मुंबई : आजच विधान परिषदेसाठी (Vidhan Parishad) काँग्रेस, भाजप, आणि शिवसेनेचे उमेदवार जाहीर झाले. यात जी नावं बाहेर आली ती अनेकांची राजकीय अस्वस्था वाढवणारी निघाली आणि यातूनच आता नाराजीनाट्य सुरू झालंय. काही वेळापूर्वीच शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांनी फडणवीसांची (Devendra Fadnavis) भेट घेत भाजपने मित्रपक्षांचा विश्वासघात का केला? असा थेट सवाल केला आहे. तर आता दुसरीकडे काँग्रेसमध्येही तशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण काँग्रेसच्या काही नेत्यांनीही पक्षश्रेष्ठींकडे हंडोरेंनी यांच्या उमेदवारीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एवढंच नाही. तर काँग्रेस नेते नसीम खानही परिषदेची उमेदवारी न मिळाल्याने चांगलेच संतापले आहेत. हंडोरे यांनी पक्षासाठी आजपर्यंत काय केलं? असा थेट सवाल त्यांनी काँग्रेस नेते एच. के. पाटील यांच्याकडे केला आहे.
मागेच काही दिवसांपूर्वी इम्रान प्रतापगढी यांची उमेदवारी जाहीर झाल्यावरही काँग्रेसमध्ये असेच नाराजीचे सूर दिसून आले होते. काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा हा थेट सोनिया गांधी यांच्याकडे दिला होता. त्यानंतर आमच्यात कोणीही नाराज नाही अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात आणि इतर काँग्रेस नेते देताना दिसून आले आहेत. काँग्रेसमध्ये नाराजी नाही, राज्यसभा निवडणुकीत आमचे चारंही उमेदवार निवडणूक येतील. इमरान प्रतापगडी युवा नेता आहे. त्यांना महाराष्ट्रातून उमेदवारी दिली तर मुकुल वासनिक यांना राजस्थानमधून उमेदवारी दिलीय, त्यामुळे महाराष्ट्रावर अन्याय कसला? असा सवाल करत त्यांनी अंतर्गत नाराजीचे खंडण केले आहे.
भाजपने काही बड्या नेत्यांना या यादीच डच्चू देत उमेदवारी जाहीर केल्या आहेत. त्यामुले आता तिकडेही नाराजीचे नगारे वाजू लागले आहेत. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पावलोपावली भाजपची साथ देत महाविकास आघाडीवर हल्लाबोल चढवणारे, तसेच भाजपचे मित्रपक्ष असणारे शिवसंग्रामचे विनायक मेटे यांनाच यावेळी भाजपने उमेदवारी न दिल्याने संतापलेले मेटे थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचले होते. त्यामुळे हेही नाराजी नाट्य बरेच गाजले आहे. तसेच भाजपने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सरकारवर सतत हल्लाबोल चढवणारे सदाभाऊ खोत यांनाही उमेदवारी न दिल्याने ही अंतर्गत धुसफूस ही आणखी वाढण्याची शक्यात आहे. सर्वच राजकीय पक्षांसमोर आता ही अंतर्गत धुसफूस थांबवण्याचं मोठं आव्हान असणार आहे. अन्यथा आगामी काळात याचा फटका पक्षाला बसू शकतो.