Amravati Farmer : संत्रा उत्पादकांचे नुकसान दरवर्षीचेच, भरपाईसाठी 4 वर्षापासून शेतकऱ्यांची पायपीट

| Updated on: Aug 13, 2022 | 2:24 PM

नैसर्गिकरित्या पिकांचे नुकसान झाले तर त्याची भरपाई ही मिळतेच. त्याअनुशंगाने कृषी विभागाकडून पंचनामेही केले जातात. पंचनाम्यांच्या आधारवर मदतीचे निकष ठरतात आणि त्या मंडळात झालेल्या नुकासनीच्या आधारे शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट ही रक्कम जमा केली जाते. गेल्या 4 वर्षात ही संपूर्ण प्रक्रिया होते पण प्रत्यक्ष शेतकऱ्यांना एक नया पैसाही मिळालेला नाही.

Amravati Farmer : संत्रा उत्पादकांचे नुकसान दरवर्षीचेच, भरपाईसाठी 4 वर्षापासून शेतकऱ्यांची पायपीट
अमरावतीमध्ये संत्रा फळाचे नुकसान होत असून भरपाईकडे दुर्लक्ष होत आहे.
Follow us on

अमरावती : दरवर्षी कोणत्या ना कोणत्या रुपाने (Farmer) शेतकऱ्यांचे नुकसान हे ठरलेले आहे. गेल्या दोन वर्षापासून अधिकच्या पावसामुळे हंगामी पिकांसह फळबागा देखील पाण्यात अशी स्थिती आहे. तर त्यापुर्वी पाण्याअभावी (Orchards in danger) फळबागा धोक्यात होत्या. त्यामुळे पाऊस पडला काय आणि नाही काय एकच स्थिती अशी शेतकऱ्यांची भावना झाली आहे. नुकसान होताच लोकप्रतिनिधींकडून पाहणी, पुन्हा पंचनामे हे सर्वकाही होते पण प्रत्यक्षात भरपाई मात्र, शेतकऱ्यांच्या पदरात पडत नाही. हे केवळ यंदाचेच आहे असे नाही तर गेल्या 4 वर्षापासून (Orange Growers) अमरावती जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची स्थिती आहे. केवळ कागदोपत्री दाखले देत भरपाईचे आश्वासन दिले जाते पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरी काहीच पडलेले नाही. फळ उत्पादकांची ही अवस्था तर हंगामी पीके घेणाऱ्यांचे काय असा सवाल उपस्थित होत आहे.

पंचनामे करुनही भरपाईसाठी प्रतिक्षाच

नैसर्गिकरित्या पिकांचे नुकसान झाले तर त्याची भरपाई ही मिळतेच. त्याअनुशंगाने कृषी विभागाकडून पंचनामेही केले जातात. पंचनाम्यांच्या आधारवर मदतीचे निकष ठरतात आणि त्या मंडळात झालेल्या नुकासनीच्या आधारे शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट ही रक्कम जमा केली जाते. गेल्या 4 वर्षात ही संपूर्ण प्रक्रिया होते पण प्रत्यक्ष शेतकऱ्यांना एक नया पैसाही मिळालेला नाही. पंचनामे झाले की मदत स्वरुपात रक्कम पदरी पडेल अशी आशा शेतकऱ्यांना राहते पण प्रशासनाने शेतकऱ्यांची थट्टाच सुरु केल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.

संत्रा उत्पादकांचे मोठे नुकसान

उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांनी पीक पद्धतीमध्ये बदल करुन संत्रा या फळाची लागवड केली होती. जिल्ह्यातील पोषक वातावरण आणि मागणी पाहता शेतकऱ्यांनी हे धाडस केले पण निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्यांसाठी अडचणीचा मुद्दा ठरत आहे. गेल्या चार वर्षापासून नुकसान हे ठरलेले आहे. दोन वर्षापूर्वी पाण्याअभावी संत्रा फळबागा ह्या करपल्या जात होत्या तर आता अधिकच्या पावसाने फळगळतीचा धोका कायम जाणवत आहे. फळबागेतून उत्पादन वाढेल अशी आशा शेतकऱ्यांना होती पण आता हंगामी पिकेच बरी असे म्हणण्याची वेळ आली आहे.

संत्रा क्षेत्रावर पुन्हा कापूस

संत्रा बागेला वर्षाकाठी लाखो रुपये खर्ची करुन उत्पादनच पदरी पडत नसल्याने उसळगव्हानचे शेतकरी हताश झाले होते. उत्पन्न वाढीचा उद्देश राहिला बाजूला पण त्यापेक्षा अधिकचे नुकसानच होऊ लागले. त्यामुळे पीक पद्धतीमध्ये केलेला बदल हा परवडणारा नाही असे म्हणत या भागातील शेतकऱ्यांच्या खरीप हंगामापासून पुन्हा कापूस लागवडीवर भर दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रयत्नांना शासनाचीही मदत तेवढीच गरजेची आहे.