कोकणातील चिपी विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्यात शनिवारी अपेक्षेप्रमाणे राजकीय फटकेबाजी पाहायला मिळाली. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलेली एक चारोळी चर्चेचा विषय ठरली. या चारोळीच्या माध्यमातून रामदास आठवले यांनी शिवसेना-भाजपची पुन्हा युती व्हावी, अशी इच्छा अप्रत्यक्षपणे बोलून दाखवली. रामदास आठवले यांनी आपल्या छोटेखानी भाषणात ही कविता म्हटली. ‘याठिकाणी एकत्र आलेत उद्धव ठाकरे आणि नारायण राणे, मला आठवलेय महायुतीचे गाणे’. चिपी विमानतळाच्या उद्घटनासाठी उद्धव ठाकरे आणि नारायण राणे एकत्र आले आहेत. नारायण राणे यांनी मला अगोदरच सांगितले आहे की, माझे मुख्यमंत्र्यांशी कोणतेही वैर नाही. उद्धव ठाकरे यांनीही नारायण राणे यांच्यासोबत एकत्र काम केले आहे. शिवशक्ती आणि भीमशक्तीची युती होती तेव्हा मीदेखील उद्धव ठाकरे यांच्यासोबत काम केल्याच्या आठवणींना रामदास आठवले यांनी उजाळा दिला. चिपी विमानतळासाठी सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी प्रयत्न केल्याचेही रामदास आठवले यांनी सांगितले.