Special Report: तुझं हसणं माझ्या जगण्याची भाकरीय; जगात सर्वाधिक वाचल्या जाणाऱ्या एका मुलखावेगळ्या कवीची गोष्ट!

| Updated on: Nov 03, 2021 | 11:24 AM

लोर्का म्हणायचा, ‘त्याची कविता शाई नाही. रक्तासारखी आहे.’ स्पेनच्या इतिहासात या कवीनं लढलेलं गृहयुद्ध अजरामर झालं.

Special Report: तुझं हसणं माझ्या जगण्याची भाकरीय; जगात सर्वाधिक वाचल्या जाणाऱ्या एका मुलखावेगळ्या कवीची गोष्ट!
पाब्लो नेरुदा, कवी.
Follow us on

तो म्हणायचा, ‘जे कवितेला राजकारणापासून वेगळं करू पाहतात, ते कवितेचे शत्रू असतात.’ त्यानं कवित्या लिहिल्या. त्याचा कवितांची राख करून क्रांतिकारी मैदानात उतरले. लोर्का म्हणायचा, ‘त्याची कविता शाई नाही. रक्तासारखी आहे.’ स्पेनच्या इतिहासात या कवीनं लढलेलं गृहयुद्ध अजरामर झालं.

त्याचं खरं नाव होतं, रिकार्दो नेफ्ताली रेएस बासोआल्तो. तो म्हणायचा, ‘जे कवितेला राजकारणापासून वेगळं करू पाहतात, ते कवितेचे शत्रू असतात.’ त्यानं वयाच्या दहाव्या वर्षांपासून कविता लिहणं सुरू केलं. त्याच्या शाळेत त्या काळची नावाजलेली कवयित्री मुलींच्या वर्गाची शिक्षिका होती. लुसीला गोदाई अलाकयागा असं त्यांचं नाव. त्या ‘गाब्रीयला मिस्त्राल’ या टोपण नावानं कविता लिहायच्या. त्यांना पुढं नोबेल ही मिळालं. त्याच्या त्या पहिल्या गुरू. तो भरपूर वाचायचा, पण त्याची असली थेरं वडिलांना आवडायची नाहीत. मग त्याच्या कविता प्रसिद्ध होणं, तर खूप दूरची गोष्ट. मग त्यानं थोडं डोकं चालवलं. स्पॅनिश भाषेतला ‘पाब्लो’ आणि चेक लेखक यान नेरुदातला ‘नेरुदा’ शब्द उचलला. हे दोन शब्द जोडून त्यानं स्वतःचं टोपण नाव तयार केलं. पाब्लो नेरुदाचा जन्म असा झाला. वयाच्या अठराव्या वर्षी त्याचं पहिलं पुस्तक आलं. काही महिने गेले. त्यानं आपल्या कविता एका अनोळखी प्रकाशकाकडं पाठवल्या. त्या त्यानं नाकारल्या. शेवटी त्यांनं आपली ओळख वापरून तो काव्यसंग्रह प्रसिद्ध करायला लावला. ‘वीस प्रेम कविता आणि निराशेचं एक गाणं.’ त्याच्या पाचशे प्रती काढलेल्या. नेरुदानं मांडणी, आशय, अभिव्यक्ती या सगळ्यांची उलथापालथ केलेली. समकालीन कवितेला हा हाबाडा होता. समीक्षकांना या प्रेमकविता छछोर, थिल्लर वाटल्या. त्यांनी त्याच्याविरोधात मोहीम उघडली. नेरुदा काही कमी नव्हता. त्यानं आपली कविता कशी चांगली, हे मांडण्यासाठी एक फळी तयार केली. अशी घमासान एकीकडे. तर यापासून कोसोमैल दूर असणारा तरुणवर्ग या प्रेमकवितांवर लट्टू झालेला. प्रकाशक आवृत्त्यामागून आवृत्त्या काढत होता. चिलीतल्या गल्लीबोळातल्या मुलांच्या ओठी फक्त त्याच्या कविता होत्या. पियानोवर त्याच्याच शब्दांचे बोल होते.

पाब्लो नेरुदा कविता वाचताना.

I can write
The saddest poem of all tonight
I loved her,
And sometimes she
Loved me too

***

I crave your mouth,
Your voice, your hair
Silent and starving,
I prowl through the streets.
Breads does not nourish me,
Dawn disrupts me, all day
I hunt for the liquid
Mesure of your steps

बरं तो पक्का डावा. तो ज्या संघटनेत, मित्रांत काम करायचा ते सगळे क्रांतीच्या विचारानं भारलेले. हे सगळं त्याच्या कवितेतून, जगण्यातून ओसंडून यायचं. मूल्यांची मोडतोड करायला त्याला विशेष आवडायची. तो नैतिकता तपासून पाहायचा. तो स्वच्छंदी, मुक्त जगायचा. त्याच्या कवितेच्या पुस्तकानं त्याचं जगणं बदललं. रातोरात त्याला सुपरस्टार केलं. मात्र, त्यानं घर सोडलेलं. हातात काम नाही. खिशात कवडी नाही. त्याची अवस्था अशी की, चप्पल शिवणंही त्याला जमत नव्हतं. एका लोकप्रिय कवीची ही खबरबात चिली सरकारपर्यंत, अधिकाऱ्यापर्यंत पोहचली. तिकडं कवींना, लेखकांना नोकरी देण्याची प्रथाय. त्यांनी त्यालाही संधी दिली. अन् दुतावासात नेमलं. तो नोकरीच्या निमित्तानं जगभर फिरला. पुढं राजदूत म्हणून स्पेन गाठलं. तिथं डाव्या चळवळीतला कवी, नाटककार लोर्का त्याचा जिगरी दोस्त. तो काळ स्पेनमधल्या गृहकलहाचा. फॅसिस्ट विचाराच्या जनरल फ्रैंकोनं तिथलं सिंहासन काबीज केलेलं. त्याला हिटलर, मुसोलिनीची साथ. याविरोधात डावे राजकारणी आणि कवी एकत्र आले. त्यांनी माद्रिद इथं हुकूमशाहांना विरोध म्हणून एक मोर्चा काढला. लोर्का या आंदोलनाचा कर्ताधर्ता. अनेक कवींनी कविता लिहल्या, नाटकं काढली, पत्रकं वाटली. हे आंदोलन चिरडण्यासाठी फ्रैंकोचं सैन्य माद्रिदला पोहचलं. त्यांनी अनेकांच्या कत्तली केल्या. लोर्काला बेड्या ठोकल्या. त्यानं आमचा दोष काय, असं विचारलं. तेव्हा उत्तर आलं, ‘बंदुकीनं जितकं आमचं नुकसान केलं नाही, तितकं तुमच्या शब्दांनी केलंय.’ दोन दिवसांत लोर्काच्या मृत्यूची बातमी धडकली. नेरुदाला मोठा धक्का होता. ‘ही लोर्काची नव्हे, तर कवितेची हत्याय,’ अशी तळमळ त्यानं व्यक्त केली. तिथून फॅसिस्टांविरुद्ध आपल्या लिखाणातून शड्डू ठोकला. लोर्का म्हणायचा, ‘नेरुदाची कविता शाई नाही. रक्तासारखी आहे.’

‘स्पेनच्या गल्लीबोळातून
चिमुकल्यांच्या रक्ताचे
पाट वाहताना
आता मी कसं
फुलं आणि सुगंधावर लिहू…’

नेरुदाचं जगात सर्वाधिक वाचलं जाणारं पुस्तक.

नेरुदांच्या कवितांनी रिपब्लिकन सैन्यांमध्ये उत्साह भरला. सगळ्यांच्या ओठी त्याची गाणी, त्याच्या कविता होत्या. त्यांनी फॅसिस्टांचे झेंडे काढले. झेंड्याच्या लगद्यापासून कागद तयार केला. त्यावर नेरुदांच्या कविता लिहल्या. ती पत्रकं घरोघर वाटली. या काळात नेरुदासोबत मचादो, अलबेर्ती असे अनेक कवी होते. स्पेनच्या इतिहासात या काळाचा उल्लेख ‘कवींनी लढलेलं गृहयुद्ध,’ असा केला जातो. नेरुदा आयुष्याच्या उत्तरार्धात चिलीमध्ये होता. तिथं सैलवॉडॉर अलेंदे यांचं सरकार सत्तेवर आलं. लोकशाही मार्गानं सत्येवर आलेलं ते पहिलं डावं सरकार. त्या काळात नेरुदाची फ्रान्सचा राजदूत म्हणून नियुक्ती झाली. त्याच काळात त्याला नोबेल मिळालं. मात्र, तीन वर्षांत हे सरकार चिलीचा सैन्यप्रमुख ऑगस्टो पिनोचेनं उलथावून टाकलं. त्यात अलेंदेंचा मृत्यू झाला. हजारो लोकांचं शिरकाण केलं गेलं. त्या काळात नेरुदाला कॅन्सर झालेला. तो चिलीतल्या आपल्या घरात पडून हा नरसंहार थांबवा म्हणून प्रार्थना करत होता. मात्र, अलेंदेंच्या मृत्यूनंतर बाराव्या दिवशी या कवीनं प्राण सोडला. तेव्हा सैनिकांनी त्याचं घर उद्धवस्त केलं. काही मित्रांनी नेरुदाची अंत्ययात्रा काढली. देशभर कर्फ्यू लागलेला. मात्र, शेवटच्या श्वासापर्यंत हुकूमशाहीविरुद्ध लडणाऱ्या या कवीला अखेरचा निरोप देण्यासाठी हजारो लोकांच्या झुंडी रस्त्यावर उतरल्या. भरलेल्या गळ्यानं ते त्याचंच गीत गात होते…

‘लोकांच्या एकीला
कुठलीही ताकद
हरवू शकत नाही’

पाब्लो नेरुदाच्या मृत्यूबद्दलही साशंकता आहे. नेरुदाची पत्नी माल्टिडेच्या म्हणण्यानुसार, ‘नेरुदाला झालेला कॅन्सर जीवावर बेतण्या इतका नव्हता.’ त्याचा ड्राइव्हर अराया म्हणतो, ‘ज्या दिवशी नेरुदानं अखेरचा श्वास घेतला, त्या दिवशी त्याच्या पोटात इंजेक्शन दिलं.’ त्यानं असं बरंच पचवलं. नेरुदानं एका ठिकाणी लिहलंय. ‘माझं सगळं सुख, दुःख, एकटेपणा, अश्रू माझ्या कवितेत आहेत. माझ्या प्रत्येक स्वप्नाला माझ्या कवितेनं बळ दिलं. मी माझ्या कवितेसाठी जगलो. ज्या-ज्या गोष्टीसाठी संघर्ष केला, त्या सगळ्यांचं पालनपोषण माझ्या कवितेनं केलं. प्रेम करणं, गाणं गाण्यासाठी खूप कष्ट, संघर्ष करावा लागला. जिकणं आणि पराभूत होणं माझ्या जगण्याचा भाग आहे. मी भाकरी आणि रक्ताची चव चाखलीय. एका कवीला यापेक्षा अजून काय हवं असतं?’ नेरुदाची ही कविताही त्याचीच तर साक्ष देते…

घाबरलीयस तू
गरिबीला
फाटलेल्या चपला घालून
जुन्या कपड्यांमध्ये
तुला बाजारात जायचं नाहीय
माझ्या प्रेमा
कुबेरांना आपल्याला
या अवस्थेत पाहावं
हे मला बिल्कुल आवडणार नाही
या गरिबीला
आपण उखडून टाकूयात
त्या दुष्ट दातासारखं
जो अजूनही
माणसांचं ह्रद्यय कुरतडतोय
पण तुला
असं घाबरलेलं
पाहायचं नाहीय
जर माझ्या चुकीमुळं ती
तुझ्या घरात येतेय
तुझी सोनेरी चप्पल
ओढून नेतेय
तर ती तिला ओढू देऊ नकोस
तुझं हसणं
माझ्या जगण्याची भाकरीय
तू घरभाडं देऊ शकत नसलीस तर
तुझ्या स्वाभिमानी पावलांसह
कामाच्या शोधात बाहेर पड
आणि लक्षात ठेव
माझ्या प्रेमा
तू माझ्या देखरेखीखाली आहेस
आपण सोबत असणं
हीच सर्वात मोठी संपत्तीय
पृथ्वीवर कधी तरीच
ती अनुभवता येते

पाब्लो नेरुदा हा जगप्रसिद्ध कवी इथंच चिरनिद्रा घेत आहे.

(Special Report: Pablo Neruda, the story of the most read poet in the world)

इतर बातम्याः

कोणताही शत्रू शुद्र नसतो, पंकजांचे नाशिकमध्ये सूचक वक्तव्य, त्यांच्या मनात सल आहे तरी काय?

सोमय्यांना आधी कळतं अन् नंतर कारवाई होते, देशमुख अटकेवर भुजबळांची प्रतिक्रिया; देशभर असे प्रकार सुरू असल्याचा दावा

OBC आरक्षणावर घटना दुरुस्ती होईपर्यंत आपण सर्व ओबीसी पर्व; नाशिकमध्ये पंकजांच्या उपस्थितीमध्ये भुजबळांचा नारा!