मित्रपक्षांचा भार आमच्या माथी नको, शिवसेना 144 जागांसाठी आग्रही

| Updated on: Jun 04, 2019 | 6:04 PM

मुंबई : लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित एनडीएने घवघवीत यश मिळवलं. महाराष्ट्रात 48 जागांपैकी 41 जागा शिवसेना-भाजप युतीने जिंकल्या. या प्रचंड यशानंतर शिवसेना-भाजप महायुतीला आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. मात्र, विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीत जागावाटपासाठी अधिकृत चर्चा होण्याआधीच धुसफूस सुरु झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपात भाजपच्या मित्रपक्षांचा भार शिवसेनेच्या माथी नको अशी भूमिका शिवसेनेने घेतली असून, विधानसभेत […]

मित्रपक्षांचा भार आमच्या माथी नको, शिवसेना 144 जागांसाठी आग्रही
Follow us on

मुंबई : लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित एनडीएने घवघवीत यश मिळवलं. महाराष्ट्रात 48 जागांपैकी 41 जागा शिवसेना-भाजप युतीने जिंकल्या. या प्रचंड यशानंतर शिवसेना-भाजप महायुतीला आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. मात्र, विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीत जागावाटपासाठी अधिकृत चर्चा होण्याआधीच धुसफूस सुरु झाली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपात भाजपच्या मित्रपक्षांचा भार शिवसेनेच्या माथी नको अशी भूमिका शिवसेनेने घेतली असून, विधानसभेत 144-144 अशा समसमान जागांसाठी शिवसेना आग्रही आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी युतीतील जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला होता. त्यानंतर युतीत धुसफूस सुरु झाली. चंद्रकांत पाटलांच्या जागावाटप फॉर्म्युलानुसार, 288 पैकी 18 जागा मित्रपक्षांना, तर उर्वरित 270 जागांमध्ये 135-135 असे जागांचे शिवसेना आणि भाजपमध्ये समसमान वाटप केले जाईल.

मित्रपक्षांनी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची रणनीती आहे. त्यामुळे भाजपच्या वाट्याला 153 जागा येतात. म्हणजे 135 आणि 18 अशा मिळून 153 जागा होतात. पण, शिवसेनेचा भाजप वगळता मित्र पक्ष नसल्याने 144-144 असा समसमान जागा वाटपाची प्राथमिक मागणी केली आहे.

288 पैकी प्रत्येकी 144 जागा दोघांच्या वाट्याला याव्यात, अशी भूमिका शिवसेनेने मांडली आहे.

भाजपचे 123 आणि शिवसेनेचे 63 मतदारसंघ जागा वाटपात कायम राहतील. अपवादात्मक परिस्थितीत काही पारंपारिक मतदार संघ बदलले जातील, अशी माहिती मिळते आहे.

भाजपला 10 अपक्ष आमदारांचा पाठिंबा असल्याने त्या जागा जागावाटपात भाजपच्या कोट्यात राहतील. त्यामुळे त्यांच्या 133 जागा नक्की आहेत. त्यामुळे भाजपने त्यांच्या कोट्यातील शिल्लक राहिलेल्या 11 जागांपैकी कोणत्या घ्यायच्या यावर युतीत एकमत झाल्यास जागा वाटपाला अंतिम स्वरुप मिळू शकेल, अशी शिवसेनेला आशा आहे. यंदा विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यात कुठलाही वाद नको, अशी दोन्ही पक्षांच्या नेतृत्वाची भूमिका आहे.

मात्र, दुसरीकडे गेल्यावेळी म्हणजे 2014 साली जिंकलेल्या जागा सोडण्यास भाजपनेही नकार दिला आहे. त्यामुळे यावरुनही शिवसेना आणि भाजपमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपादरम्यान वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.