मुंबई : लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवस उरले आहेत. निवडणुका जाहीर झाल्या, त्या दिवसापासूनच आचारसंहिता लागू झाल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या पथकांनी आचारसंहिता लागू झाल्यापासून 31 मार्चपर्यंत 300 कोटींची रोकड जप्त केली आहे. निवडणुकांमध्ये पैशांचा गैरवापर होत असल्याच्या अनेक घटना याआधी उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे निवडणुकीदरम्यान 50 हजार जास्त रक्कम स्वत: जवळ बाळगल्यास निवडणूक आयोगाकडून कारवाई केली जाते. पण या कारणामुळे व्यापारीवर्गाचे मोठे नुकसान होत आहे. याबाबत व्यापारी वर्गाने निवडणूक आयोगावर नाराजी व्यक्त केली होती. यावर नुकतंच निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिलं आहे.
निवडणूक आयोगाने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, कोणतीही व्यक्ती 50 हजार किंवा त्याहून कमी रक्कम स्वत: जवळ बाळगू शकते. मात्र 50 हजारपेक्षा जास्त रक्कम असल्यास तुमच्यासोबत ही तीन कागदपत्र पुरावा म्हणून असणे गरजेचं आहे.
तीन कागदपत्र कोणती?
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, 50 हजारपेक्षा जास्त रक्कम असणाऱ्या सर्वसामान्य लोकांपासून व्यापारी वर्गापर्यंत सर्वांकडे हे तिन्ही कागदपत्र असणे गरजेचं आहे. कारण याद्वारे निवडणूक आयोगाला त्याचा वापर नेमका कुठे होणार आहे, याची कायदेशीर माहिती मिळू शकेल. त्यासाठी बँकेची पैसे काढल्याची पावती आणि व्यापाराची पावती असणे गरजेचं असणार आहे. दरम्यान निवडणूक आयोगाने दागिन्यांवर मात्र कोणतीही कारवाई होणार नाही असे स्पष्ट केलं आहे.
पाहा व्हिडीओ: