Devendra Fadnavis: मनातून नाराज असताना दाखवलेला मनाचा मोठेपणा; देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय खेळी मागची कहाणी

| Updated on: Jul 03, 2022 | 12:05 AM

राज्यसभेतला आकड्यांचा खेळ, धनंजय महाडिकांचा अपनेक्षित विजय, सेनेला अद्दल घडवण्याचा प्रयत्न मग विधान परीषदेतही आमदार फोडून दाखवलेला करीश्मा आणि नंतर थेट सेनेच्या आमदारांचं बंड किंवा सेनेच्या भाषेत पळवापळवी. या सगळ्यात यशस्वी होऊनही मी पदाचा लोभी नाही हे दाखवून पत्रकार परिषद घेत दाखवलेली दिलदार वृत्ती.

Devendra Fadnavis: मनातून नाराज असताना दाखवलेला मनाचा मोठेपणा; देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय खेळी मागची कहाणी
Follow us on

राजकारणात जे सर्वोच्च पदावर विराजमान होतात, त्यामागे त्यांची मेहनत आणि नशिबाचा भागही खूप महत्त्वाचा असतो. मात्र एकदा त्या पदावर ती व्यक्ती गेली की आपल्या आसपास येतेय, किंवा आपल्यापेक्षा सरस ठरतेय, किंवा आपल्यापेक्षा उंची वाढतेय, किंवा आपल्याच पदाला धक्का लावू शकेल असं सर्वोच्च नेत्याला जाणवलं की त्या व्यक्तीचे पंख छाटलेच म्हणून समजा. हे सगळं वर्णन महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या तंतोतंत लागू होतंय. याचं कारण असं की गोव्यापासून विजयाचे शिल्पकार अशी बिरुदीवली मिरवणारॆ देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) हे विरोधी पक्षनेते होऊनही भाजपच्या पथ्थ्यावरच पडलेत.

राज्यसभेतला आकड्यांचा खेळ, धनंजय महाडिकांचा अपनेक्षित विजय, सेनेला अद्दल घडवण्याचा प्रयत्न मग विधान परीषदेतही आमदार फोडून दाखवलेला करीश्मा आणि नंतर थेट सेनेच्या आमदारांचं बंड किंवा सेनेच्या भाषेत पळवापळवी. या सगळ्यात यशस्वी होऊनही मी पदाचा लोभी नाही हे दाखवून पत्रकार परिषद घेत दाखवलेली दिलदार वृत्ती.

आता इथवर सगळंच जादुई आणि अशक्य ते शक्य करणारे अवलिया फडणवीस झाले होते. पण नेमके दुपारी ३ ते ७ या काळात धडाधड घडामोडी घडल्या अन् पक्षशिस्त ध्यानात घेत फडणवीसांना, इच्छा नसताना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावीच लागली. आता १०० टक्के लोक याला अवनती, खच्चीकरण असेच शब्द वापरतायत, पण हे खच्चीतरण वा अवनती असेल तर ती का हे समजून घेऊया. लेखाची सुरुवात करतानाच मी नेतृत्व गुण-अवगुणांची ओझरती झलक दाखवली. आता टप्प्या टप्प्यात पाहू…

  1. राजकारण हे अतर्क्य घटनांचं व्यासपीठ असतं, तिथे अनेक घटना भुवया उंचावणाऱ्याच घडतात.
  2. दरवेळी नेतृत्वाला खुशमस्करीच हवी असते असं नाही, तर सदर व्यक्तिच्या वेगवेगळ्या परिस्थितीत कस कसा लागतो, व कर्तृत्वाची झलकही पहायची असते.
  3.  नेतृत्व संधी देतं ते याचसाठी की, तुम्ही स्वतःला सिद्ध करून दाखवावं, त्यांच्या विश्वासावर खरं उतरावं.
  4. आता वरील सर्व बाबींत देवेंद्र फडणवीसांनी ९० टक्के बाजी मारलीच होती.
  5. गोव्याच्या निवडणुकीत मनोहर पर्रीकरांच्या पुत्राची उत्पल यांची नाराजी ओढवूनही अनपेक्षित विजय
  6. गोव्यात भाजपला बहुमत मिळवत सरकारची स्थापना
  7. राज्यसभेत शिवसेनेचा उमेदवार पाडून जास्तीचा उमेदवार आकड्यांच्या चपखल खेळानं निवडून आणणं
  8. विधान परिषदेत सर्व उमेदवार निवडून आणत, आमदार फुटीचं जबरदस्त राजकारण
  9. त्याच रात्रीतून आमदारांची व्यवस्था व्हाया सुरत गुवाहाटी मग गोवा अशी करत सुरक्षित ठेवणं. (जे अजून भाजपनं मान्य केलं नसलं तरी ते सर्वश्रुतच)
  10. आता प्रश्न हा येतो की पक्षासाठी इतकं सगळं करणारा तर मुख्यपदीच हवा, पण तसं झालं नाही कारण, इथे केंद्रीय नेतृत्व बऱ्याच काळापासून या सगळ्यावर लक्ष ठेऊन होतं आणि केंद्रातील जोडगोळी खासकरून अमित शाह यांचं काटेकोर नियोजन असं होतं, की शिवसेनेला संदेश की आमचं बाळासाहेब व त्यांच्या कडवट सैनिकावर प्रेम व विश्वास आहे
  11. हा पक्ष पदासाठी हापापलेला नाही
  12. बंद दाराआड चर्चा झालेलीच नव्हती तर मुख्यमंत्रीपदाचा प्रश्न येतोच कुठे?
  13. मात्र तरीही जर शाहांनी ठरवलं तर ते कोणालाही सर्वोच्चपदी आणि स्वपक्षीय माजी मुख्यमंत्र्यालाही नमवू शकतात
  14. केंद्रीय नेतृत्वपदी असणारी व्यक्ती श्रेय घेण्यासाठी हपापलेली नसते, पण वेळ आली का ती, ते अशा पद्धतीने सिद्ध करते. जसं फडणवीसांच्या बाबतीत झालं
  15. तुम्ही कितीही उडालात तरी पंख देणारे, छाटणारे, पुन्हा देणारे आम्हीच आहोत, हा फडणवीसांसह पक्षातील नेत्यांना संदेश
  16. कमी वयात मिळालेलं यश कधी अंगात भिनून अहंकारात रुपांतरीत होईल हे सांगता येत नाही, त्यासाठी काही खेळी कराव्या लागतात.
  17. नेतृत्व गुण ज्यांच्या अंगी असतात ते अपमान किंवा अवनतीही पचवू शकतात का, याची चाचपणी होत असते
  18. आम्ही संधी देऊ, तेंव्हा कोणत्याही संधीचं सोनं करून दाखवा
  19. येत्या काळातल्या महापालिका, मग कर्नाटक, मग लोकसभा निवडणुकात काम करावं लागणार त्यामुळे दिलेल्या संधीतून फायदा उचला
  20. पण आमच्याच डोक्यावर मिरे वाटाल तर आपटायला कमी करणार नाही

हे सर्व मुद्दे राजकारणात तसे नवे नाहीत. पण केलेल्या उत्तम कर्माचं फळ चाखायची घाई राजकारणात चालत नाही. तसे केलेच तर ती फळं कडू लागू लागतात. असो थोडक्यात सार असा. तूच घडविसी, तूच फोडिसी, कुरवाऴीशी तू, तूच ताडीसी, नकळे यातून काय जोडिसी…या ओळी विठ्ठलाला उद्देशून ग.दि.माडगुळकरांनी लिहिलेल्या असल्या तरी या ओळींना साजेसे अनेक ठिकाणच्या नेतृत्वाचे वर्तन असते.. असो सरतेशेवटी एवढंच म्हणेन की राजकारणात प्रत्येकाला बाप असतोच, आणि योग्य वेळी तो ज्याला-त्याला इंगा दाखवतो. नव्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना शुभेच्छा!

प्रज्ञा कुलकर्णी हस्तक