भारत वि. न्यूझीलंड वन डे : विश्वचषकापूर्वी परदेशात भारताची अखेरची परीक्षा

| Updated on: Jul 05, 2019 | 4:35 PM

नेपियर/मुंबई : ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मैदानावर धूळ चारल्यानंतर भारतीय संघ आता न्यूझीलंडशी दोन हात करणार आहे. भारतासाठी हा दौरा अत्यंत महत्त्वाचा असेल. कारण, विश्वचषकापूर्वी भारताचा हा अखेरचा परदेश दौरा आहे. मजबूत फलंदाजी, गोलंदाजीतली लय आणि मायदेशातलं साजेसं वातावरण ही न्यूझीलंडची भक्कम बाजू आहे. त्यामुळे भारतासाठी हा दौरा नक्कीच आव्हानात्मक असेल. ऑस्ट्रेलियातला फॉर्म इथेहा कायम ठेवण्याचंही आव्हान […]

भारत वि. न्यूझीलंड वन डे : विश्वचषकापूर्वी परदेशात भारताची अखेरची परीक्षा
Follow us on

नेपियर/मुंबई : ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मैदानावर धूळ चारल्यानंतर भारतीय संघ आता न्यूझीलंडशी दोन हात करणार आहे. भारतासाठी हा दौरा अत्यंत महत्त्वाचा असेल. कारण, विश्वचषकापूर्वी भारताचा हा अखेरचा परदेश दौरा आहे. मजबूत फलंदाजी, गोलंदाजीतली लय आणि मायदेशातलं साजेसं वातावरण ही न्यूझीलंडची भक्कम बाजू आहे. त्यामुळे भारतासाठी हा दौरा नक्कीच आव्हानात्मक असेल. ऑस्ट्रेलियातला फॉर्म इथेहा कायम ठेवण्याचंही आव्हान विराट ब्रिगेडसमोर आहे. नेपियरच्या मैदानावर बुधवारी सकाळी साडे सात वाजता या सामन्याला सुरुवात होईल.

न्यझीलंड आणि भारताची कामगिरी

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळवण्यात आलेल्या गेल्या पाच वन डे मालिकांमध्ये भारताचं पारडं जड आहे. भारताने पाचपैकी चार वेळा मालिका जिंकली आहे. पण पाचपैकी तीन मालिका भारतात खेळवण्यात आल्या होत्या. उभय संघांमध्ये अखेरची वन डे मालिका 2017 मध्ये खेळवण्यात आली होती. मायदेशात झालेल्या मालिकेत भारताने 2-1 ने विजय मिळवला होता. तर 2014 मध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. 2009 मध्ये भारताने न्यूझीलंडवर 3-1 ने मात केली होती.

न्यूझीलंडचं मायदेशात प्रदर्शन नेहमीच चांगलं राहिलेलं आहे. त्यामुळे ही भारताच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. 2016 पासून आतापर्यंत न्यूझीलंडने 33 पैकी 25 वन डे सामने जिंकले आहेत. तर एक सामना अनिर्णित राहिला होता. भारताने 24 पैकी 16 सामने जिंकले आहेत आणि सात सामन्यात पराभव झाला. एक सामना अनिर्णित राहिला.

परदेशात खेळवण्यात आलेल्या सामन्यांमध्ये भारताने 32 पैकी 22 सामने जिंकले आहेत. तर नऊ सामन्यांमध्ये पराभव पाहिलाय. उभय संघांमध्ये खेळवण्यात आलेल्या 34 सामन्यांमध्ये भारताने 10 आणि किवींनी 21 सामने जिंकले आहेत. याबाबतीत भारत जरा मागे दिसत आहे. पण ही उणिव भरुन काढण्याची संधी यावेळी भारताकडे असेल.

उभय संघांची जमेची बाजू

न्यूझीलंडकडे केन विल्यम्सनसारखा दमदार फलंदाज आहे, तर भारताकडे रोहित शर्मा, विराट कोहली यांच्यासारखे मातब्बर शिलेदार आहेत. विराट, रोहित, धवन आणि अनुभव महेंद्रसिंह धोनीवरच भारतीय फलंदाजीची खरी मदार असेल. धोनीसारखा अनुभवी फलंदाज संघात असणं ही भारताची जमेची बाजू म्हणता येईल. तर दुसरीकडे न्यूझीलंडमध्येही रॉस टेलर आणि विल्यम्सनसारखे अनुभवी फलंदाज आहेत.

भारतीय गोलंदाजीची मदार खऱ्या अर्थाने कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, रवींद्र जाडेजा यांच्यावरच असेल. नवख्या खलील अहमद आणि मोहम्मद सिराजचाही भारतीय संघात समावेश करण्यात आलेला आहे. अष्टपैलू हार्दिक पंड्याची भारताला उणिव भासणार आहे.

भारताची चौथ्या क्रमांकाची चिंता कायम

फलंदाजीसाठी मधली फळी ही अत्यंत महत्त्वाची असते. भारताचे सुरुवातीचे तीन फलंदाज बाद झाल्यानंतर संपूर्ण फळी एकदम वेगाने ढासळते. त्यामुळे चौथ्या क्रमांकावर कुणाला पाठवायचं हा अजूनही भारतीय संघासाठी चिंतेचा विषय आहे. धोनीने चौथ्या क्रमांकावर स्वतःला सिद्ध केलंय. तो कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करु शकतो. अंबाती रायुडू दोन वेळा चौथ्या क्रमांकावर अपयशी ठरलाय. शिवाय केदार जाधव आणि दिनेश कार्तिक यांच्यासारखे पर्यायही विराट कोहलीला वापरुन पाहावे लागतील.

भारतीय संघ

विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, अंबाती रायुडू, दिनेश कार्तिक, केदार जाधव, महेंद्र सिंह धोनी, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, रवींद्र जाडेजा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, खलील अहमद, मोहम्मद शमी, विजय शंकर, शुबमन गिल

न्यूझीलंडचा संघ

केन विल्यम्सन, ट्रेंट बोल्ट, डॉग ब्रेसवेल, कॉलि डी ग्रँडहोम, लॉकी फर्ग्युसन, मार्टिन गप्टिल, मॅट हेनरी, टॉ लॅथम, कोलिन मुन्रो, हेनरी निकोलस, मिचेल सँटनर, इश सोधी, टीम साऊथी, रॉस टेलर