Special Report | प्रमोद महाजन, विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे, राजीव सातव आणि आता विनायक मेटे; मराठवाड्याच्या 5 रत्नांची एक्झिट

| Updated on: Aug 15, 2022 | 9:16 PM

मेटेंच्या जाण्यानं फक्त मराठा समाजाचीच नाही तर मराठवाड्याचीही मोठी हानी झालीय.गेल्या काही वर्षात मराठवाड्यातले मोठे नेते काळाच्या पडद्याआड गेले. प्रमोद महाजन, विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे, राजीव सातव आणि आता विनायक मेटेंना काळानं अकाली हिरावून नेलं.

Follow us on

मुंबई : विनायक मेटे आज अनंतात विलीन झालेत. कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार, कार्यकर्ते शोकाकूल झाले होते. मेटेंच्या जाण्यानं फक्त मराठा समाजाचीच नाही तर मराठवाड्याचीही मोठी हानी झालीय.गेल्या काही वर्षात मराठवाड्यातले मोठे नेते काळाच्या पडद्याआड गेले. प्रमोद महाजन(Pramod Mahajan), विलासराव देशमुख(Vilasrao Deshmukh), गोपीनाथ मुंडे(Gopinath Munde), राजीव सातव(Rajiv Satav) आणि आता विनायक मेटेंना( Vinayak Mete) काळानं अकाली हिरावून नेलं.

प्रमोद महाजन भाजपचे राष्ट्रीय नेते होते. महाराष्ट्रातल्या शिवसेना-भाजप युतीचे जनक होते. पंतप्रधानपदाच्या शर्यतीतही त्यांचं नाव असायचं. पण 2006 साली प्रमोद महाजनांवर त्यांचेच भाऊ प्रवीण महाजन यांनी मुंबईतल्या राहत्या घरी गोळ्या झाडल्या. प्रमोद महाजन यांनी 13 दिवस मृत्यूशी झुंज दिली. अखेर हिंदूजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

प्रमोद महाजन यांच्यानंतर मराठवाड्यानं आणखी एक हिरा गमावला. तो हिरा म्हणजे विलासराव देशमुख. विलासराव देशमुख यांनी महाराष्ट्राची धुरा समर्थपणे सांभाळली होती. विलासरावांचा लोकसंग्रह अफाट होता. जनमानसावर पकड होती. राज्याच्या राजकारणात विलासरावांना मानाचं स्थान होतं. केंद्रातही विलासरावांचा शब्द पडू दिला जात नव्हता.

2012 साली लिव्हर आणि किडनीच्या आजारामुळं विलासराव मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले. प्रकृती खालावल्यानं त्यांना चेन्नईच्या रुग्णालयात शिफ्ट करण्यात आलं. पण तिथं विलासरावांची प्राणज्योत मालवली.

मराठवाड्यातला जन्म, प्रचंड जनसंग्रह, वक्तृत्वावर पकड असलेले आणखी एक नेते म्हणजे गोपीनाथ मुंडे. 2014 साली देशात सत्तापरिवर्तन झालं. केंद्रात भाजपचं सरकार आलं. गोपीनाथ मुंडे केंद्रात मंत्री झाले. पण काहीच दिवसात अपघातीत गोपीनाथ मुंडेंचं निधन झालं. गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतरचे अनेक महिने मराठवाडा दु:खातून बाहेर आला नव्हता.

राजीव सातव हे मराठवाड्यातला काँग्रेसचा चेहरा होते. गांधी घराण्याशी त्यांचे जवळचे संबंध होते. काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारणीत त्यांना स्थान होतं. काँग्रेसनं राज्यसभेवर त्यांना खासदारही केलं होतं पण कारकीर्द बहरत असताना राजीव सातव यांना कोरानाची लागण झाली. अनेक दिवस त्यांनी रुग्णालयात मृत्यूशी झुंज दिली. पण ही झुंज अपयशी ठरली.