हिंगोलीत राजीव सातवांची जवळपास माघार, शिवसेनेचीही उमेदवारासाठी शोधाशोध

| Updated on: Jul 05, 2019 | 4:14 PM

हिंगोली : 2014 च्या निवडणुकीत काँग्रेसला राज्यात फक्त दोन जागा मिळाल्या होत्या. त्यापैकी एक नांदेड आणि दुसरी अत्यंत कमी फरकाने जिंकलेली जागा म्हणजे हिंगोली. पण यावेळी हिंगोलीत काँग्रेसचं चित्र थंड आहे. विद्यमान खासदार राजीव सातव यांच्यावर गुजरातची जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांचा चेहरा पाहणंही हिंगोलीकरांना दुर्मिळ झालंय. राजीव सातवांनी निवडणूक लढायची की नाही याचा निर्णय काँग्रेस […]

हिंगोलीत राजीव सातवांची जवळपास माघार, शिवसेनेचीही उमेदवारासाठी शोधाशोध
Follow us on

हिंगोली : 2014 च्या निवडणुकीत काँग्रेसला राज्यात फक्त दोन जागा मिळाल्या होत्या. त्यापैकी एक नांदेड आणि दुसरी अत्यंत कमी फरकाने जिंकलेली जागा म्हणजे हिंगोली. पण यावेळी हिंगोलीत काँग्रेसचं चित्र थंड आहे. विद्यमान खासदार राजीव सातव यांच्यावर गुजरातची जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांचा चेहरा पाहणंही हिंगोलीकरांना दुर्मिळ झालंय. राजीव सातवांनी निवडणूक लढायची की नाही याचा निर्णय काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर ढकललाय.

काँग्रेसचा प्रचार संथगतीने

युती आणि आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास ठरला आहे. आघाडीमध्ये हिंगोलीची जागा काँग्रेसच्या वाट्याला आहे. पण जिल्ह्यात तीन गटांमध्ये विभागलेल्या काँग्रेसचा प्रचार सध्या संथगतीने दिसतोय. स्थानिक नेत्यांकडून प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे. पण या प्रचाराला अजून मोठ्या नेत्याने बळ दिलेलं नाही. हिंगोलीत माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि राजीव सातव या तीन नेत्यांचे तीन गट आहेत. अशोक चव्हाण आणि भाऊराव पाटील यांच्यात नुकतीच बैठक झाल्याने हे तीनही गट मिळून कामाला लागले आहेत.

काँग्रेसची संभावित नावं

राजीव सातव यांच्यावर गुजरातची जबाबदारी असल्याने निवडणुकीबाबतचा संपूर्ण निर्णय त्यांनी राहुल गांधींर ढकललाय. राजीव सातव यांनी निवडणूक न लढल्यास हिंगोलीत उमेदवार कोण असा प्रश्न आहे. कळमनुरीचे काँग्रेस आमदार संतोष टारफे हे काँग्रेसकडून लोकसभेसाठी इच्छुक आहेत. शिवाय वकील शिवाजीराव जाधव यांनाही ऐनवेळी काँग्रेसची उमेदवारी मिळू शकते. शिवाजीराव जाधव गेल्या निवडणुकीत भाजपकडून लढणार होते. त्यांनी प्रचारही सुरु केला होता. पण युतीत ही जागा शिवसेनेला गेल्याने त्यांची निराशा झाली. अखेर ते अपक्ष लढले आणि 50 हजारांपेक्षा जास्त मते घेतली होती. त्यामुळे काँग्रेसकडून त्यांच्याही नावाचा विचार सुरु असल्याची माहिती आहे.

शिवसेनेचा उमेदवार अजूनही गुलदस्त्यात

शिवसेना आणि भाजप यांच्या युतीत ही जागा शिवसेनेकडे आहे. पण शिवसेनेनेही अजून उमेदवार यादी जाहीर केलेली नाही. 2014 मध्ये शिवसेनेचे -सुभाष वानखेडे यांना 4 लाख 65 हजार 765 इतकी मतं पडली होती. तर काँग्रेसचे विद्यमान खासदार राजीव सातव यांना 4 लाख 67 हजार 397 मतं मिळाली होती. मोदी लाटेत 1632 मतांनी राजीव सातव यांचा विजय झाला. त्या निवडणुकीत मुंदडा गटाकडून राजीव सातव यांना छुप्या पद्धतीने मदत करण्यात आल्याचा आरोप होता. कारण, हिंगोलीत शिवसेनेचे दोन गट होते, ज्याचा फटका उमेदवाराला बसला. सुभाष वानखेडे सध्या भाजपात आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या उमेदवाराबद्दलही सस्पेन्स कायम आहे. नांदेडचे शिवसेना आमदार हेमंत पाटील आणि वसमत विधानसभेचे आमदार जयप्रकाश मुंदडा यांच्या नावाची शिवसेनेकडून सध्या चर्चा सुरु आहे. एकीकडे निवडणुकीची धामधूम सुरु असताना उमेदवारच ठरला नसल्याने शिवसेनेच्या आणि भाजपच्याही कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे.

भाजप-शिवसेनेच्या इच्छुकांची यादी

डॉ. जयप्रकाश मुंदडा हे वसमतचे विद्यमान आमदार 2019 ची लोकसभा लढण्यास इच्छुक आहेत. पण त्यांची म्हणावी तशी लोकसभा मतदारसंघावर पकड नाही. येथे जातीय समीकरणावर निवडणुका लढविल्या जातात. शिवाय पक्षांतर्गत त्यांना मोठा विरोध आहे. हा मतदारसंघ तसा शिवसेनेकडे झुकलेलाही आहे ही त्यांच्यासाठीची जमेची बाजू आहे. शिवसेनेकडून डॉ. बी. डी चव्हाण हे निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. निवडणूक काळ सोडला तर कधीच ते हिंगोलीत फिरकत नाहीत. शिवाय त्यांचं काहीच काम मतदारसंघात दिसून येत नाही. त्यामुळे त्यांना शिवसैनिक स्वीकारतील असं दिसत नाही. ही त्यांची मोठी उणीव आहे.

किनवट, माहूर आणि औंढा नागनाथ या तालुक्यामध्ये त्यांचा समाज असल्याच्या जोरावर ते लोकसभेचं तिकीट मागत आहेत. यापूर्वी काँग्रेसकडून रामराव राठोड यांनी समाजाच्या आणि पक्षाच्या मतांच्या जोरावर सर्वाधिक काळ खासदारकी उपभोगली. भाजपकडून माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील इच्छुक आहेत. पण त्यांचा जनसंपर्क कमी झाला असून त्यांच्याकडे आता कार्यकर्त्यांची वानवा आहे. केंद्रीय मंत्री असताना त्यांना पराभव पत्करावा लागला होता. यावरूनच पक्षश्रेष्ठी त्यांना उमेदवारी देतील यात सांशकता वाटते.