Nanded : शेती मशागतीची कामे अंतिम टप्प्यात, शेतकरी साधणार का पेरणीचे मुहूर्त

| Updated on: Jun 06, 2022 | 10:07 AM

खरीप हंगामावरच शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून असते. त्यामुळे वेळेत पेरणी करुन अपेक्षित उत्पादन पदरात पाडून घेण्यासाठी पेरणीच्या पूर्वीपासून शेतकरी कामाला लागलेला आहे. उत्पादनवाढीसाठी खरीपपूर्व मशागत ही महत्वाची मानली जाते. काळाच्या ओघात ही कामेही ट्रॅक्टरच्या माध्यमातून आटोपून घेतली जात होती. पण इंधन दरवाढीमुळे सर्वच प्रकारच्या मशागतीसाठी अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांनी सर्जा-राजाच्या मदतीनेच ही कामे पूर्ण केली आहेत.

Nanded : शेती मशागतीची कामे अंतिम टप्प्यात, शेतकरी साधणार का पेरणीचे मुहूर्त
पेरणीचा मुहूर्त साधण्यासाठी नांदेडमध्ये मशागतीचे कामे केली जात आहेत.
Follow us on

नांदेड : यंदा (Monsoon) मान्सून वेळेपूर्वीच दाखल होणार असल्याने शेतकऱ्यांनी भर (Summer Season) उन्हाळ्यात शेती मशागतीला सुरवात केली होती. रब्बी हंगामातील पिकांचा काढणी होताच शेतकऱ्यांनी (Increase Production) उत्पादनवाढीसाठी गरजेच्या असलेल्या कामावर लक्ष केंद्रीत केले होते. काळाच्या ओघात शेती कामात बदल झाला असून बैलजोडीची जागा आता ट्रक्टर आणि इतर यंत्रांनी घेतली आहे. मात्र, वाढत्या इंधन दरामुळे यंत्राच्या सहाय्याने शेती मशागत करणे शक्य नाही. त्यामुळे जुनं तेच सोनं म्हणत शेतकऱ्यांनी बैलजोडीच्या माध्यमातून शेती मशागतीच्या कामांना प्राधान्य दिले आहे. नांगरण, मोगडण आणि आता कोळपणी पूर्ण झाल्यानंतर शेतकरी हे चाढ्यावर मूठ ठेवत असतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी यंदा मृगाचे मुहूर्त साधणार की नाही अशी शंका आहे.

रखरखत्या उन्हामध्ये मशागतीची कामे

खरीप हंगामावरच शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून असते. त्यामुळे वेळेत पेरणी करुन अपेक्षित उत्पादन पदरात पाडून घेण्यासाठी पेरणीच्या पूर्वीपासून शेतकरी कामाला लागलेला आहे. उत्पादनवाढीसाठी खरीपपूर्व मशागत ही महत्वाची मानली जाते. काळाच्या ओघात ही कामेही ट्रॅक्टरच्या माध्यमातून आटोपून घेतली जात होती. पण इंधन दरवाढीमुळे सर्वच प्रकारच्या मशागतीसाठी अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांनी सर्जा-राजाच्या मदतीनेच ही कामे पूर्ण केली आहेत. शिवाय यंदा उन्हाचा पारा 42 अंशावर असतानाही शेतकऱ्यांनी त्याची तमा न करता मशागत उरकून घेतली आहे.

मृगा नक्षत्रात चाढ्यावर मूठ

खरीप हंगामातील पिकांची वाढ आणि अपेक्षित उत्पादनासाठी वेळेत पेऱण्या होणे महत्वाचे मानले जाते. खरिपाची पेरणी हा धावून करावी असे म्हणतात. म्हणजेच अपेक्षित पाऊस झाला की शेतकऱ्यांची मूठ ही चाढ्यावर असणे गरजेचे आहे. त्यामुळे पाऊस पडल्यानंतर दिरंगाई होऊ नये म्हणून शेतकरी हंगामाच्या पूर्वीपासूनच कामाला लागला आहे. सध्या खरीपपूर्व मशागतीची कामे अंतिम टप्प्यात असून शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागलेले आहेत.

हे सुद्धा वाचा

काय आहे कृषितज्ञांचा सल्ला?

पाऊस झाला की लागलीच शेतकरी पेरणीची गडबड करतात. मात्र, मशागतीच्या कामानंतर आणि पेरणीपूर्वी 100 मिमी पाऊस झाला तरच शेतकऱ्यांनी पेरणी कामे करावेत अन्यथा पावसाची वाट पाहावी. सुरवातीला पाऊस झाला की पुन्हा ओढा दिली जाते. शिवाय हे दरवर्षीचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी 100 मिमी पाऊस आणि पेरणीपूर्वी कृषी सहाय्यक किंवा मंडळ कृषी अधिकारी यांचा सल्ला घेऊन पेरणी करणे फायद्याचे ठरणार आहे. त्यामुळे पावासाने उशिर केला असला तरी योग्य प्रमाणात पाऊस झाल्याशिवाय पेरणीला सुरवातच करु नये असा सल्ला कृषितज्ञ रामेश्वर चांडक यांनी दिला आहे.