PHOTO | औरंगाबादेत रंगांची उधळण करणाऱ्या फुलांचे ताटवे, फुलले झकाऽऽस पठार
सातारा जिल्ह्यातील कांस पठारावरील नयनरम्य फुलांचे ताटवे आजवर अनेक पर्यटनप्रेमींनी डोळ्यांत साठवले असतील. पण आता हे नेत्रसुख आपल्या मराठवाड्यातही अनुभवता येणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यात चार ठिकाणी अशा प्रकारचे प्रयोग केले जात आहे.
1 / 4
सातारा जिल्ह्यातील कांस पठारावरील नयनरम्य फुलांचे ताटवे आजवर अनेक पर्यटनप्रेमींनी डोळ्यांत साठवले असतील. पण आता हे नेत्रसुख आपल्या मराठवाड्यातही अनुभवता येणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यात चार ठिकाणी अशा प्रकारचे प्रयोग केले जात आहे. कन्नड तालुक्यातील गौताळ्याजवळ 12 हेक्टर, सारोळ्याजवळ 12 हेक्टर, खडीपिंपळगाव (ता. खुलताबाद) येथे साडे तीन हेक्टर तर अजिंठा व्ह्यू पॉइंटजवळ दोन हेक्टरवर हे झकास पठार फुलवण्याचे काम सुरु आहे.
2 / 4
जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांच्या कल्पनेतून हा प्रकल्प आकार घेत आहे. तीन महिन्यांपूर्वी उन्हाळ्यात गौताळ्यातील 12 हेक्टरवर विविध प्रकारच्या 40 वनस्पतींची बियाणे टाकण्यात आले होते. त्यात पांढरा, जांभळा, गुलाबी,लाल, पिलळा, नारंगी अशा सहा रंगांच्या झिनिया जातीच्या फुलझाडांचाही समावेश होता. आता या झाडांना चांगलाच बहार आला आहे. पुढील पाच वर्षात हा प्रकल्प पूर्णत्वास येईल, असे गोंदवले यांनी सांगितले.
3 / 4
सदरचे फोटो गौताळ्यातील पूरणपूर व सीताखोरीच्या व्ह्यू पॉइंटपासून दोन किलोमीटर अंतरावरील पठाराचे आहे. सभोवताली डोंगर, दऱ्या, खळखळून वाहणारे धबधबे अन् बहरलेल्या निसर्गातून पायवाट तुडवत तिथे जावे लागते. या ठिकाणी काही व्ह्यू पॉइंटदेखील तयार करण्यात आले आहेत. तेथून पर्यटक फुलांचे ताटवे पाहू शकतील. पूरणवाडीचे ग्रामसेवक के.व्ही. गायके यांनी सांगितले की, ''एकेकाळी भकास वाटणारे हे माळरान आता झक्कास वाटत असून एखाद्या चित्रपटाच्या चित्रीकरणासारखे दृश्य दिसत आहे. पर्यटकांसाठी हे आकर्षणाचे केंद्र बनत असून या माध्यमातून गावाचाही विकास होईल.''
4 / 4
पूरणगावात 40 प्रकारच्या वनस्पतींचे 45 किलो व तागाचे 60 किलो बियाणे लावले आहे. तर पाणथळ जमिनीवर पांढऱ्या फुलांची दुधाडी, गुलाबी गोधडी, जांभळी मंजिरी पाहायला मिळते. मुरमाड भागात पिवळ्या रंगाची सोनकीची फुले आहेत. विंचवी, पांढरा गुलाबी, लाल रंगाचा तेरडा, जांभळा रंगाची गवती तिळवण, खुळखुळा, अंबाडी, ताग हेदेखील आले आहेत. झकास पठार बहरल्यामुळे या भागात फुलपाखरे, मधमाशा व इतर पक्ष्यांचा सहवास वाढला आहे. प्रत्येक फुलावर मधमाशा, भुंगे दिसून येतात. इकोसिस्टिमही चांगल्या पद्धतीने वाढत आहे. पूर्वीच्या हंगामी नैसर्गिक वनस्पतींना कुठलाही धक्का न लावता नव्या वनस्पतींचे रोपण करण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी ७५ लाखांचा निधी मंजूर आहे. आतापर्यंत २५ लाख खर्च झाले आहेत. पर्यटकांनी झकास पठारचा आनंद घ्यावा, फक्त फुले तोडू नयेत, असे आवाहन डॉ. गोंदवले यांनी केले आहे.