मुंबई : काँग्रेसला महाराष्ट्रात आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का बसलाय. देशात एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालेलं असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचाच पराभव झालाय. नांदेडमध्ये भाजपचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांनी अशोक चव्हाण यांचा पराभव केला. प्रदेशाध्यक्ष असलेल्या अशोक चव्हाण यांच्या नेतृत्त्वात काँग्रेसला महाराष्ट्रात फक्त एक जागा मिळवता आली आहे. चंद्रपूरच्या जागेवर काँग्रेसने आघाडी घेतली आहे. या निकालानंतर अशोक चव्हाण यांनी हायकमांडकडे राजीनामा सोपवण्याचा निर्णय घेतलाय.
अशोक चव्हाण यांच्यावर महाराष्ट्राची जबाबदारी होती. त्यांना मराठवाड्यातील जागा राखण्यातही यश मिळालं नाही. 2014 ला मोदी लाटेत नांदेड आणि हिंगोली या दोन जागांवर काँग्रेसने यश मिळवलं होतं. पण यावेळी हिंगोली आणि नांदेड या दोन्ही जागा हातच्या गेल्या आहेत. मराठवाड्यातील आठपैकी सात जागांवर शिवसेना-भाजपचा विजय झाला. औरंगाबादची जागा एमआयएमला जाताना दिसत आहे.
एनडीएने देशभरात 347 जागांवर विजयी आघाडी घेतली आहे. तर यूपीएला 88 जागा मिळत असल्याचं चित्र आहे. विविध पक्षांनी मिळून 107 जागांवर आघाडी घेतली आहे. महाराष्ट्रात गेल्या निवडणुकीत महायुतीने 42 जागा जिंकल्या होत्या. यावेळीही तेवढ्याच जागा राखल्या आहेत.