सागर सुरवसे, सोलापूरः पुण्यातील कसबा पेठ (Kasba Peth) आणि पिंपरी चिंचवड (Pimpari Chinchwad) येथील पोट निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपने (BJP) आग्रह धरला आहे. भाजप आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर या जागा रिक्त आहेत. महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेनुसार ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असा सूर भाजप नेत्यांचा आहे. मात्र भाजपने बिनविरोधसाठी धरलेला हट्ट वेगळ्याच कारणांसाठी आहे. या ठिकाणी पराभव होण्याची भीती भाजपाला असल्याचं वक्तव्य रोहित पवार यांनी केलंय. येथील मतदार नाराज आहेत, असा भाजपचा सर्व्हे आहे. भाजपचे सर्व्हे चांगले असतात. त्यांना सत्य परिस्थिती कळाली आहे. त्यामुळेच एवढा आग्रह असल्याचं रोहित पवार म्हणालेत.
पिंपरी चिंचवडचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या जागेवर पोट निवडणूक होत आहे. लक्ष्मण जगताप हे आजारी असताना भाजपने त्यांना मदत नाही केली. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस नेत अजित पवार यांनी त्यांना मित्रत्वाचे नात्याने खूप मदत केली. आजारपणात विचारपूस केली. तर भाजपने केवळ मतदानासाठी त्यांना दवाखान्यातून बाहेर काढल्याचा आरोप रोहित पवार यांनी केलाय.
राज्यसभा निवडणुकांवेळी पिंपरी चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप तसेच कसबा पेठेच्या तत्कालीन आमदार मुक्ता टिळक आजारी असतानाही मतदानासाठी मुंबईत आल्या होत्या. अशा स्थितीत त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांचा विजय झाला, त्यामागे या दोन आमदारांचं मोठं योगदान असल्याची प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती.
मात्र भाजपने लक्ष्मण जगताप यांना केवळ मतदानासाठी दवाखान्यातून बाहेर काढलं, असा आरोप रोहित पवार यांनी केलाय. माझ्यापेक्षा जास्त जगताप कुटुंबीय हे जास्त चांगल्या प्रकारे सांगू शकतील, असं वक्तव्यही रोहित पवार यांनी केलंय.
कसबा पेठ आणि चिंचवड पोट निवडणूक बिनविरोध होण्यासाठी भाजपने आग्रह धरला आहे. यासाठी लवकरच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे नाना पटोले यांची भेट घेणार आहेत. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही काल सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत महाराष्ट्रातील राजकीय परंपरेची आठवण करून दिली आहे.
कसबा पेठ मतदार संघातून आज भाजपचे हेमंत रासणे तर काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी उमेदवारी अर्ज भरला. तर चिंचवड येथे लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनी उमेदवारी अर्ज भरला.