जळगाव जिल्ह्यात वादळी वारं आणि मान्सूनपूर्व पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. जळगाव जिल्ह्यातील केळी बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकसानाची पाहणी केलीय.
देवेंद्र फडणवीस यांच्या पाहणी दौऱ्यात त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या स्नुषा आणि भाजप खासदार रक्षा खडसे सोबत होत्या.
मुक्ताईनगर तालुक्यातील इचंदा इथल्या केळीबागांचं संपूर्ण नुकसान झालंय. रावेर तालुक्यातील ऐनपूर, सुलवाडी, कोळदा, धामोडी, चिंचपाडा, खिरडी इत्यादी गावांमध्ये वादळाने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. काही गावांमध्ये घरांचे नुकसान, तर अनेक गावांमध्ये केळीच्या बागांचे प्रचंड नुकसान झाल्याचं फडणवीस म्हणाले.
एका जिल्ह्याचा प्रश्न असल्याने भरीव मदत सरकारने केली तरी फार आर्थिक ताण राज्य सरकारवर येणार नाही. त्यामुळे मोठी मदत शेतकर्यांना केली गेली पाहिजे. विमा कंपन्यांनी सरसकट नुकसानभरपाई द्यावी आणि शेतकर्यांपुढे कोणत्याही अडचणी निर्माण करू नयेत. ज्यांचा विमा नाही, त्यांनाही मदत दिली पाहिजे. आपल्या सरकारच्या काळात विमा काढला असे समजून मदत देण्यात आली होती, असं फडणवीस म्हणाले.
5 ते 6 लाख खर्च करून शेतकर्यांचे संपूर्ण नुकसान झाले आहे. शेतकर्यांच्या व्यथा मोठ्या आहेत. केळीसंदर्भातील पीकविम्याचे निकष बदलल्याबद्दल अनेक शेतकर्यांनी संताप व्यक्त केला. आम्ही वारंवार विनंती केली की, शेतकर्यांकडून सुलतानी वसुली करू नका, असं आवाहन फडणवीस यांनी केलंय.
मुक्ताईनगर तालुक्यातील मेंढळदा या गावांत अनेक घरांची पडझड झाली आहे. काही घरांवर वृक्ष पडले आहेत. घरांचं नुकसान झालेल्या नागरिकांनाही तातडीने मदत देण्याची मागणी फडणवीस यांनी केलीय.