‘हा देश मोदी आणि अमित शाह यांच्या बापाचा नाही’, काँग्रेस नेत्याची जीभ घसरली

| Updated on: Jan 16, 2020 | 12:58 PM

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करत असताना पश्चिम बंगालचे काँग्रेस नेता खासदार अधीर रंजन चौधरी यांची जीभ घसरली.

हा देश मोदी आणि अमित शाह यांच्या बापाचा नाही, काँग्रेस नेत्याची जीभ घसरली
तामिळनाडूतील भाजप नेत्यांमुळे भाजपच्या पक्षश्रेष्ठींवर तोंडघशी पडण्याची वेळ
Follow us on

कोलकाता : देशात नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू झाला असला तरी काँग्रेसकडून अजूनही या कायद्याला विरोध केला जात आहे. या कायद्याला विरोध करत असताना पश्चिम बंगालचे काँग्रेस नेता खासदार अधीर रंजन चौधरी यांची जीभ घसरली (Adhir Ranjan Chowdhury slams PM Narendra Modi and Amit Shah). “हा देश पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या बापाचा नाही”, अशा शब्दात अधीर रंजन चौधरी यांनी टीका केली.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह जे बोलणार तेच होणार, ही बाब आम्हाला मान्य नाही. हा देश नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या बापाचा देश नाही. हा देश कुणाच्या बापाची संपत्ती नाही. ही बाब मोदी-शहा यांना समाजयला हवी”, असे अधीर रंजन चौधरी म्हणाले (Adhir Ranjan Chowdhury slams PM Narendra Modi and Amit Shah).

मोदी सरकारवर टीका करत असताना अधीर रंजन चौधरी म्हणाले की, “भाजपचे नेते काँग्रेस नेत्यांना म्हणजे आम्हाला पाकिस्तानी म्हणून हिणवतात. मात्र, मी आता त्यांना सांगू इच्छितो की, हो आहे मी पाकिस्तानी! तुम्हाला जे करायचं आहे ते करा. आज देशात कुणीच खरं बोलू शकत नाही. कारण जे खरं बोलतात त्यांना देशद्रोही ठरवलं जातं.”

काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी हे नेहमी वादग्रस्त वक्तव्यावरुन चर्चेत राहतात. दोन दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये पोलीस उपअधीक्षक देवेंद्र सिंह यांना दहशतवाद्यांसह अटक करण्यात आले. याबाबतही चौधरी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला होता. “देवेंद्र सिंह यांचे नाव देवेंद्र खान असते तर आरएसएसच्या ट्रोल आर्मीने आतापर्यंत प्रचंड टीका केली असते”, असं चौधरी म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतरही वाद झाला होता. हा वाद मिटत नाही तेवढ्यात त्यांनी मोदी-शाह यांच्याविरोधात वक्तव्य केलं आहे.

याअगोदर लोकसभेत अधीर रंजन चौधरी यांनी जम्मू-काश्मीरचा मुद्दा हा आंतरराष्ट्रीय मुद्दा आहे, असं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यावरुनदेखील भाजपने त्यांच्यावर प्रचंड टीका केली होती.