India-maldive Row : भारतासाठी आली बॅडन्यूज, मालदीवच्या लोकांचा भारताला मोठा झटका

| Updated on: Apr 22, 2024 | 4:46 PM

India-maldive relation : मालदीवमधून भारतासाठी वाईट बातमी आली आहे. कारण भारत मालदीवसोबत संबंध चांगले करण्याचा प्रयत्न करत असताना आता मालदीवच्या जनतेने भारताला मोठा धक्का दिला आहे. मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांच्या भूमिकेला मालदीवच्या लोकांनी पाठिंबा दिल्याचं चित्र आहे.

India-maldive Row : भारतासाठी आली बॅडन्यूज, मालदीवच्या लोकांचा भारताला मोठा झटका
Follow us on

India-Maldive Relation : भारत आणि मालदीव यांच्यात तणाव कायम आहे. मालदीवमध्ये भारतविरोधी भूमिका घेणारे राष्ट्राध्यक्ष सत्तेवर आल्याने भारताची हिंद महासागरातील पकड कमी झाली आहे. मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू हे चीन समर्थक मानले जातात. त्यामुळेचे ते भारतविरोधी वक्तव्य आणि भूमिका घेत आहेत. पण असं असताना आता आता मालदीवमध्ये संसदीय निवडणुकीत चीनच्या तालावर नाचणाऱ्या राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांच्या ‘पीपल्स मजलिस’ या पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले आहे. निवडणुकीत मुइज्जू यांच्या पक्षाने 93 पैकी 70 जागा जिंकल्या आहेत. मुइज्जू यांच्या पक्षाला मिळालेल्या या यशामुळे चीन आनंदी आहे. त्यामुळेच या विजयाबद्दल चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सर्वप्रथम मुइज्जू यांचे अभिनंदन केले आहे. मालदीवच्या लोकांच्या निवडीचा आदर करतो, असे चीनने म्हटले आहे. चीनने मालदीव सरकारसोबत आपली धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यास उत्सुक असल्याचेही जाहीर केले.

मालदीवबाबतचे धोरण बदलणार भारत?

दुसरीकडे तज्ज्ञांनी भारताला मालदीवबाबतचे धोरण बदलण्याचा सल्ला दिला आहे. कारण भारत अजूनही मालदीवचे कोणताही द्वेष मनात न ठेवता मालदीवला मदत करत आहे. मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांनी मालदीवमध्ये उपस्थित असलेले भारतीय लष्कराच्या जवानांना माघारी बोलवण्याच्या सूचना केल्या होता. त्यांनी भारतासोबतचा करार देखील रद्द केला. त्यामुळे भारताला मोठा झटका बसला होता. मालदीवचे हिंद महासागरातील स्थान खूप महत्त्वाचे मानले जाते. भारत मालदीवच्या मदतीने हिंद महासागरावर लक्ष ठेवत होता. त्यामुळे चीनला येथे कोणत्याही हरकती करता येत नव्हत्या.

चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांचे अभिनंदन केले. मालदीवशी आपली पारंपारिक मैत्री कायम ठेवण्यासाठी चीन काम करण्यास तयार आहे. मालदीवसोबत विविध क्षेत्रात सहकार्य वाढवण्यास आणि धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्यास चीन इच्छुक आहे. एकीकडे चीन मुइज्जूचे अभिनंदन करत आहे.

भारताचे माजी परराष्ट्र सचिव कंवल सिब्बल यांनी म्हटले की, मालदीवमधील संसदीय निवडणुकीत मुइज्जू यांच्या विजयामुळे त्यांच्या चिथावणीबद्दल भारताच्या मवाळ वृत्तीवर विपरीत परिणाम झाला आहे. यावरून मालदीवमधील लोकांचे भारतविरोधी आणि चीन समर्थक भावनेला पाठिंबा असल्याचे दिसून येते. त्यामुळे भारताला आपल्या दृष्टिकोनात बदल करण्याची गरज आहे. मुइज्जू यांच्या पक्षाने संसदीय निवडणुकीत 70 जागा जिंकून “प्रचंड बहुमत” मिळवले आहे.

मालदीवमध्ये माजी राष्ट्राध्यक्ष इब्राहिम सोलिह यांच्या नेतृत्वाखालील मालदीवियन डेमोक्रॅटिक पार्टीने (एमडीपी) गेल्या संसदीय निवडणुकीत 65 जागा जिंकल्या होत्या, मात्र यावेळी त्यांना केवळ 15 जागा मिळाल्या आहेत.

भारताचा प्रभाव कमी करायचा आहे: मुइज्जू

चीनचे समर्थक मुइज्जू यांनी म्हटले की, त्यांना आपल्या देशातील भारताचा प्रभाव कमी करायचा आहे. 2019 च्या निवडणुकीत, तत्कालीन सत्ताधारी पक्ष MDP ने 64 जागांसह संसदेत बहुमत मिळवले होते, तर तत्कालीन विरोधी PPM-PNC युतीला फक्त आठ जागा मिळाल्या.

हिंद महासागरात मोक्याच्या ठिकाणी असल्याने मालदीवला भारत महत्त्व देत आला आहे. कारण या भागातून मोठ्या प्रमाणात व्यापार केला जातो. त्यामुळे मालदीवला महत्त्व आहे. पण असं असलं तरी भारताने आता लक्षद्वीपला विकसित करण्यासाठी पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे. इतकंच नाही तर मालदीवमधील एका बेटावर भारताने विमानांना उतरण्यासाठी धावपट्टी देखील विकसित करण्यास सुरुवात केली आहे. इतकंच नाही तर भारत या ठिकाणी युद्ध नौका देखील तैनात करु शकणार आहे. हे बेट मालदीवपासून फक्त काही किलोमीटरवर आहे.