असं असूनही गेल्या तीन दिवसात नगरपालिकेचा एक अधिकारीही आमच्याकडे साधा फिरकलेला सुद्धा नसल्याची खंत रिक्षाचालकांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, साखळी उपोषणा सोबतच बदलापूर रेल्वे स्थानकाबाहेर रिक्षा चालकांनी सह्यांची मोहीम सुरू केली आहे. बदलापूर शहर हे सध्याच्या घडीला बदलापूर गाव, सोनीवली, वडवली, साई वालीवली, माणकिवली, जुवेली, खरवई या गावाबाहेरच्या ग्रामीण पट्ट्यातही विस्तारत आहे.

हे अंतर स्टेशनपासून किमान 5 ते 6 किलोमीटर इतकं आहे. त्यामुळे या भागातल्या प्रवाशांना स्टेशनला ये-जा करण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळे बदलापूर पालिकेने लवकरात लवकर रिक्षा चालकांशी बोलून त्यांच्या संपावर तोडगा काढण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.