Chanakya Niti : नंतर पश्चाताप करत बसण्यापेक्षा या चुका करुच नका! नेमकी चाणक्यनिती काय? जाणून घ्या

या चुका जर आपण टाळल्या, तर नंतर व्यक्तीला पश्चाताप होणार नाही. नेमक्या या चुका कोणत्या आहेत, त्या कशा टाळाव्यात आणि यशस्वी कसं व्हावं, हे समजून घेऊयात...

Chanakya Niti : नंतर पश्चाताप करत बसण्यापेक्षा या चुका करुच नका! नेमकी चाणक्यनिती काय? जाणून घ्या
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: May 02, 2022 | 9:41 AM

आचार्य चाणक्य हे एक प्रसिद्ध रणनितीकार मानले जातात. त्याचं बौद्धीक कौशल्य प्रचंड होतं. त्यांनी स्विकारलेल्या रणनितीची आणि चाणक्यनितीची कायम प्रशंसा झाली. त्यामुळे त्या धोरणांचा आजही वापर केला जातो. या धोरणांचा वापर करून चाणक्य (Chanakya niti) यांनी अनेक लोकांच्या जीवनात बदल घडवून आणला. विशेष म्हणजे आचार्य चाणक्य गुरू तर होतेच, त्याच बरोबर ते एक समाजशास्त्रज्ञ देखील होते. त्यांनी लिहलेल्या आणि सांगितलेल्या गोष्टी इतक्या प्रभावी आहेत की लोक आजही त्याचा वापर दैनंदिन जीवतनात करतात. समाजात (Chanakya niti on society) राहून कसं यशस्वी जीवन (successful life) जगता येईल, याचा उल्लेख ही आचार्य चाणाक्य यांनी त्यांच्या चाणक्यनितीत सांगितलंय. चाणक्यनिती आयुष्यात अंमलात आणली, तर अनेक समस्या सुटतील, असा विश्वास व्यक्त केला जातो. दरम्यान, चाणक्य यांनी काही महत्त्वाच्या चुका सांगितल्या आहेत. या चुका जर आपण टाळल्या, तर नंतर व्यक्तीला पश्चाताप होणार नाही. नेमक्या या चुका कोणत्या आहेत, त्या कशा टाळाव्यात आणि यशस्वी कसं व्हावं, हे समजून घेऊयात…

आई-वडिलांचा अपमान नकोच

जसं लहानपणी मुलं आई- वडिलांवर अवलंबून असतात, तसंच वृद्धपकाळात आई-वडील त्यांच्या मुलांवर अवलंबून असतात. भारतासारख्या पितृसत्ताक विचारांच्या देशात आई-वडिलांची जबाबदारी मुलाला घ्यावी लागते. मुलांवर निर्भर आई- वडिलांना नाईलाजाने वृद्धापकाळामुळे अनेक कामात मुलांची मदत घ्यावी लागते. त्यात काही मुलं रागात आई – वडिलांचा अपमान करतात. चाणाक्यांच्या मते ही जीवनातील सर्वात मोठी चूक आहे, कारण आई-वडिलांचे कर्ज जीवनात कधीच फेडले जाऊ शकत नाही. नंतर पश्चाताप करण्यापेक्षा आई-वडिलांची सेवा करणे कधी ही चांगले.

वेळेचा अपव्यय

वेळ ही अमूल्य गोष्ट आहे. गेलेला वेळ पुन्हा कधीच येत नाही. वेळीवर गोष्टी केल्या नाहीत किंवा त्या करायला वेळ लावलातर नंतर अशावेळी पश्चातापच होतो. म्हणतात ना, वेळ कधीच कोणासाठी थांबत नाही. आचार्यांच्या मते ज्यांना जीवनात वेळेचं महत्व लक्षात नाही आले, त्यांना जीवनात अयशस्वीपणाला तोंड द्यावे लागले. अशात वेळेचा अपव्यय टाळा आणि आपल्या जीवनातील आवश्यक कामं वेळेत पार पाडा.

राग

राग व्यक्तिचा सर्वात मोठा शत्रू असतो असं आचार्य चाणक्य सांगतात. ज्यांचे रागावर नियंत्रण नसते त्यांना मोठ्या नुकसानाला तोंड द्यावे लागते. इतकंच नाही तर अशा लोकांना अपयशाचा देखील सामना करावा लागतो. खरंतर रागीट व्यक्ती कुणालाच आवडत नाहीत. अशा लोकांच्या सहवासात राहणं देखील लोकांना आवडत नाही. त्यामुळे रागावर नियंत्रण असणं कधी ही चांगलं.