साहित्य संमेलन गीतामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाचा उल्लेख नाही; भूमिपुत्रालाच डावलल्याने नाराजीचे सूर

| Updated on: Nov 11, 2021 | 7:19 PM

मराठी साहित्यात आपल्या प्रतिभेच्या तेजाने तळपणाऱ्या स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांचा नाशिक येथे होणाऱ्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या गीतामध्ये उल्लेख नसल्याने सावरकरप्रेमींमध्ये नाराजी आहे.

साहित्य संमेलन गीतामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाचा उल्लेख नाही; भूमिपुत्रालाच डावलल्याने नाराजीचे सूर
स्वातंत्र्यवीर सावरकर.
Follow us on

नाशिकः मराठी साहित्यात आपल्या प्रतिभेच्या तेजाने तळपणाऱ्या स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांचा नाशिक येथे होणाऱ्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या गीतामध्ये उल्लेख नसल्याने सावरकरप्रेमींमध्ये नाराजी आहे. विशेष म्हणजे याबद्दल अनेक साहित्यप्रेमींनीही आश्चर्य व्यक्त केले आहे.

नाशिकमध्ये होणाऱ्या साहित्य समंलेनाची अतिशय उत्साहात आणि जोरात तयारी सुरू आहे. पालकमंत्री छगन भुजबळ याच्या हस्ते सोमवारी संमेलन गीताचे अनावरण करण्यात आले. गीतकार मिलिंद गांधी यांनी हे गीत रचले आहे. नाशिकचा सांस्कृतिक आणि साहित्यिक विश्वाचा इतिहास आणि आढावा या गीतातून घेतला आहे. संजय गीते यांनी हे गीत स्वरबद्ध केले आहे. या गीतामध्ये स्वातंत्र्यवीर, नाशिकचे भूमिपुत्र, साहित्यिक आणि मुंबई येथे 1938 मध्ये झालेल्या 23 व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष वि. दा. सावरकर यांच्या नावाचा उल्लेख नाही. सावरकर यांचा जन्म 28 मे 1883 रोजी भगूर, नाशिक येथे झाला. त्यांनी जवळपास पन्नासच्यावर पुस्तके लिहिली. त्यात 1857 चे स्वातंत्र्यसमर, संगीत उत्तरक्रिया, काळे पाणी, गांधी आणि गोंधळ, जोसेफ मॅझिनी, महाकाव्य कमला, महाकाव्य गोमांतक, माझी जन्मठेप, मोपल्यांचे बंड , शत्रूच्या शिबिरात, संन्यस्त खड्ग आणि बोधिवृक्ष, सावरकरांच्या कविता, क्ष – किरणें अशा अनेक पुस्तकांचा समावेश आहे. मात्र, असे असूनही सावरकरांच्या नावाचा स्पष्ट उल्लेख साहित्य संमेलन गीतात नाही. विशेष म्हणजे संमेलन गीतामध्ये साम्यवादापासून ते थेट ‘भुजाभुजातील समता करते स्वागत शब्दप्रभूंचे’ असा उल्लेख आढळतो. नाशिकमधील इतर सर्वच साहित्यिकांचा नावासह उल्लेख आला आहे. मात्र, सावरकरांच्या नावाचा उल्लेख टाळल्याची चर्चा आहे. दरम्यान याबाबत, गीतकार मिलिंद गांधी म्हणाले की, ‘कविता आणि गीत लिहिताना थोडे स्वातंत्र्य घेतले जाते. त्यामुळे साहित्य संमेलनाच्या गाण्यामध्ये ‘स्वातंत्र्याचे सूर्य’ असा उल्लेख आहे. तो एकट्या स्वातंत्र्यवीर सावरकरांसाठीच नव्हे, तर त्यांच्या कुटुंबीयांच्या योगदानासाठीही आहे. हे आपण समजून घेतले पाहिजे. विशेष म्हणजे गाण्याची सुरुवात रामकथा, सोपान, निवृत्ती आदी संत आणि शिवरायांच्या नावासह आहे. सावरकरांसाठी स्वतंत्र ओळ दिली आहे. आपण कविता आणि गाण्याचा अर्थ समजून घ्यावा. मी स्वतः सावकरप्रेमी आहे. मला सावरकरांबद्दल नितांत आदर आहे.’

असे आहे संमेलन गीत…

अनंत आमुची ध्येयासक्त अक्षरशक्ती
अक्षरभक्ती गोदाकाठी मायमराठी
ग्यानपर्वणी साहित्याची आली गोदाकाठी
अभिमानाने गर्जा आता जयजय माय मराठी

रामकथेचा पट उलगडला इथल्या मातीवरती
ध्यानाने सोपान गाठता मुक्त होय निवृत्ती
गडकिल्ले हे शिवरायांना सदैव वंदन करती
स्वातंत्र्याचे सूर्य उगवले अनंत क्षितीजावरती

मराठीस या अभिजाताचा लावू तिलक ललाटी
अभिमानाने गर्जा आता जयजय माय मराठी

गोविंदांची कवणे करती पूजन स्वातंत्र्याचे
ज्ञानपीठ कवितेचे ठरले रम्य गाव कुसुमांचे
वसंत फुलता नाटक झाले भूषण महाराष्ट्राचे
फटकारे वामनदादा अन् बाबूराव आबांचे

पुस्तकयात्रा संस्कृतीची रसिकांच्या ये भेटी
अभिमानाने गर्जा आता जयजय माय मराठी

गोदागौरव राज कवींचे स्मृतीचित्र लक्ष्मीचे
श्रीपादांनी बीज रुजवले इथे साम्यवादाचे
जलसे भीमरावांचे ठरले वादळ नवक्रांतीचे
रंग बहरले आदमबाबा जोयांच्या शायरीचे
मुक्त शाहिरी प्रतापजींची अजून येते ओठी
नाशिक तू एक सुंदर कविता आहे गोदाकाठी

गीत बहरले योगेशाचे गाणे गोपाळाचे
लावणीस लावण्य लाभले पंढरीच्या शब्दांचे
काव्य बहरले अरुणचे अन् किशोर आनंदाचे
दार उघडले मुरलीच्या शोधाने इतिहासाचे
परंपरा ही साहित्याची या नाशिकला मोठी
अभिमानाने गर्जा आता जयजय माय मराठी

चित्रमहर्षी सूरतपस्वी वैभव नटश्रेष्ठांचे
जनस्थान हे कर्मवीरांचे लोकहितवादाचे
उद्योगाचे पर्यटनाचे शहर कला क्रीडाचे
भुजाभुजातील समता करते स्वागत शब्दप्रभूंचे
जयंत आले हसरे तारे घेऊन भेटींसाठी
अभिमानाने गर्जा आता जयजय माय मराठी

ग्यानपर्वणी साहित्याची आली गोदाकाठी
अभिमानाने गर्जा आता जयजय माय मराठी

दरम्यान, सावरकरप्रेमींनी सावरकरांचा उल्लेख जाणूनबुजून वगळल्याचे म्हटले आहे. याबद्दल सावरकर अभ्यासक पार्थ बावस्कर म्हणाले की, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे मराठी साहित्यात मोठे योगदान आहे. सागरा प्राण तळमळला असो की, त्यांच्या इतर कविता. काळे पाणी, माझी जन्मठेप अशी खूप साहित्य संपदा त्यांनी लिहिली. विज्ञाननिष्ठ म्हणून त्यांची ओळख होती. त्यांचा जन्म भगूर, नाशिकचा. खरे तर त्यांना प्रसिद्धीची वगैरे गरज नाही. मात्र, केवळ ते हिंदुत्ववादी होते म्हणून त्यांच्या नावाचा उल्लेख टाळणे हा खोडसाळपणा आहे. भगूर आणि नाशिकमधील अनेक सावरकरप्रेमींनी साहित्य संमेलनात सावरकरांच्या नावाचे एखादे व्यासपीठ उभारावे, अशी मागणी केली आहे. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष जयंत नारळीकर हे स्वतः विज्ञाननिष्ठ आहेत. ते नक्की आमच्या भावना समजून घेतील. भाषणात सावरकरांचा उल्लेख करतील,’ असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

कविता आणि गीत लिहिताना थोडे स्वातंत्र्य घेतले जाते. त्यामुळे गाण्यामध्ये ‘स्वातंत्र्याचे सूर्य’ असा उल्लेख आहे. तो एकट्या सावरकरांसाठीच नव्हे, तर त्यांच्या कुटुंबीयांच्या योगदानासाठीही आहे. मी स्वतः सावरकरप्रेमी आहे. मला सावरकरांबद्दल नितांत आदर आहे.
– मिलिंद गांधी, गीतकार

स्वातंत्र्यवीर सावरकरांना प्रसिद्धीची गरज नाही. मात्र, केवळ ते हिंदुत्ववादी होते म्हणून त्यांच्या नावाचा उल्लेख टाळणे हा खोडसाळपणा आहे. सावरकरप्रेमींनी साहित्य संमेलनात सावरकरांच्या नावाचे व्यासपीठ उभारावे, अशी मागणी केली आहे. पाहू आयोजक काय भूमिका घेतात ते.
– पार्थ बावस्कर, सावरकरप्रेमी आणि अभ्यासक

इतर बातम्याः

रामकुंडावर छटपूजेला परवानगी नाही; कोरोना प्रसार टाळण्यासाठी नाशिक पोलिसांचा निर्णय

कोरोनाकाळात सेवा बजावणाऱ्या 983 कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान नाही; नाशिक पालिकेच्या महासभेत मुद्दा गाजणार