ज्यांची कमाई बंद केली, ते सगळे एकत्र झालेत : पंतप्रधान मोदी

| Updated on: Jul 05, 2019 | 4:41 PM

भुवनेश्वर, ओदिशा : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ओदिशातून विरोधकांचा पुन्हा एकदा समाचार घेतलाय. उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि बहुजन समाजवादी पार्टीच्या युतीवरही त्यांनी नाव न घेता निशाणा साधला. मोदीला ते स्वतःच्या मार्गातून बाजूला सारण्यासाठी एकत्र येत आहेत, असं मोदी म्हणाले. हा चौकीदार गरीबांची कमाई लुटणाऱ्या प्रत्येकाचा खेळ बंद करणार आहे, असा इशाराही मोदींनी दिला. विरोधकांचे महाआघाडीचे […]

ज्यांची कमाई बंद केली, ते सगळे एकत्र झालेत : पंतप्रधान मोदी
Follow us on

भुवनेश्वर, ओदिशा : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ओदिशातून विरोधकांचा पुन्हा एकदा समाचार घेतलाय. उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि बहुजन समाजवादी पार्टीच्या युतीवरही त्यांनी नाव न घेता निशाणा साधला. मोदीला ते स्वतःच्या मार्गातून बाजूला सारण्यासाठी एकत्र येत आहेत, असं मोदी म्हणाले. हा चौकीदार गरीबांची कमाई लुटणाऱ्या प्रत्येकाचा खेळ बंद करणार आहे, असा इशाराही मोदींनी दिला.

विरोधकांचे महाआघाडीचे प्रयत्न आणि सपा-बसपाचं मनोमिलन यावर मोदींनी कडाडून टीका केली. देशात आज मोदीविरोधात कट रचला जातोय, खोटे आरोप लावले जातात. मोदीला त्यांच्या मार्गातून दूर करण्यासाठी हे एकत्र होत आहेत. जगन्नाथांच्या भूमीवरुन तुम्हाला वचन देतो, ज्यांनी गरीबाला लुटलंय, त्यांना शिक्षा दिल्याशिवाय हा चौकीदार शांत बसणार नाही, असं मोदी म्हणाले.

आमचं सरकार आल्यानंतर सहा कोटी बनावट रेशन कार्ड, बनावट गॅस कनेक्शन, स्कॉलरशिपचे खोटे लाभार्थी, बनावट पेंशनधारक यांना शोधून काढलं. जे दलाल हा सरकारी पैसा खात होते, त्यांची कमाई बंद केली आहे. ज्यांनी कधी जन्मच घेतला नव्हता, त्यांच्या नावाने सरकारी पैसा लुटला जात होता, असं मोदींनी सांगितलं.

केंद्र सरकार 24-25 रुपये किलोने खरेदी केलेला गहू गरीबांना 2 ते 3 रुपये किलोने विकते, 30 किलो रुपयाचा तांदूळ 3 रुपयांनी विकला जातोय. याअगोदर मधले दलाल जे होते, ते गरीबांच्या हक्काचं खात होते. दलालांमुळे गरीबापर्यंत काहीही पोहोचत नव्हतं आणि सर्व धान्य विकलं असं सांगितलं जायचं. परिणामी गरीबांना पोट भरण्यासाठी दुकानातून महागडं धान्य खरेदी करावं लागायचं. पण दलालांना कुणाचीही भीती नव्हती. कारण, कुणी काही करतच नव्हतं. आमच्या सरकारने हे सगळं बंद केलं, असं सांगत मोदींनी काँग्रेसवरही निशाणा साधला.

आम्ही यांची झोप उडवली आहे. यांच्या डोळ्यात आम्ही खटकतोय. हे लोक, ज्यांनी अनुदानाचे 90 हजार कोटी रुपये लुटले. या पैशातून हे विमानाने फिरायचे, गाडी-बंगले खरेदी केले. ज्यांच्या तिजोरीत हा पैसा जाणं बंद झालं, ते आता माझा बदला घेण्यासाठी उतावीळ झाले आहेत, असं म्हणत विरोधकांच्या एकत्र येण्यावर मोदींनी हल्लाबोल केला.