World Environment Day 2022: हिंदू धर्मात ‘या’ चार वृक्षांना आहे विशेष महत्व; पर्यावरणाचा समतोल राखण्यातही आहे सिंहाचा वाटा!

| Updated on: Jun 05, 2022 | 5:17 PM

दरवर्षी 5 जून रोजी पर्यावरण दिन साजरा केला जातो (World Environment Day 2022). पर्यावरण दिनानिमित्त झाडे आणि वनस्पतींचे संवर्धन आणि त्याचे महत्त्व याचा प्रचार केला जातो. जोपर्यंत पृथ्वीवर झाडे आहेत, तोपर्यंत पृथ्वीचे अस्तित्व आहे. हिंदू धर्मात निसर्ग संवर्धनाला विशेष महत्त्व दिले आहे. हिंदू संस्कृतीत निसर्गाच्या विविध रूपांची देवतांच्या रूपात पूजा करून निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचा आणि त्याला जपण्याचा संदेश दिला आहे. हिंदू धर्मात पृथ्वीला धरती माता म्हणून संबोधले जाते. हिंदू मान्यतेनुसार माणसाचे शरीर हे पाच घटकांनी बनलेले आहे. ही पाच तत्वे म्हणजे पृथ्वी, जल, अग्नि, आकाश आणि वायु. हिंदू धर्म आणि संस्कृतीत, पर्वत, नद्या, जंगले, तलाव, झाडे आणि प्राणी इत्यादींना नेहमीच दैवी कथा आणि पुराणांमध्ये पर्यावरण रक्षणाच्या उद्देशाने जोडले गेले आहे. पर्यावरणाचे रक्षण हे आपल्या जीवनाचे संरक्षण कवच आहे.पर्यावरण दिनानिमित्त आपण पर्यावरणाचे रक्षण करण्याची व जास्तीत जास्त झाडे लावण्याची शपथ घेतली पाहिजे. चला जाणून घेऊया त्या झाडांबद्दल ज्यांचा पर्यावरणाचा समतोल राखण्यात सिंहाचा वाटा आहे.

World Environment Day 2022: हिंदू धर्मात या चार वृक्षांना आहे विशेष महत्व; पर्यावरणाचा समतोल राखण्यातही आहे सिंहाचा वाटा!
Follow us on

 

पिंपळ

 

पिंपळाच्या झाडाशी अनेक धार्मिक भावना आणि महत्व जोडले गेले आहेत. झाडाच्या मुळाशी श्री विष्णू, देठात शंकर आणि अग्रभागी ब्रह्मदेव वास करतात असे मानले जाते. पिंपळाच्या झाडाची व्याप्ती, प्रसार आणि उंची खूप जास्त आहे. हे झाड इतर झाडांपेक्षा जास्त ऑक्सिजन देते, म्हणजेच 22 तासांपेक्षा जास्त वेळ ऑक्सिजन देते. रात्रंदिवस प्राणवायू देणारे हे झाड भगवान विष्णूचे प्रतिक मानले जाते. बौद्ध धर्मात याला बोधीवृक्ष म्हणून ओळखले जाते, असे मानले जाते की या झाडाखाली भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त झाले होते. जास्तीत जास्त ऑक्सिजन दिल्याने पर्यावरणप्रेमी पिंपळाचे झाड लावण्याची विनंती करतात.

वड

भारताचा राष्ट्रीय वृक्ष असण्यासोबतच हिंदू धर्मातही हे झाड अत्यंत पवित्र मानले जाते. धार्मिक श्रद्धेसोबतच हे झाड पर्यावरणाचे रक्षण आणि वायू प्रदूषण कमी करण्यातही महत्त्वाची भूमिका बजावते. वटवृक्ष आणि त्याच्या पानांमध्ये कार्बन डायऑक्साइड शोषण्याची क्षमता सर्वाधिक असते. पीपळाप्रमाणे हे झाडही भरपूर ऑक्सिजन देते. त्यामुळे वटवृक्षही पर्यावरणासाठी वरदानापेक्षा कमी नाही.

कडुलिंब

कडुलिंबाच्या झाडामध्ये संसर्ग दूर करण्याचे गुणधर्म आहेत. बॅक्टेरियाविरोधी गुणधर्माने समृद्ध असलेले कडुलिंबाचे झाड प्रदूषित वातावरण शुद्ध करून स्वच्छ वातावरण प्रदान करते. पानाची रचना विशेष प्रकारची असल्याने कडुलिंबाचे वृक्ष भरपूर प्रमाणात ऑक्सिजन तयार करू शकते. त्यामुळे अधिकाधिक कडुलिंबाची झाडे लावावीत असे आवाहन पर्यावरण प्रेमींकडून करण्यात येते, कडुलिंबाच्या वृक्षामुळे सभोवतालची हवा नेहमी शुद्ध राहते. हे वृक्ष हवेतील कार्बन डायऑक्साइड, सल्फर आणि नायट्रोजनसारखे प्रदूषित वायू शोषून घेते आणि वातावरणात ऑक्सिजन देते. 

अशोक

हिंदू धर्मात तसेच अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये अशोक वृक्षाचे वर्णन शुभ वृक्ष म्हणून करण्यात आले आहे. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून अशोकाचे हिरवेगार झाड केवळ प्राणवायूच निर्माण करत नाही तर वैशिष्ट्यपूर्ण आकारामुळे ते आकर्षकही दिसते. अशोकाचे झाड वातावरण शुद्ध ठेवते आणि या झाडाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे झाड हवेतील इतर दूषित कणांव्यतिरिक्त विषारी वायू शोषून घेते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतापासून देण्यात आलेली आहे. कुठल्याही तथ्यांच्या सत्यतेचा आम्ही दावा करत नाही.)