कोणताही व्यवहार न करता बँक अकाऊंटमधून पैसे कट झाले तर काय कराल?

| Updated on: Aug 09, 2021 | 7:02 AM

Bank Account | बँक कोणत्याही कारणाशिवाय तुमच्या खात्यातून पैसे कापत नाही. प्रत्येक व्यवहाराचे एक कारण असते. त्यामुळे बँकेने तुमच्या माहितीशिवाय खात्यातून पैसे कापल्यास ते कोणते शुल्क किंवा आर्थिक दंड आहे का, हे प्रथम तपासून पाहावे.

कोणताही व्यवहार न करता बँक अकाऊंटमधून पैसे कट झाले तर काय कराल?
नाणी वितरीत करण्यासाठी बँकांना वाढीव प्रोत्साहनपर भत्ता
Follow us on

मुंबई: अनेकदा आपण व्यवहार न करताही आपल्या बँक खात्यातून परस्पर पैसे कापले जातात. अशावेळी अनेकजण सायबर फ्रॉड किंवा ऑनलाईन फसवणुकीच्या शक्यतेमुळे घाबरुन जातात. मात्र, असा प्रकार तुमच्यासोबत घडल्यास घाबरून न जाता काही गोष्टी तातडीने केल्यास तुमची समस्या सुटू शकते. तुम्ही घरबसल्या ऑनलाईन पद्धतीनेही अशा गोष्टींची तक्रार करु शकता.

बँक कोणत्याही कारणाशिवाय तुमच्या खात्यातून पैसे कापत नाही. प्रत्येक व्यवहाराचे एक कारण असते. त्यामुळे बँकेने तुमच्या माहितीशिवाय खात्यातून पैसे कापल्यास ते कोणते शुल्क किंवा आर्थिक दंड आहे का, हे प्रथम तपासून पाहावे.

तुमच्या बँक खात्यातून पैसे नेमके का कापले गेले आहेत, हे तपासून पाहण्यासाठी सर्वप्रथम पासबुक चेक करा. अन्यथा तुम्हाला ऑनलाईन स्टेंटमेंटही तपासून पाहता येईल. या दोन्ही ठिकाणी तुमच्या खात्यातून कोणत्या कारणासाठी पैसे कापले गेले आहेत, याचा तपशील नमूद केलेला असेल.

SBI बँकेत तक्रार कशी कराल?

बँक पासबूक आणि स्टेटमेंट तपासल्यानंतरही तुमचे समाधान झाले नसेल तर तुम्ही ऑनलाईन तक्रार नोंदवू शकता. त्यासाठी एसबीआय बँकेच्या https://crcf.sbi.co.in/ccf/ पोर्टलवर जावे. त्याठिकाणी तक्रार नोंदवण्यासाठी असलेल्या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर आपली तक्रार नमूद करावी.

रिझर्व्ह बँकेचा नियम काय सांगतो?

एटीएम व्यवहार ((ATM transaction) ) करणाऱ्या ग्राहकांना सर्वात अगोदर आरबीआयचा नियम माहित असणं गरजेचं आहे. एटीएममधून पैसे काढताना, पैसे वजा झाल्याचा मेसेज आला, पण पैसे तुमच्या हातात आले नसतील, तर पैसे निश्चितपणे मिळतील. पण यासाठी काही अटीही आहेत, ज्या लक्षात न ठेवल्यास तुम्ही पैसे गमावू शकता.

एटीएममधून पैसे वजा झाल्याचा मेसेज आला, पण हातात पैसे आले नसतील तर तुम्ही सर्वात अगोदर तुमच्या बँकेशी संपर्क साधा. बँकेला सुट्टी असेल, तर कस्टमर केअरला फोन लावून माहिती देता येईल. प्रत्येक बँकेच्या कस्टमर केअरचा नंबर इंटरनेटवरही सहजपणे मिळू शकेल.

ट्रान्झॅक्शन फेल का झालं याचं कारण तर तुम्हाला सांगितलं जाईलच, पण तुमचे पैसेही परत मिळतील. पैसे परत मिळण्यासाठी साधारणपणे एक आठवड्याचा वेळ लागतो. अनेक बँकांचे पैसे त्याअगोदरही मिळतात. ट्रान्झॅक्शन फेल झाल्याची स्लीप मिळते, जी तुम्हाला पैसे परत मिळेपर्यंत सांभाळून ठेवावी लागेल. काही एटीएममधून स्लीप येत नाही. अशा वेळी बँक स्टेटमेंट काढून ते बँकेला देता येईल.

ट्रान्झॅक्शन फेल झाल्यानंतर अनेकदा तारांबळ उडते. पण तारांबळ होऊ न देता किमान 24 तास वाट पाहणं गरजेचं असतं. 24 तासांनंतरही पैसे न मिळाल्यास बँकेला लेखी तक्रार देण्याचाही मार्ग आहे. तक्रार केल्यानंतरही एका आठवड्याच्या आत तुमचे पैसे येत नसतील तर दररोज 100 रुपये या प्रमाणे तुम्हाला दंड स्वरुपात बँकेकडून पैसे मिळतील.