आता निर्णायक टप्पा, सोयबीन ठेवायचे की विकायचे ! बाजारपेठेतले वास्तव काय ?

| Updated on: Jan 04, 2022 | 1:59 PM

गेल्या चार दिवसांपासून सोयाबीनला चांगला दरही मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची भूमिका काय राहणार यावरच सर्वकाही अवलंबून राहणार आहे. पण दर वाढले असले तरी भविष्यातील मार्केटचा अभ्यास करुन शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री ही टप्प्याटप्प्यानेच केली तर फायद्याचे राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

आता निर्णायक टप्पा, सोयबीन ठेवायचे की विकायचे ! बाजारपेठेतले वास्तव काय ?
सोयाबीन संग्रहीत छायाचित्र
Follow us on

लातूर : खरीप हंगामातील पीके अंतिम टप्प्यात असली तरी शेतकऱ्यांकडे निम्म्य़ापेक्षा अधिकचे सोयाबीन हे साठवून ठेवलेले आहे. अधिकच्या दराच्या अनुशंगाने शेतकऱ्यांनी कायम सावध भूमिका घेतलेली आहे. आता हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात आणि उन्हाळी सोयाबीन बाजारपेठेत येण्यापूर्वी आता साठवलेल्या सोयाबीनचे काय करायचे हा निर्णय शेतकऱ्यांना घ्यावा लागणार आहे. शिवाय गेल्या चार दिवसांपासून सोयाबीनला चांगला दरही मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची भूमिका काय राहणार यावरच सर्वकाही अवलंबून राहणार आहे. पण दर वाढले असले तरी भविष्यातील मार्केटचा अभ्यास करुन शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री ही टप्प्याटप्प्यानेच केली तर फायद्याचे राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे शेतकरी मिळालेल्या दरात सोयाबीनची विक्री करणार का पुन्हा साठवणूकीवर भर देणार हे पहावे लागणार आहे.

सोयाबीनचे दर स्थिर आवक मात्र वाढली

मराठवाड्यात लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केवळ जिल्ह्यातूनच नाही तर मराठवाड्यातून सोयाबीन विक्रीसाठी दाखल होते. उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती तर आहेच शिवाय येथे प्रक्रिया उद्योगही असल्याने मोठ्या प्रमाणात मागणी राहते. गेल्या दोन दिवसापासून सोयाबीनला 6 हजार 300 रुपये दर मिळत आहे. गतआठवड्यापेक्षा दरात सुधारणा झाली आहे. त्यामुळे आवकवरही परिणाम झालेला आहे. येथील बाजार समितीमध्ये 16 हजार पोत्यांची आवक ही मंगळवारी झाली आहे. त्यामुळे वाढत्या दराबरोबर सोयाबाीन विक्रीवरही शेतकऱ्यांचा भर आहेच.

काय आहे कृषीतज्ञांचा शेतकऱ्यांना सल्ला?

गेल्या चार महिन्यातील सोयाबीन बाजारपेठेचा विचार केला तर दरात कायम चढ-उतार हा राहिलेलाच आहे. पण शेतकऱ्यांनी मार्केटचा अभ्यास करुन विक्रीपेक्षा साठवणूकीवर भर दिल्याने दर हे कायम राहिलेले आहेत. अद्यापही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोयाबीनची मागणी वाढत आहे. शिवाय दुसरीकडे अवघ्या काही दिवसांमध्येच उन्हाळी सोयाबीनही बाजारपेठेत दाखल होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या दोन्ही शक्यतामुळे शेतकऱ्यांनी टप्प्यटप्प्याने सोयाबीनची विक्री केली तर ते फायद्याचे राहणार असल्याचे कृषितज्ञ रामेश्वर चांडक यांनी सांगितलेले आहे. दर कमी-अधिक झाले तरी त्याचा अधिकचा फटका बसू नये असे नियोजन शेतकऱ्यांनी करणे गरजेचे आहे.

इतर शेतीमालाचे कसे आहेत दर

लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुपारी 12 च्या दरम्यान शेतीमालाचे सौदे होतात. मंगळवारी लाल तूर- 6325 रुपये क्विंटल, पांढरी तूर 6000 रुपये क्विंटल, पिंकू तूर 6541 रुपये क्विंटल, जानकी चना 4725 रुपये क्विंटल, विजय चणा 4650:, चना मिल 4400, सोयाबीन 6413, चमकी मूग 6700, मिल मूग 6000 तर उडीदाचा दर 7000 एवढा राहिला होता.

संबंधित बातम्या :

KISAN CREDIT CARD : केंद्र सरकारच्या योजनेत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा सर्वाधिक सहभाग, असे मिळवा किसान क्रेडीट कार्ड

महाबीजचा मोठा निर्णय : राज्यभरातील बिजोत्पादक बियाणांच्या दरावर काढला तोडगा, बोनसचाही लाभ

Vineyard : अवकाळी, डाऊनी मिल्डयु नंतर आता द्राक्ष बागायतदारांसमोर नवेच संकट, काय आहे उपाययोजना ?