कोरोनासारखीच समांतर शेअर मार्केटची लाट : 3 वर्षांत डिमॅट खाती दुप्पट !

| Updated on: Jan 17, 2022 | 10:45 AM

देशात कोरोनाचे संकट काही जणांसाठी, काही उद्योगांसाठी इष्टापती ठरले आहे. देशात कोरोनाच्या समांतर दुसरी लाट सुरु आहे. ही लाट आली आहे शेअर मार्केटमध्ये. अनेक उद्योग व व्यवसायाला कोरोनापुढे  लोटांगण घ्यावे लागत असताना, शेअर मार्केटने मात्र पाचवा गिअर टाकला आहे. शेअर मार्केटची गाडी सुसाट वेगाने धावत आहे. गेल्यावर्षी 14, हजार अंशांवरील बाजार या वर्षी 18 हजार अंशांच्या आत-बाहेर खेळत आहे. या तेजीचा फायदा घेण्यासाठी आणि कोरोना काळात झालेला तोटा भरुन काढण्यासाठी अनेकांनी शेअर मार्केटकडे मोर्चा वळविला आहे. 

कोरोनासारखीच समांतर शेअर मार्केटची लाट : 3 वर्षांत डिमॅट खाती दुप्पट !
शेअर बाजार
Follow us on

देशात कोरोनासारखीच दुसरी लाट उसळली आहे. साधक बाधक विचार न करता, तेलाच्या विहिरीसारखे किती ही तेल उपसा आणि मालामाल व्हा या मृगजळात अनेक जण शेअर मार्केटमध्ये उतरण्यासाठी धडाधड डीमॅट अकाऊंट (demat account) उघडत आहेत. इतर उद्योग रसातळाला गेलेले असताना आणि संघर्ष करत असताना भारतीय शेअर मार्केटवर कोरोना लाटेचा म्हणावा तितकडा परिणाम झालेला नाही. मार्केट अनेकदा तेजीत दिसून आले आहे. कोरोना शेअर मार्केटसाठी इष्टापती ठरले आहे.  तेजीचा फायदा घेण्यासाठी आणि कोरोना काळात झालेला तोटा भरुन काढण्यासाठी देशातील लाखो गुंतवणुकदारांनी शेअर मार्केटकडे मोर्चा वळविला आहे.

खाती झाली दुप्पट

अर्थ मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या तीन वर्षांत देशात डिमॅट खात्यांची संख्या दुप्पट झाली आहे. 2018-19 पर्यंत देशात 3.6 कोटी डिमॅट खाती होती, सरत्या वर्षांत नोव्हेंबर 2021 मध्ये ही संख्या 7.4 कोटींपर्यंत पोहचली आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी डीमॅट खाते अत्यावश्यक आहे. बँकेत गुंतवणुकीसाठी आणि बचतीसाठी जसे बँक खाते असते, तसेच शेअर बाजारात  गुंतवणुकीसाठी डीमॅट महत्वाचे असते. नवीन आकडेवारी भारतीय गुंतवणुकदारांना थक्क करणारी आहे. या आकडेवारीनुसार, गेल्या 20 वर्षांत उघडण्यात आलेल्या डिमॅट खात्यांपेक्षा या तीन वर्षांत सर्वाधिक डिमॅट खाती उघडण्यात आली आहेत. सरकार ही या आकड्यांमुळे आश्चर्यचकित झाले आहे. कोविड काळात डिमॅट अकाऊंटची आणि डिजिटल पेमेंटची समांतर लाट देशात दिसून आली. कोरोनात झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी अनेकजण एक हात मारायला काय हरकत आहे ? अशा विचाराने शेअर मार्केटकडे वळत आहेत. तर अल्पबचत योजनांचे व्याजदर कमी झाल्याने काहींना अभ्यास करुन चांगला परतावा घ्यायचा आहे. त्यासाठी धोका पत्करण्याची तयारी ही गुंतवणुकदारांनी ठेवली आहे.

तरुणांना स्टॉक बुमने झपाटले

गेल्या वर्षी एप्रिल ते ऑक्टोबर 2021 दरम्यान  1.9 कोटी खाती उघडण्यात आली. म्हणजे दरमहिन्याला 26.7 दशलक्ष खाती उघडण्यात आली. या काळात सेन्सेक्सने 48 हजार ते 62 हजारांचा टप्पा गाठला. हा मैलाचा दगड होता. कोविड लाटेसोबतच शेअर बाजारातील तेजीने ही उच्चांक गाठला. विशेष बाब म्हणजे देशात या तीन वर्षात उघडण्यात आलेल्या डिमॅट खात्यांमध्ये 3/4 खाती ही नव्या पिढीची आहे. 30 वर्षांखालील तरुणांनी ही खाती उघडली आहेत. शेअर बाजारातील तेजीने गुंतवणुकदारांना विशेष आकर्षित केले आहे. देशात ताळेबंदी असताना लोक दिवसभर घरात होते. त्यावेळी युट्युब आणि इतर ठिकाणी शेअर मार्केट व्हिडिओचे ही अमाप पिक आले आणि या लाटेत अनेकांनी आपल्या गुंतवणुकीच्या होड्या सोडल्या.

धडाधड डिमॅट अकाऊंट उघडण्यात आले असले आणि गुंतवणुकदारांनी त्यांचा मोर्चा बाजारपेठेकडे वळविला असला तरी तज्ज्ञ या बदलावर आनंद व्यक्त करताना हा आकडा अत्यंत तोकडा असल्याचे सांगत आहेत. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे इक्विटी रिसर्चचे तांत्रिक विश्लेषक चंदन तापडिया यांनी ललनटॉप या वेबसाईटशी बोलताना सांगितले की, 138 दशलक्ष लोकसंख्या असलेल्या देशात,  शेअर बाजारात केवळ 1.2 कोटी लोक गुंतवणूक करतात. आर्थिक साक्षरता जसजशी वाढत जाईल, तसतसे डेमॅट खात्यांची संख्या ही वाढेल, अशी पुश्ती त्यांनी जोडली.

अल्पबचत योजनांनी केला हिरमोड

देशाचा पूर्वीपासून अल्पबचत योजनांमध्ये गुंतवणुकीचा कल होता. परतावा कमी असला तरी जोखीम घेण्याची हिंमत भारतीय गुंतवणुकदार दाखवता नव्हता. पण या तीन वर्षात कोरोनाने अनेकांची गणिते आणि समज पार मोडित काढले. या काळात अनेकांची हातची नोकरी गेली. अनेकांचे व्यवसाय बसले. त्यातच मुदत ठेव आणि इतर बचत योजनांवरील व्याजाच्या आकड्यांनी मान टाकल्यानंतर गुंतवणुकदारांना आक्रमक पवित्रा स्वीकारणे गरजेचे वाटले. देशात त्यामुळे अल्पबचत योजनांकडे गुंतवणुकदारांनी पाठ फिरवली. त्यांचा हिरमोड शेअर बाजाराला फायदाचा ठरला.

डिजिटल पेमेंटची ऐतिहासिक चढाई

ब्रोकरेज फर्म सीएलएसएच्या मते, भारतातील डिजिटल पेमेंटचे मूल्य वार्षिक 300 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचले आहे. त्यात यूपीआय पेमेंटचा वाटा 60 टक्क्यांपर्यंत आहे. 2026 पर्यंत, भारतातील डिजिटल पेमेंटचे मूल्य 1 ट्रिलियन डॉलर्सच्या पलीकडे जाईल, असा अंदाज आहे.   इंटरनेट, स्मार्ट मोबाईल आणि अपग्रेडेड वॅलेट पेमेंट अॅपमुळे भारतीयांचे जीवन अधिक सूकर झाले आहे. उठता, बसता, झोपताना, जेवताना, चालताना, फिरताना केव्हांही पैशांची करता येणारी देवाण-घेवाणीमुळे भारतीयांना व्यवहारात गती आली आहे.  डिजिटल पेमेंटची सवय लोकांमध्ये डेमॅट मालमत्तेवर विश्वास निर्माण करीत आहे. मोबाइलमधील पैसे  शेअर्स, म्युच्युअल फंड, गोल्ड ईटीएफ खरेदीसाठी सहज वापरता येऊ लागले आहे. त्यामुळे गुंतवणुकीच्या सवयीत अमुलाग्र बदल दिसून येत आहे.

इतर बातम्याः

महाराष्ट्र पक्षीमित्र संघटेला 40 वर्षे पूर्ण; आजवर 64 संमेलनांचे आयोजन, पर्यावरण चळवळीच्या अनोख्या कार्याला उजाळा…!

Nashik Jobs : घरबसल्या नोकरी मिळवा; नाशिकमध्ये ऑनलाईन रोजगार मेळावा, कसे व्हाल सहभागी?

Nashik Corona : नाशिक जिल्ह्यात 16 कोविड सेंटर सुरू; कुठे मिळतायत उपचार?