Marathwada : उन्हाळी हंगामात 50 टक्के क्षेत्रावर सोयाबीन, अंतिम टप्प्यात अवस्था काय?

| Updated on: Apr 29, 2022 | 3:43 PM

मुळात उन्हाळी हंगामात काही निवडक पिकांवरच शेतकऱ्यांचा भर असतो. पण यंदा परस्थिती बदलली असून तब्बल 98 हजार हेक्टरावर उन्हाळी पीके घेण्यात आली आहेत. यामध्ये सोयाबीन सर्वाधिक म्हणजे 36 हजार 390 हेक्टरावर आहे. औरंगाबाद विभागात 12 हजार 137 हेक्टर तर लातूर विभागातील जिल्ह्यांमध्ये 24 हजार 253 हेक्टरावर सोयाबीन या पिकाचा समावेश आहे.

Marathwada : उन्हाळी हंगामात 50 टक्के क्षेत्रावर सोयाबीन, अंतिम टप्प्यात अवस्था काय?
यंदा उन्हाळी हंगामात एकूण क्षेत्रापैकी 50 टक्के क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा आहे.
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

औरंगाबाद: यंदा प्रथमच खरिपातील सोयाबीनची काढणी झाली की, (Summer Season) उन्हाळ्यातही सोयाबीन शेतशिवारात बहरताना दिसत आहे. खरिपातील नुकसान भरुन काढण्यासाठी हे पाऊल उचलले असून सध्या इतर पिकांच्या तुलनेत 50 टक्के क्षेत्रावर (Soybean Crop) सोयाबीन बहरले आहे. (Agricultural Department) कृषी विभागाचा सल्ला आणि पोषक वातावरणामुळे शेतकऱ्यांनी हे पाऊल उचलले असले तरी हंगामाच्या अंतिम टप्प्यात पाणीटंचाई भासत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादनवाढीचा उद्देश साध्य होणार की नाही याबबत साशंका उपस्थित झाली आहे. वाढते तापमानामुळे गेल्या 15 दिवसांतच जलस्त्रोतांनी तळ गाठला आहे. शिवाय सोयाबीन हे पावसाळी पीक असल्याने सातत्याने पाण्याला येत आहे. आता तर शेंग लागण्याच्या अवस्थेत हे पीक असून पाण्याची गरज असताना पीक जोपासण्यासाठी शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

पाण्याच्या उपलब्धतेमुळे बदलले चित्र

मराठवाड्यातील बहुतांशी भाग तसा दुष्काळीच. त्यामुळे केवळ हंगामी पिकावरच शेतकऱ्यांचा भर असतो. मात्र, गेल्या 2 वर्षापासून चित्र बदलले आहे. सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस होत आहे. शिवाय जलसाठे हे तुडूंब असल्याने शेतकऱ्यांना पीक पध्दतीमध्ये बदल करणे सहज शक्य झाले आहे. त्यामुळेच यंदा तीनही हंगामातील पिके घेणे शक्य झाले आहे. साधारण: भुईमूग, सुर्यफूल, तीळ, बादरी, मका, ज्वारी अशी पिके उन्हाळ्यात घेतली जात होती. यंदा मात्र, पाण्याच्या उपलब्धतेमुळे शिवारात सोयाबीनचे क्षेत्र वाढले आहे. नगदी व कमी खर्चात सोयाबीन घेता येते. त्यामुळे शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीनवर भऱ दिला आहे. शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन मिळेल असा विश्वास आहे.

36 हजार हेक्टरावर सोयाबीन

मुळात उन्हाळी हंगामात काही निवडक पिकांवरच शेतकऱ्यांचा भर असतो. पण यंदा परस्थिती बदलली असून तब्बल 98 हजार हेक्टरावर उन्हाळी पीके घेण्यात आली आहेत. यामध्ये सोयाबीन सर्वाधिक म्हणजे 36 हजार 390 हेक्टरावर आहे. औरंगाबाद विभागात 12 हजार 137 हेक्टर तर लातूर विभागातील जिल्ह्यांमध्ये 24 हजार 253 हेक्टरावर सोयाबीन या पिकाचा समावेश आहे. शिवाय या सोयाबीनचा उपयोग आता खरिपातील पेरणीत बियाणे म्हणून केला जात असल्याने शेतकऱ्यांना वाढीव दरही मिळत आहे.

हंगामाच्या अंतिम टप्प्यात अशी घ्या काळजी

सध्या उन्हाळी हंगामातील सोयाबीन हे अंतिम टप्प्यात आहे. शेंगा भरण्याच्या अवस्थेत असतानाच जलस्त्रोतांची पाणीपातळी ही खलावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचे नियोजन करुनच पीक जोपासावे लागणार आहे. दिवसा कडाक्याचे ऊन असल्याने शेतकऱ्यांनी शक्यतो रात्रीतूनच पाणी द्यावे, तसेच पाण्याची नासाडी न करता किमान अंतिम टप्प्यापर्यंत पाणी कसे पुरविता येईल याचे नियोजन करावे लागणार आहे. आतापर्यंतच्या सोयाबीनची अवस्था ही उत्तम असून अजून 15 दिवस जोपासणा केली तर अपेक्षित उत्पादन शेतकऱ्यांच्या पदरी पडणार असल्याचे कृषीतज्ञ रामेश्वर चांडक यांनी सांगितले आहे.