Dam Water : आनंदी आनंद गडे, राज्यातील धरणांमध्ये सरासरी 77 टक्के पाणीसाठा, पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली, जाणून घ्या विभागनिहाय धरणाची स्थिती

| Updated on: Aug 16, 2022 | 2:18 PM

राज्यात परतीच्या पावसाला सुरवात झाल्यानंतर धरणामध्ये पाणीसाठा होण्यास सुरवात होते. गतवर्षीही परतीच्या पावसामुळे वर्षभर पुरेल एवढे पाणी धरणामध्ये साठले होते. यंदा मात्र, स्थिती बदललेली आहे. जून महिन्याच्या अपवाद वगळतात जुलै आणि आता ऑगस्टमध्येही पावसामध्ये सातत्य राहिल्याने धरणामध्ये पाण्याची आवक ही सुरुच आहे. लघु आणि मध्यम धरणे तर ओव्हरफ्लो झालीच आहेत पण राज्यातील मोठ्या धरणांमध्येही जवळपास 86 टक्के पाणीसाठा झाला आहे.

Dam Water : आनंदी आनंद गडे, राज्यातील धरणांमध्ये सरासरी 77 टक्के पाणीसाठा, पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली, जाणून घ्या विभागनिहाय धरणाची स्थिती
राज्यातील धरणांच्या पाणीपातळीत सरासरीच्या तुलनेत 77 टक्के पाणीसाठा झाला आहे.
Follow us on

मुंबई : हंगामाच्या सुरवातीला (Rain) पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांसह सर्वसान्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. पिकांचे सोडा पण (Drinking Water) पिण्याच्या पाण्याचे कसे होणार अशीच स्थिती जून महिन्यात होती. मात्र, जुलैच्या 1 तारखेपासून मान्सूनने अशी काय हजेरी लावली आहे की, गेल्या दीड महिन्यात राज्यातील सर्वच स्थिती बदलून गेली आहे. सरासरीपेक्षा (Heavy Rain) अधिकचा पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पिके तर पाण्यात आहेतच पण दिवसेंदिवस धरणातील पाणीपातळी वाढ होत असल्याने पुढील वर्षभर पिण्याची पाण्याची चिंता ही मिटली आहे. जूनमध्ये दिलेल्या उघडीपीची कसर जुलैमध्ये वरुणाराजाने भरुन काढली आहे. त्यामुळे राज्यातील धरणांमध्ये तब्बल 77 टक्के पाणीसाठा झाला आहे. पावसाने उसंत घेतली असताना देखील धरणामध्ये आवक ही सुरुच राहिल्याने ही स्थिती ओढावली आहे.

मोठ्या धरणांमध्ये अधिकचा पाणीसाठा

राज्यात परतीच्या पावसाला सुरवात झाल्यानंतर धरणामध्ये पाणीसाठा होण्यास सुरवात होते. गतवर्षीही परतीच्या पावसामुळे वर्षभर पुरेल एवढे पाणी धरणामध्ये साठले होते. यंदा मात्र, स्थिती बदललेली आहे. जून महिन्याच्या अपवाद वगळतात जुलै आणि आता ऑगस्टमध्येही पावसामध्ये सातत्य राहिल्याने धरणामध्ये पाण्याची आवक ही सुरुच आहे. लघु आणि मध्यम धरणे तर ओव्हरफ्लो झालीच आहेत पण राज्यातील मोठ्या धरणांमध्येही जवळपास 86 टक्के पाणीसाठा झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा धरणाची पाणीपातळी ही लवकर वाढली आहे. शिवाय अशीच स्थिती राहिली तर धरणातून नद्यांमध्ये विसर्ग वाढवण्याशिवाय पर्याय उरणार नाही.

गतवर्षीच्या तुलनेत 20 टक्के अधिकचा पाणीसाठा

राज्यात जुलै आणि या महिन्यात चांगला पाऊस पडलाय, त्यामुळे राज्यातील धरणे 77.66 टक्के भरली आहेत. सरासरीच्या तुलनेत कोकण विभागातील धरणामध्ये 89 टक्के पाणीसाठा तर पुणे विभागातील धरणांत 83 टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा आहे. नागपूर विभागात धरणांमध्ये 71.47 टक्के पाणीसाठा आहे. राज्यातील धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा असल्याने, पिण्याच्या पाण्याची आणि काही भागात शेतीच्या पाण्याचीही चिंता मिटली आहे.

विभागनिहाय असा आहे धरणातील पाणीसाठा

विभाग                         धरणातील पाणीसाठा

अमरावती –                   78.81 टक्के

कोकण –                      89.28 टक्के

नागपूर –                      71.47 टक्के

नाशिक –                     71.59 टक्के

पुणे –                           83.93 टक्के

औरंगाबाद –                67.47 टक्के