जपानच्या धर्तीवर उभं राहिलेलं मियावाकी जंगल नेमकं कसंय? PM नरेंद्र मोदींनी लोकार्पण केलंय… वाचा!

| Updated on: Oct 31, 2022 | 2:52 PM

कमी वेळात जास्त वनराई, जपानच्या अकीरा मियावाकी यांनी विकसित केलेलं जंगल नेमकं कसंय?

जपानच्या धर्तीवर उभं राहिलेलं मियावाकी जंगल नेमकं कसंय? PM नरेंद्र मोदींनी लोकार्पण केलंय... वाचा!
Image Credit source: social media
Follow us on

अहमदाबादः पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त सोमवारी स्टॅच्यु ऑफ युनिटीला (Statue Of Unity) भेट दिली. लोहपुरुषाला श्रद्धांजली वाहिली. या वेळी त्यांनी गुजरातमध्ये जपानमधील मियावाकी तंत्रज्ञानाच्या आधारे विकसित केलेल्या जंगलाचं (Miyawaki forest) लोकार्पण केलं. जपानमधील बॉटनिस्ट अकीरा मियावाकी यांनी हे कमी वेळात घनदाट जंगल उभं करण्याची ही पद्धती विकसित केली. गुजरातमधील केवडिया इथं हे जंगल विकसित करण्यात आलंय. हवामान बदलाचा परिणाम कमी करणे आणि पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी हे जंगल उभारण्यात आलंय.

दोन एकरात पसरलेल्या या जंगलात फर्निचरसाठीची झाडं, फळझाडं, औषधी वनस्पती तसेच फुलझाडं आहेत.

मियावाकी जंगल नेमकं काय?

मियावाकी जंगल खास पद्धतीने विकसित केलं जातंय. ते दीर्घकाळ हिरवं राहतं. फक्त त्यांना गरजेनुसार, वातावरण मिळालं पाहिजे. कमी वेळात जास्त हिरवाई आणि जास्तीत जास्त ऑक्सिजन देणं ही या जंगलाची खासियत.

जंगलाचे निर्माते बॉटनिस्ट अकीरा मियावाकी यांच्या मते, मंदिर, चर्च किंवा इतर धार्मिक स्थळांवरील वृक्ष अत्यंत प्राचीन असतात. तेथील अनेक झाडं आपोआप उगवलेली असतात. त्यामुळे ती वर्षानुवर्षे तशीच राहतात. झाडांच्या याच वैशिष्ट्याचा आधार घेत मियावाकी जंगलाची पद्धती विकसित करण्यात आली.

नैसर्गिक पद्धतीनेच झाडं उगवली तर ती अधिक काळ टिकून राहतात. वेगाने फुलतात, फळं धारण करतात. दीर्घकाळ हिरवी राहतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मियावाकी जंगलाचं लोकार्पण-

मियावाकी जंगलाची 5 वैशिष्ट्य-

  1.  ज्या ठिकाणी जंगल विकसित करायचंय, तेथील स्थानिक वातावरणानुसारच झाडं लावावी. बियांपासून झाडं लावायची असतील तर तेथील मातीतून उगवलेल्या झाडाच्याच बिया हव्यात. या बियांपासून आधी नर्सरीत रोपं उगवावीत आणि नंतर जंगलाच्या ठिकाणी लावावी.
  2. जिथं जंगल विकसित करायचंय, तिथे लाकडी भुसा, शेण, सेंद्रिय खत किंवा नारळाच्या शेंट्या टाकून जमिनीचा पोत वाढवावा. नर्सरीतून आणलेली रोपटी अर्ध्या फुटाच्या अंतारने लावावीत. गर्द झाडी असलेली, मध्यम आकारची आणि लहान आकाराची झाडे अशा तीन वर्गवारीनुसार झाडं लावावीत. जेणेकरून ती एकमेकांच्या मदतीने वाढतात.
  3.  रोपटी लावल्यानंतर त्यांच्या आजू-बाजूला गवत, सुकी पानं टाकावीत. त्यामुळे जमिनीची आर्द्रता टिकून राहते. तीव्र ऊन असल्यावर एक थर म्हणून हे झाडांची सुरक्षा करते. 2 ते 3 वर्ष देखभाल केल्यास ते जंगलासारखे विकसित होते.
  4.  या तंत्रज्ञानाने झाडं कमी वेळात भराभर वाढतात. कमी खर्चात 10 पट वेगाने आणि 30 पट जास्त घनदाट जंगल तयार होते. त्यामुळे हवामानावर याचा प्रतिकुल परिणाम होणार नाही.
  5.  या पद्धतीने रोपटी लावण्यासाठी सर्वात उत्तम काळ मान्सूना असतो. पावसाच्या पाण्याने झाडं लवकर लागतात. त्यांना देखभालीची गरज कमी पडते. कमी जागेत जास्त झाडे असल्याने हे जंगल ऑक्सिजन बँकेसारखं काम करतं.