शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Shiv Sena leader Pratap Sarnaik) यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र ही सुद्धा भाजपची चाल आहे, असा दावा ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी केला. कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन हसन मुश्रीफ यांनी भूमिका मांडली. प्रताप सरनाईकांच्या पत्रावरुन महाविकास आघाडीमध्ये चुकीचा संदेश जाऊ नये असंही मुश्रीफांनी नमूद केलं.
सत्तेत राहूनही काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेनेचे कार्यकर्ते, नेते फोडत आहेत असा आरोप प्रताप सरनाईकांनी केला आहे. त्यावर हसन मुश्रीफ म्हणाले, “सरनाईकांनी असा आरोप केला असला तरी राज्यात कुठेही तशी परिस्थिती नाही. कोल्हापूर जिल्हापरिषद गोकुळमध्ये शिवसेनेला संधी दिली. काही ठिकाणी स्थानिक प्रश्नावरून कुरबुरी झाल्या असतील याचा अर्थ फोडाफोडी चालली आहे असा नाही. प्रताप सरनाईक यांचं हे कारण जुजबी असावं”