मराठवाड्यातील जनतेसाठी आज दोन मोठ्या रेल्वे सुरु करण्यात आल्या. नांदेड ते हडपसर ही रेल्वेसेवा सुरु झाली. तसेच शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी म्हणजे जालना ते ओरिसा अशा किसान रेल्वेचे उद्घाटनही करण्यात आले. केंद्रीय रेल्वेराज्य मंत्री रावसाहेब दानवे आणि जालन्याचे पालकमंत्री व राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते किसान रेल्वेचा शुभारंभ करण्यात आला. ‘किसान रेल’ ही शेतकरी आणि व्यापाऱ्यांना त्यांच्या कृषी मालाची जलद, निर्धोक तसेच सुरक्षित व किफायतशीर रितीने कमीत कमी खर्चात दूरवर विक्री करण्याची सुविधा दिते. याद्वारे शेतकऱ्यांचा आणि व्यापाऱ्यांचा विकास होईल आणि स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ मिळेल, असा यामागे हेतू आहे. जालन्यातून आज याच योजनेअंतर्गत जालना ते आसाममधीर जोरहाटपर्यंत 351 टन कांदे किसान रेल्वेने पाठवण्यात आले. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच 02 जानेवारी रोजी या रेल्वेला सुरुवात झाली. आज जालन्यातून निघालेले हे कांदे 2800 किमीचा प्रवास करून जोरहाट येथे पोहचतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत या मिशनच्या दिशेने टाकलेले हे आणखी एक प्रगतीचे पाऊल आहे, असे ट्विट रावसाहेब दानवे यांनी याप्रसंगी केले.