शनिवार विशेष : ममता बॅनर्जींना सत्तेत आणणाऱ्या नंदिग्रामची कहाणी, पुन्हा नंदिग्राम का गाजतंय?

| Updated on: Jan 02, 2021 | 1:25 PM

सध्या पश्चिम बंगालमध्ये नंदिग्रामचा (nandigram) मुद्दा पुन्हा गाजत आहे. निवडणुकीपूर्वी नंदिग्रामला इतकं महत्त्व का आलंय?

शनिवार विशेष : ममता बॅनर्जींना सत्तेत आणणाऱ्या नंदिग्रामची कहाणी, पुन्हा नंदिग्राम का गाजतंय?
नंदिग्रामची कहाणी
Follow us on

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीकडे (West Bengal Election 2021) देशाचं लक्ष लागलं आहे. अद्याप विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला नसला, तरी एप्रिल-मे 2021 मध्ये या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत ममता बॅनर्जींचा (Mamata Banerjee) सत्ताधारी तृणमूल काँग्रेस विरुद्ध भाजप (TMC vs BJP) असा थेट सामना यंदा होणार आहे. पश्चिम बंगालमधील एकूण 294 पैकी तब्बल 200 जागा जिंकण्याचा निर्धार गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाहांनी (Amit Shah) केला आहे. अमित शाहांनी नुकताच बंगाल दौरा करुन, झलक दाखवली. तर दुसरीकडे ममता बॅनर्जींनीही सत्ता राखण्यासाठी आपली शक्ती पणाला लावली आहे. अशा परिस्थितीत सध्या बंगालमध्ये नंदिग्रामचा (nandigram) मुद्दा पुन्हा गाजत आहे. (Nandigram agitation the story of bengal politics Mamata Banerjee and Shubhendu Adhikari )

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी काही महिने शिल्लक असताना, बंगालच्या राजकारणात ‘नंदिग्राम’चा मुद्दा चर्चेत आला. मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचे माजी मंत्री आणि नंदिग्राम आंदोलनाचे नायक शुभेंदू अधिकारी यांनी नुकतंच तृणमूल काँग्रेस सोडून, भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतरच हा मुद्दा पुन्हा डोकं वर काढत आहे. या मुद्द्यावरुनच भाजप विरुद्ध तृणमूल असा संघर्ष सुरु झाला आहे.

नंदिग्राममध्ये सभा

शुभेंदू अधिकारी हे भाजपमध्ये दाखल होताच, ममता बॅनर्जींनी आक्रमक पवित्रा घेतला. ममतांनी लगेचच 7 जानेवारीला नंदिग्राममध्ये सभा घेण्याची घोषणा केली. ममतांच्या या पवित्र्यानंतर शुभेंदू यांनीही तसंच उत्तर दिलं. ममतांच्या सभेच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 8 जानेवारीला आपणही सभा घेऊ, असं शुभेंदू यांनी जाहीर केलं.

1947 मध्ये काही दिवस आधीच नंदिग्राम स्वतंत्र

पश्चिम बंगालच्या इतिहासात नंदिग्रामला विशेष महत्त्व आहे. स्वातंत्र्याच्या आधी नंदिग्रामच्या आंदोलनाने ब्रिटीशांनाही हात टेकायला भाग पाडलं होतं. 1947 मध्ये भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी अजय मुखर्जी, सुशील कुमार धारा, सतीश चन्द्र सामंत यांच्या नेतृत्त्वात, नंदिग्रामला स्वातंत्र्य मिळालं होतं. काही दिवस नंदिग्राम भारताच्या आधीच स्वतंत्र झाला. देशातील हा एकमेव भाग आहे ज्या दोनवेळा स्वातंत्र्य मिळालं.

2007 मधील उग्र आंदोलन

नंदिग्राममध्ये 2007 मध्ये सर्वात उग्र आंदोलन झालं होतं. जमीन अधिग्रहणाविरोधात आंदोलन करुन, ममता बॅनर्जींनी डाव्यांचं सरकार हद्दपार करुन सत्तेत आल्या होत्या. 2007 मध्ये तत्कालिन बुद्धदेव भट्टाचार्य यांच्या नेतृत्त्वातील सरकारने जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरु केली होती. बुद्धदेव भट्टाचार्य सरकारने सलीम ग्रुपला ‘स्पेशल इकॉनॉमिक झोन’ म्हणून नंदिग्राममध्ये एक केमिकल फॅक्टरी उभी करण्यास मान्यता दिली होती. याविरोधात बंगालमध्ये रान उठलं होतं.

ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला होता. तृणमूलने विरोधी पक्षांची मोट बांधून सरकारविरोधात पवित्रा घेत आंदोलन केलं. या आंदोलनाचं नेतृत्त्व तत्कालीन विरोधी पक्षनेत्या ममता बॅनर्जी यांनी केलं होतं. तर या आंदोलनाचे नायक होते शुभेंदू अधिकारी.

नंदिग्राममध्ये 14 जणांची हत्या

2007 मधील या आंदोलना दरम्यान 14 जणांचा जीव गेला होता. तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी हे आंदोलन औद्योगिकीकरणाच्या विरोधात असल्याचं म्हटलं होतं. हल्दियाचे तत्कालीन खासदार लक्ष्मण सेठ यांच्या नेतृत्वातील ‘हल्दिया डेवलपमेंट अथॉरिटी’ने भूमी अधिग्रहणासाठी नोटीस जारी केल्यानंतर परिस्थिती आणखी चिघळली होती. त्यामुळे CPI (M) आणि विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये हिंसक संघर्ष झाला. 14 मार्च 2007 रोजी या संघर्षादरम्यान जवळपास 14 जणांची हत्या झाली होती.

नंदिग्राम आंदोलनानंतर डाव्यांची सत्ता उलथली

नंदिग्राममध्ये झालेल्या आंदोलनानंतर लगेचच डाव्यांची सत्ता उलथवण्यात ममता बॅनर्जींना यश आलं. ममतांच्या नेतृत्त्वातील या आंदोलनात बंगालमधील लेखक, कलाकार, कवी, शिक्षकांसह सर्वसामान्य जनता सहभागी झाली होती. त्यावेळी सर्वांनी जमीन अधिग्रहणाला कडाडून विरोध केला होता. या आंदोलनाने ममता बॅनर्जी यांना सर्वसामान्यांमध्ये नवी ओळख निर्माण करुन दिली. त्याचा परिणाम म्हणून 2011 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत, तब्बल 34 वर्ष सत्तेत असलेल्या डाव्यांना पायउतार व्हावं लागलं. ममतांनी घातलेली मां, माटी, मानुषची साद बंगालवासियांनी ऐकली आणि त्यांच्याकडे सत्तेच्या चाव्या दिल्या.

शुभेंदू यांचा ममतांना विरोध का?

नंदिग्राम आंदोलनाने ममतांना सत्तेच्या सिंहासनावर बसवलं. या आंदोलनात शुभेंदू अधिकारी नायक म्हणून उदयाला आले. आता तेच शुभेंदू अधिकारी 2021 च्या निवडणुकीत ममतांसोबत नाहीत. शुभेंदू हे TMC सोडून BJP मध्ये दाखल झाले आहेत. इतकंच नाही तर ममतांवर त्यांनी हल्ला चढवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ज्या नंदिग्रामच्या मुद्द्यावरुन ममता सत्तेत आला, आता त्याच आंदोलनाचा नायक ममतांना विलन ठरवत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बंगालमधील पक्षीय बलाबल (2016)

  1. तृणमूल काँग्रेस -219
  2. काँग्रेस -23
  3. डावे – 19
  4. भाजप – 16
  5. एकूण – 294

(Nandigram agitation the story of bengal politics Mamata Banerjee and Shubhendu Adhikari )

संबंधित बातम्या:

ममता बॅनर्जी-अमित शाह, दोघांमध्ये कोण श्रीमंत, कुणाकडे किती पैसा?