
राष्ट्रपती राम नाथ कोविंद दिव-दमणच्या चार दिवसीय दौऱ्यावर असून, या दरम्यान त्यांनी ‘घोघला बीच’ या दिवच्या प्रसिद्ध समुद्र किनाऱ्याला भेट दिली.

‘ब्ल्यू फ्लॅग’ने सन्मानित या समुद्र किनाऱ्यावर राष्ट्रपतींनी ‘मॉर्निंग वॉक’ देखील केला.

कोणत्याही समुद्र किनाऱ्याला ‘ब्लू फ्लॅग’ प्रमाणपत्रे चार वेगवेगळ्या विभागांत प्रदान केली जातात. ज्यात पर्यावरणीय शिक्षण आणि माहिती, पाण्याची गुणवत्ता, पर्यावरण व्यवस्थापन आणि संवर्धन, समुद्रकिनार्यावरील सुविधा व सुरक्षा यांचा समावेश आहे.

‘घोघला बीच’ हे पर्यटकांचे आवडते ठिकाण असून, इथून दिसणारे सूर्योदय आणि सूर्यास्ताचे दृश्य सगळ्यांचेच मन मोहून टाकते.

अतिशय स्वच्छ समुद्र किनारा आणि इथले निळेशार पाणी यामुळेच या समुद्राला ‘ब्ल्यू फ्लॅग’चा सन्मान मिळाला आहे.

यावर्षी केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने ‘ब्ल्यू फ्लॅग’ या प्रमाणपत्रासाठी आठ समुद्र किनाऱ्यांचा प्रस्ताव पाठवला होता. त्या सर्वांचा स्वीकार करण्यात आला होता. ‘ब्लू फ्लॅग’ सर्टिफिकेशनच्या 50 देशांमध्ये भारताने अव्वल स्थान मिळवले, ही फार अभिमानाची बाब आहे.