बदलापुरातील मुळगावात शेकडोंच्या गर्दीत खंडोबाचा लग्न सोहळा पार पडला. यावेळी झालेली गर्दी प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी ठरली.
कोरोनाचे सर्व नियम या गर्दीनं पायदळी तुडवल्यानं आता कुणाकुणावर कारवाई करायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं कडक नियमावली जारी करत दिवसा जमामवबंदी आणि रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. पण त्याचं पालन होत नसल्याचं धक्कादायक वास्तव बदलापुरातील घटनेनं अधोरेखित केलंय.
मुळगावच्या डोंगरावर मोठ्या उत्साहात आणि थाटामाट खंडोबाच्या लग्न सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं.
यावेळी लग्नसोहळ्यासाठी उपस्थित असलेल्यांनी मास्कही लावले नसल्याचं चित्र पाहायला मिळालं.
बदलापूर ग्रामीण पोलिसांना याबाबत माहिती नव्हती की जाणीवपूर्वक या लग्नसोहळ्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं, असाही प्रश्न उपस्थित केला जातोय.
मर्यादित लोकांच्या उपस्थिती लग्न सोहळे करण्याची परवानगी सरकारनं दिली आहे. अनेक सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. मात्र मुळगावात तर सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा वाजल्याचं यावेळी पाहायला मिळालंय.
आता या गर्दीसाठी नेमकं जबाबदार कोण? जबाबदार लोकांवर कारवाई होणार का? जबाबदार लोकांवर कारवाई कोण करणार? असाही प्रश्न उपस्थित झाला आहे.