Rabbi Season | रब्बी पिकांची उगवण होताच किडीचा प्रादुर्भाव, किड व्यवस्थापनासाठी महत्वाची बातमी

| Updated on: Dec 14, 2021 | 2:04 PM

मात्र, रब्बीतील गहू, हरभरा, ज्वारी या मुख्य पिकांची उगवण होताच ढगाळ वातावरणामुळे किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. यापूर्वीच पावसामुळे खरीप हंगामाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. खरिपातील नुकसान रब्बीत भरुन काढण्याचा शेतकऱ्यांचा मानस आहे. पण या हंगामातही निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्यांच्या मुळावर येत आहे.

Rabbi Season | रब्बी पिकांची उगवण होताच किडीचा प्रादुर्भाव, किड व्यवस्थापनासाठी महत्वाची बातमी
रब्बी हंगामात हरभरा क्षेत्रात वाढ झाली असली तरी शेतकऱ्यांना आता हमीभाव केंद्राचा आधार मिळणार आहे.
Follow us on

लातूर : यंदा पावसामुळे (Rabi season) रब्बी हंगामातील पेरण्या ह्या लांबणीवर पडलेल्या आहेत. आता कुठे सरासरीएवढा पेरा मराठवाड्यात झाला आहे. मात्र, रब्बीतील गहू, हरभरा, ज्वारी या मुख्य पिकांची उगवण होताच ढगाळ वातावरणामुळे किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. यापूर्वीच पावसामुळे खरीप हंगामाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. (Kharif Season) खरिपातील नुकसान रब्बीत भरुन काढण्याचा शेतकऱ्यांचा मानस आहे. पण या हंगामातही निसर्गाचा लहरीपणा (Farmer) शेतकऱ्यांच्या मुळावर येत आहे. गहू वगळता सर्व पिकांच्या पेरण्या ह्या सरासरी क्षेत्रावर झाल्या असतानाच उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील तब्बल 26 हजार हेक्टरावरील पिके ही धोक्यात आहेत. त्यामुळेच कृषी अधिकाऱ्यांना थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे लागत आहे.

पिकनिहाय असा आहे किडीचा प्रादुर्भाव

यंदा उशिरा का होईना पण सरासरीपेक्षा अधिकच्या क्षेत्रावर रब्बीचा पेरा झाला आहे. यामध्ये शेतकऱ्यांनी हरभऱ्यावर अधिकचा भर दिला आहे. पण हऱभरा या पिकावर घाटीअळीचा प्रादुर्भाव हा वाढत आहे. सध्या मराठवाड्यात ढगाळ वातावरण असल्याने पिकांवरील रोगराई वाढत आहे. ज्वारी व मका या पिकांवर लष्करी अळीचे प्रमाण वाढत आहे. सध्याचे वातावरण हे पिक वाढीसाठी नाही पिकांवर अळी वाढण्यासाठी पोषक आहे. गहू या पिकावर तांबोरा रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. सध्या पिकांची उगवण झाली असून ऐन पिक बहरात येण्याच्या मोसमातच ढगाळ वातावरणाचा परिणाम पिकांवर होत आहे.

असे करा पिकांवरील अळींचे नियंत्रण

हरभरा पिकाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे पण या पिकावर घाटी अळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी 5 टक्के निंबोळी अर्क, एकरी 2 कामगंध सापळे व 20 पक्षा थांबे बसवावे लागणार आहेत. शिवाय अळीचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात असल्यास इमामेक्टीन बेंझोएट 5 टक्के 4 ग्रॅम क्विनॅालफास हे 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करणे गरजेचे आहे.
ज्वारी व मका
मका व ज्वारीवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. या अळीच्या नियंत्रणासाठी सुरवातीच्या अवस्थेत 5 टक्के निंबोळी अर्क, इमामेक्टीन बेंझोएट 4 ग्रॅम व 5 मिली लॅम्बडा सायहॅालोथ्रीन 9.5 झेड सी किंवा स्पिनेटोरम 4 मिली हे 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी लागणार आहे.

फवारणी करताना ही घ्या काळजी

फवारणी करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी कृषी सहायकांचे मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे. अन्यथा महागडी औषधे खरेदी करुनही उपयोग होणार नाही. शिवाय प्रत्यक्ष पीक पाहणी करुन शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करता येते त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी सहायकांच्या संपर्कात असणे आवश्यक आहे. शिवाय 50 टक्के अनुदानावर किटकनाशकांची मागणी कृषी कार्यालयांनी केली असून त्याचा देखील लाभ शेतकऱ्यांना होणार आहे.

संबंधित बातम्या :

ढगाळ वातावरणाचा दुहेरी फटका, कांद्यावर बुरशी अन् बिजोत्पादनही अडचणीत, काय आहे पर्याय

Marathwada | 4 हजार रुपये क्विंटलच बेणं अन् 700 रुपये अद्रकला दर, सांगा शेती करायची कशी?

द्राक्ष बाग जोपासण्यासाठी सोनं गहाण ठेवलं, पण अवकाळीमुळं सर्वकाही पाण्यात गेलं