Udhav Thackeray: संजयचा मला अभिमान, राऊतांच्या ईडी अटकेवर उद्धव ठाकरेंची पहिली थेट प्रतिक्रिया

| Updated on: Aug 01, 2022 | 3:13 PM

जे शरण झाले हमाममध्ये गेले आंघोळीला गेले. जोपर्यंत सत्तेचा फेस अंगावर आहे तोपर्यंत गेलेले आमच्यावर टीका करू शकतात. फेस गेल्यावर परिस्थितीची जाणीव होईल. त्यानतंर फेस उतरला तर ते काय आहेत हे लोकांसमोर येईल, अशी पहिली प्रतिक्रिया ठाकरेंनी दिली आहे. 

Udhav Thackeray: संजयचा मला अभिमान, राऊतांच्या ईडी अटकेवर उद्धव ठाकरेंची पहिली थेट प्रतिक्रिया
संजयचा मला अभिमान, राऊतांच्या ईडी अटकेवर उद्धव ठाकरेंची पहिली थेट प्रतिक्रिया
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : संजय राऊतांच्या (ED Arrested Sanjay Raut अटकेनंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी आज जाऊन राऊतांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे. त्यानंतर तातडीची पत्रकार परिषद घेत त्यांनी भाजपवर पुन्हा हल्लाबोल चढवला आहे. तसेच भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा (JP Nadda) यांनाही ललकारलं आहे. तर संजय राऊतांबद्दल मला नक्कीच अभिमान आहे. संजय माझा जुना मित्र आहे. मी त्याच्या कुटुंबीयांना भेटलो. गुन्हा काय संजयचा. पत्रकार आहे. शिवसैनिक आहे. निर्भिड आहे. जे पटत नाही ते बोलतोय. मरण आलं तरी शरण जाणार नाही. हे त्याचं वाक्य चांगलं आहे. तोही शरण जाऊ शकला असता. जे शरण झाले हमाममध्ये गेले आंघोळीला गेले. जोपर्यंत सत्तेचा फेस अंगावर आहे तोपर्यंत गेलेले आमच्यावर टीका करू शकतात. फेस गेल्यावर परिस्थितीची जाणीव होईल. त्यानतंर फेस उतरला तर ते काय आहेत हे लोकांसमोर येईल, अशी पहिली प्रतिक्रिया ठाकरेंनी दिली आहे.

जे. पी. नड्डा यांनाही थेट ललकारलं

तर केवळ सोबत येतील ते नाही तर जे गुलाम होतील ते काही काळ आपले. काम संपल्यावर नवीन गुलाम येतील हे गुलाम जातील. गुलामगिरीकडे वाटचाल आहे. त्याचा निषेध केला पहािजे
राऊतांबद्दल मला अभिमान आहे. ज्या पद्धतीने नड्डा पक्ष वाढवत आहेत. ठिक आहे. राजकारण म्हटलं की त्याची बुद्धीबळाशी तुलना करतो. आजच्या राजकारणात बुद्धिचा नाही बळाचा वापर केला जात आहे. नुसते बळ तुमच्याकडे आहे. म्हणून तुम्ही इतरांना संपवण्याच्या मागे लागणार असला तर दिवस सर्वदा सारखे नसतात. दिवस फिरतात. दिवस फिरले तर याचा विचार नड्डा आणि भाजपने करावा, असे म्हणत त्यांनी नड्डा यांनाही थेट ललकारलं आहे.

ठाकरेंची जनतेलाही साद

तसेच सर्वच लोकांनी आता डोळे उघडून पाहायला पाहिजे. जिथे नेऊ इच्छितात तिथे नेऊ देणं त्यात मदत करायची की नाही हे सामान्य नागरिकांनी ठरवायची वेळ आली आहे. भाजप सोबत लढणारी आज कोणताच राजकीय पक्ष नाही. कोणताच विचार राष्ट्रीय स्तरावर नाही, इतर संपले. जे संपले नाहीत ते संपतील. फक्त आपणच टिकणार हे वक्तव्य देशाला हुकूमशाहीकडे आहे. महाराष्ट्रात शिवसेना संपणार आहे. हे त्यांनी करूनच पाहावं. भाजपचा वंश कुठून सुरू झाला हे पाहायचं आहे. इतर पक्षातील लोक त्यांच्याकडे येत आहे. तर भाजपचा वंश कोणत आहे. आजचं त्यांचं राजकारण निर्घृण आणि घृणास्पद आहे, अशी साद त्यांनी लोकांनाही घातली आहे.