सलग चौथ्या दिवशीही अवकाळी ‘संकट’, सोन्या सारखं पीक पाण्यात; नाशिकमधील पोल्ट्री व्यावसायिकांनाही फटका

| Updated on: Apr 12, 2023 | 10:01 AM

सलग चार दिवस झाले नाशिक मधील बळीराजा वरील अवकाळी पावसाच संकट काही केल्यास दूर व्हायला तयार नाहीये, त्यातच आता कुक्कुटपालन करणाऱ्या व्यावसायिकांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.

सलग चौथ्या दिवशीही अवकाळी संकट, सोन्या सारखं पीक पाण्यात;  नाशिकमधील पोल्ट्री व्यावसायिकांनाही फटका
Image Credit source: TV9 Network
Follow us on

नाशिक : सलग चार दिवसापासून नाशिक जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने मुक्काम ठोकला आहे. नाशिक मधील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान अवकाळी पाऊस आणि गारपिटीने केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकमध्ये येऊन पाहणी केली आणि त्यावेळी तात्काळ पंचनाम्याचे आदेशही दिले. त्यानंतर प्रशासनानं रातोरात प्राथमिक अहवाल देऊन शेतकऱ्यांची मदत करण्याचे ही ठरवलं होतं. प्रशासनाच्या स्तरावर हालचाली देखील सुरू झाल्या होत्या. मात्र, शेतकऱ्यांचे नुकसान हे वाढतच चाललं आहे. सायंकाळच्या वेळेला दररोज मुसळधार पाऊस येऊन पडतोय. त्यामुळे शेतकरी वर्गात घबराट निर्माण झाली असून व्यावसायिकांनाही फटका बसत आहे.

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, सटाणा, निफाड, चांदवड, मालेगाव आणि नांदगाव यांसह विविध तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसानं द्राक्ष बागा अक्षरशा उन्मळून पडल्या आहे. कांद्याचे पीक हे अक्षरशा खराब झाले आहे. कांदा अक्षरशः पाण्यात तरंगला. डाळिंब पिकाची फुलकळी गळून पडली आहे.

कांदा, द्राक्ष, गहू आणि डाळिंब यांसारखी पिकं अक्षरशा भुईसपाट झाली आहेत. लाखो रुपयांचे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. अगोदरच अस्मानी आणि सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यावर आता अवकाळीच नव संकट उभे राहिले आहे.

हे सुद्धा वाचा

खरिपाचे पीक पूर्णतः अतिवृष्टीमुळे हातातून गेलो होते. त्यामुळे आता हाती असलेले पीक शेतकऱ्याला तारणार होतं. त्यात आता हाती आलेले पीकही अवकाळी पावसाने हिरावून गेल्याने तोंडचा घास हिरावून गेल्याची भावना शेतकऱ्यांच्या मनात झाली आहे.

नाशिकच्या पेठ-सुरगाणा आणि इगतपुरी या भागातील अनेक कुक्कुटपालन करणाऱ्या व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडत असल्याने कुक्कुटपालन करणाऱ्यांचे पक्षी मृत पावले आहेत. काही ठिकाणी शेडचे पत्रेही उडून गेले आहे.

नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये असलेले छोटे-मोठे व्यवसायिकांचं मोठे नुकसान झाले आहे. अनेकांच्या गोठ्याच्या आणि घराचे पत्रे देखील उडून गेले आहेत. काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकाची मोठी अडचण निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

वादळी वाऱ्यासह असलेल्या या पावसामुळे शेतकरी वर्गात भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. अतिवृष्टीमुळे यापूर्वीच पीक हातातून गेलेले असताना आता रब्बीचे पीकही अवकाळी पावसाने भुईसपट केल्याने मायबाप सरकारने मदत करावी अशी आर्त हाक बळीराजा देऊ लागला आहे. त्यामुळे सरकारच्या मदतीकडे शेतकरी वर्गाचे लक्ष लागून आहे.