मेलबर्न : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मेलबर्नमधील दुसरा टी-20 सामना पावसामुळे रद्द झाला आहे. या सामन्यात दिवसभर पावसानेच खेळ केला. टॉस जिंकून भारताने प्रथम ऑस्ट्रेलियाला फलंदाजीचं निमंत्रण दिलं होतं. ऑस्ट्रेलियाने 19 षटकात 7 बाद 132 धावा केल्या होत्या. मात्र तोपर्यंत पावसाने जोर धरला. त्यामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार भारताला 19 षटकात 137 धावांचं लक्ष देण्यात आलं. रोहित आणि धवन फलंदाजीला उतरणार इतक्यात पाऊस पुन्हा बरसायला सुरुवात झाली. त्यानंतर पाऊस उघडणार म्हणून भारताला सुधारित 11 षटकांमध्ये 90 धावांचे आव्हान देण्यात आलं. पुन्हा धवन आणि रोहित तयार झाले मात्र पावसाने पुन्हा त्यांचा मार्ग रोखला. थोड्या वेळाने पुन्हा पाऊस उघडला असं वाटत होतं, त्यामुळे भारताला 5 षटकात 46 धावांचं टार्गेट देण्यात आलं. मात्र पाऊस काही ऐकायला तयार नव्हता, त्यामुळे हा सामना गुंडाळावा लागला.
दरम्यान, या मालिकेतील तिसरा सामना आता 25 नोव्हेंबर रोजी सिडनी येथे खेळवला जाणार आहे. या मालिकेत ऑस्ट्रेलिया आधीच 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आता अखेरचा सामना जिंकून भारताला ही मालिका बरोबरीत सोडवण्याची संधी आहे.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रलियाने 19 षटकांत 7 बाद 132 धावा केल्या. मात्र 20 व्या षटकात पाऊस आल्याने खेळ थांबवण्यात आला. त्यावेळी ऑस्ट्रेलियाचे अँड्रयू टाय 12 आणि बेन मॅकडरमॉट 32 धावांवर खेळत होते. पावसामुळे पुढे खेळच होऊ शकला नाही.
भारताकडून भुवनेश्वर कुमार आणि खलील अहमद यांनी प्रत्येकी दोन, तर कुलदीप यादव आणि कृणाल पंड्या यांनी प्रत्येकी विकेट घेतली.
Sadly, the play has been called off at the MCG. Australia take a 1-0 series lead with one more game to go.#AUSvIND pic.twitter.com/C3b9iKxNM2
— BCCI (@BCCI) November 23, 2018