चर्चा महाराष्ट्र सरकारवरच्या संकटाची, पण संकटात भाजपचं उत्तराखंड सरकार, काही महिन्यात तिसरा मुख्यमंत्री निवडण्याची नामुष्की?

| Updated on: Jul 02, 2021 | 11:12 PM

महाराष्ट्रातलं ठाकरे सरकार पाडण्याची आणि त्यावर आलेल्या संकटाची चर्चा होतेय. पण आज अचानक भाजपचं उत्तराखंडमधलं सरकार संकटात सापडलंय. अवघ्या काही महिन्यात तिसरा मुख्यमंत्री निवडण्याची वेळ भाजपावर आलेली आहे.

चर्चा महाराष्ट्र सरकारवरच्या संकटाची, पण संकटात भाजपचं उत्तराखंड सरकार, काही महिन्यात तिसरा मुख्यमंत्री निवडण्याची नामुष्की?
Follow us on

देहरादून : गेल्या काही काळापासून म्हणजेच महाराष्ट्रात सरकार ठाकरे सरकार अस्तित्वात आलंय तेव्हापासून ते पडण्याची चर्चा आहे. भाजपचे नेते नारायण राणे हे तर दर काही दिवसांनी सरकार पडण्याची एक नवी तारीख देतात. पश्चिम बंगालमध्ये ममतांचा पराभव होताच महाराष्ट्रातल्या ठाकरे सरकारचा निकाल लागणार अशा वावड्या उठल्या होत्या. त्या आताही थांबल्यात असं नाही. गुप्त बैठका, नेत्यांच्या दिल्ली वाऱ्या आणि भाजप नेत्यांचे ठाकरे सरकारवरचे हल्ले पहाता, अजूनही महाराष्ट्रातलं ठाकरे सरकार पाडण्याची आणि त्यावर आलेल्या संकटाची चर्चा होतेय. पण आज अचानक भाजपचं उत्तराखंडमधलं सरकार संकटात सापडलंय. अवघ्या काही महिन्यात तिसरा मुख्यमंत्री निवडण्याची वेळ भाजपावर आलेली आहे (Know why BJP need to select third CM for Uttarakhand in single term).

भाजपशासित उत्तराखंडचे विद्यमान मुख्यमंत्री तीरथ सिंह (Tirath Singh Rawat) यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊ केला. यानंतर उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) राज्यात राजकीय संकट निर्माण झालंय. तीरथ सिंह रावत यांनी संवैधानिक संकट असल्याचं सांगत राजीनामा दिलाय. त्यांनी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांना पत्र लिहून आपला राजीनामा सादर केलाय. यामुळे भाजपला देवभूमीत काही महिन्यात तिसरा मुख्यमंत्री निवडण्याची वेळ आलीय. त्यामुळे तेथे असं काय घडलं ज्यामुळे भाजपवर ही वेळ आली असा प्रश्न उपस्थित केला जातोय. तसेच यावरुन अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. तीरथ सिंह रावत यांनी भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना पत्र लिहून राजीनाम्याचं कारण सांगितलंय.

रावत यांनी भाजप अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात काय म्हटलंय?

जेपी नड्डा यांना लिहिलेल्या पत्रात संविधानाच्या कलम 164-अ चा उल्लेख करत तीरथ सिंह रावत म्हणाले, “मुख्यमंत्र्यांना 6 महिन्याच्या आत विधानसभा सदस्य होणं अपेक्षित आहे. मात्र, कलम 151 प्रमाणे राज्यातील विधानसभा निवडणुका होण्यास केवळ 1 वर्षाचा कालावधी शिल्लक असेल तर पोटनिवडणूक घेता येत नाही. त्यामुळे राज्यात संवैधानिक संकट तयार होऊ नये म्हणून मी राजीनामा देऊ इच्छित आहे.”

पहिले मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांना राजीनामा का द्यावा लागला होता?

मागील पंचवार्षिक निवडणुकीत विजय मिळवल्यावर उत्तराखंडमध्ये पहिल्यांदा भाजपचे नेते त्रिवेंद्र सिंह यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर 4 वर्षे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम केल्यानंतर त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्रिवेंद्र सिंह रावत यांना पक्षांतर्गत विरोध होत असल्यानं हा निर्णय घेण्यात आला होता. यानंतर केंद्रीय नेतृत्वाने मुख्यमंत्री बदलाचा निर्णय घेतला.

यानंतर तीरथ सिंह रावत यांनी 10 मार्च रोजी उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तीरथ सिंह रावत पौरी लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. तीरथ सिंह रावत यांना मुख्यमंत्री बनवण्यात आलं तेव्हा अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. कारण ते या शर्यातीतच नव्हते. आता नव्याने येणाऱ्या तिसऱ्या मुख्यमंत्र्यासमोर उरलेले दिवस कारभार पाहण्याचं मोठं आव्हान असणार आहे.

हेही वाचा :

उत्तराखंडमध्ये राजकीय संकट, मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांचा राजीनामा, कारण काय?

कोरोना सुद्धा एक जीव, त्यालाही जगण्याचा अधिकार; भाजपच्या माजी मुख्यमंत्र्यांचं अजब तर्कट

‘जास्त धान्य मिळवण्यासाठी तुम्ही अधिक मुलं जन्माला का घालत नाही?’ उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांचं आणखी एक वादग्रस्त विधान

व्हिडीओ पाहा :

Know why BJP need to select third CM for Uttarakhand in single term