पाऊस वैरी होऊन आला, शेताची मशागत सुरु असताना अचानक वीज कोसळली, तिघांचा मृत्यू, दोन गंभीर जखमी

| Updated on: Jun 08, 2021 | 7:27 PM

शेतात काम सुरु असताना अचानक ढगांच्या गडगडाटासह पाऊस सुरु झाला. यावेळी काम सुरु असलेल्या शेतातच वीज कोसळली (Three killed in lightning strike on farm in Bhandara ),

पाऊस वैरी होऊन आला, शेताची मशागत सुरु असताना अचानक वीज कोसळली, तिघांचा मृत्यू, दोन गंभीर जखमी
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

भंडारा : शेतात काम सुरु असताना अचानक ढगांच्या गडगडाटासह पाऊस सुरु झाला. यावेळी काम सुरु असलेल्या शेतातच वीज कोसळली. या दुर्घटनेत 3 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. संबंधित घटना ही भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील खमारी (बूज) गावात घडली आहे. या दुर्घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे (Three killed in lightning strike on farm in Bhandara).

तीन मजुरांचा जागीच मृत्यू

खमारी (बूज) गावात रतीलाल उपराडे यांच्या शेतात मशागतीचे काम सूरु होते. यावेळी अचानक विजेच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस सूरु झाला. यावेळी शेतात काम करणाऱ्या 3 मजुरांच्या अंगावर वीज पडली. या दुर्घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. मृतकांमध्ये 2 महिला आणि एका पुरुष मजुराचा सामवेश आहे. तसेच शेतमालक रतीलाल उपरडे आणि त्यांची मुलगी पल्लवी असे दोघं बाप-लेक गंभीर जखमी झाले (Three killed in lightning strike on farm in Bhandara).

जखमी बाप-लेकीवर उपचार सुरु

अनिता फातू सवालाखे (वय 45 वर्ष), आशा संपत दमाहे (वय 46 वर्ष), सहीक फीरतलाल उपराडे (वय 48 वर्ष) असं मृतकांची नावे आहेत. तर रतीलाल उपराडे आणि पल्लवी रतीलाल उपराडे असे जखमींचे नावे आहेत. जखमी बाप-लेकीवर सध्या भंडारा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर मृतकांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल

या दुर्घटनेनंतर शेतात बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली. या घटनेबाबत पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलीस आणि प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. दरम्यान, मृतक आणि जखमींच्या नातेवाईकांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

धुळ्यातही शेतात वीज कोसळली

धुळे जिल्ह्यात बुरझड येथे देखील शेतात वीज कोसळल्याची घटना समोर आली आहे. संबंधित घटना दोन दिवसांपूर्वी रविवारी (6 जून) घडली होती. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. पण शेतकऱ्याने शेतात साठवून ठेवलेला तब्बल 300 क्विंटल कांदा जळून खाक झाला होता. ही दुर्घटना ताजी असतानाच आता भंडाऱ्यात वीज कोसळल्याची घटना समोर आली आहे.

संबंधित बातमी : तळहाताच्या फोडासारखं पिकांना जपलं, वीज पडून 350 क्विंटल कांद्याचा कोळसा, शेतकऱ्याला अश्रू अनावर