भारतात लवकरच अॅपलचा प्लांट, या शहराची निवड होण्याची शक्यता

नवी दिल्ली : अॅपल लवकरच हायएंड फ्लॅगशीप आयफोन भारतात तयार करणार आहे. क्यूपर्टिनो चीनमधील प्लांटवरील अवलंबित्व कमी करण्याच्या विचारात आहे. क्यूपर्टिनोने हे फोन भारतात बनवण्याची इच्छा दर्शवली आहे. यामुळे फोनची किंमत कमी होईल आणि व्यवसाय वाढण्यासही मदत होईल, असं कंपनीचं म्हणणं आहे. अॅपल सप्लायर फॉक्सकॉनच्या मते, लवकरच भारतात आयफोन निर्मितीच्या नियोजनासाठी एक टीम येणार आहे. […]

भारतात लवकरच अॅपलचा प्लांट, या शहराची निवड होण्याची शक्यता
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:35 PM

नवी दिल्ली : अॅपल लवकरच हायएंड फ्लॅगशीप आयफोन भारतात तयार करणार आहे. क्यूपर्टिनो चीनमधील प्लांटवरील अवलंबित्व कमी करण्याच्या विचारात आहे. क्यूपर्टिनोने हे फोन भारतात बनवण्याची इच्छा दर्शवली आहे. यामुळे फोनची किंमत कमी होईल आणि व्यवसाय वाढण्यासही मदत होईल, असं कंपनीचं म्हणणं आहे.

अॅपल सप्लायर फॉक्सकॉनच्या मते, लवकरच भारतात आयफोन निर्मितीच्या नियोजनासाठी एक टीम येणार आहे. चीनमधील फोन निर्मिती प्लांट शिफ्ट करण्याचंही नियोजन सुरु आहे. द वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तानुसार, फॉक्सकॉनचे वरिष्ठ अधिकारी लवकरच भारतात येऊन या विषयावर निर्णय घेणार आहेत.

भारतात आयफोन 6S आणि SE सारखे फोन अगोदरपासूनच विस्ट्रॉनच्या माध्यमातून असेंबल केले जातात. अॅपले हायएंड आयपोन आता फॉक्सकॉनच्या माध्यमातून भारतात बनवले जातील. रॉयटर्सनेही या गोष्टीची पुष्टी केली आहे.

फॉक्सकॉन प्लांटसाठी तामिळनाडूतील श्रीपेरुमबुदुरमधील जागेची निवड केली जाऊ शकते. इथे फॉक्सकॉनकडून अगोदरपासूनच शाओमी कॉर्पचे फोन बनवले जातात. या प्लांटमध्ये आणखी गुंतवणूक केली जाणार आहे, ज्यामुळे आयफोनची निर्मिती होईल. तामिळनाडूच्या उद्योगमंत्र्यांच्या दाव्यानुसार, या प्रकल्पामुळे 25 हजार हातांना रोजगार मिळेल.

गेल्या काही दिवसांपासून मेक इन इंडिया आयफोनची चर्चा जोरात सुरु आहे. यासाठी हालचालीही सुरु असल्याचं बोललं जातं. पण या चर्चांना अंतिम रुप आलेलं नाही. पण आता फॉक्सकॉनने दिलेल्या माहितीची अनेक ठिकाणांहून पुष्टी करण्यात आली आहे. आयफोन भारतात तयार झाल्यास किंमतीत मोठी घट होईल, ज्याचा फायदा कंपनीलाही होईल आणि ग्राहकांनाही.

चीन आणि अमेरिकेत गेल्या काही महिन्यांपासून ट्रेड वॉर म्हणजेच व्यापार युद्ध सुरु आहे. त्यामुळे अमेरिकन कंपन्या चीनकडे पाठ फिरवत आहे. भारत ही जगातील सर्वच कंपन्यांसाठी मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे गुंतवणूकदार भारताकडे वळत असल्याचं दिसतंय.