विमाधारकांसाठी महत्वाची बातमी… ‘क्लेम सेटलमेंट’मधील कटकट होणार कमी, वाचा सविस्तर

| Updated on: Apr 13, 2022 | 10:14 PM

कुठल्याही कंपनीचा विमा घेताना आपण विम्याची संपूर्ण माहिती जाणून घेत असतो. परंतु असे अनेकदा होते; विमा देताना संबंधित कंपनीचा प्रतिनिधी बोलताना एक माहिती देता अन्‌ प्रत्यक्षात मात्र विम्याच्या अटी भलत्याच असतात. IRDAI च्या वार्षिक रिपोर्टनुसार, 2020-21 मध्ये दर एक हजार विम्याच्या केसस्‌मध्ये 36 विमा मिस सेलिंगमध्ये आढळले आहेत.

विमाधारकांसाठी महत्वाची बातमी... ‘क्लेम सेटलमेंट’मधील कटकट होणार कमी, वाचा सविस्तर
Image Credit source: टीव्ही9
Follow us on

विमाधारकांच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी विमा विनियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) आता ‘अ‍ॅक्शन मोड’वर आले आहे. विमाधारकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी प्राधिकरणाकडून आता आपल्या कार्यवाहीला वेग देण्यात येणार आहे. रेग्युलेटरी बॉडी, डेटा एनालिटिक्स टूल्स (Data analytics tools) सारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करुन आपल्या तक्रार निवारण केंद्राच्या कामगिरीत सुधारणा करण्याचे नियोजन प्राधिकरणाकडून करण्यात येत आहेत. विमा विनियामक आणि विकास प्राधिकरणाकडून यासाठी एक सिस्टीम तयार करण्यात येत आहे. ज्याचा मुख्य उद्देश हा विमाधारकांच्या तक्रारींचे निवारण करणे हा असणार आहे. विमा देताना मिस सेलिंग (miss selling policy) व क्लेम सेटलमेंटच्या तक्रारी कमी करण्यासाठी हे अधिक मजबुतीने काम करणार आहे.

दरम्यान, कुठलाही विमा खरेदी करताना आपण त्याचा ‘क्लेम सेटलमेंट रेशो’ बघत असतो. आपण एखादी विमा घेतल्यानंतर जेव्हा ‘क्लेम सेटलमेंट’ची वेळ येते तेव्हा विमाधारक किंवा त्याच्या कुटुंबीयांना अनेक वेळा नाहक मनस्ताप सहन करावा लागत असतो. विमा खरेदी करताना वेगळ्या गोष्टी सांगितल्या जात असतात, परंतु प्रत्यक्षात विम्याच्या अटी काही वेगळ्याच असतात. अशा वेळी प्रकरण अधिक गुंतागुंतीचे ठरत असते. त्यामुळे प्राधिकरणाने ही प्रक्रिया अधिक पारदर्शक व सुटसुटीत व्हावी, यासाठी आपल्या तक्रार निवारण केंद्रात अनेक बदल केले आहेत.

अशी नोंदवा तक्रार

विमाधारक IRDAI च्या इंटीग्रेड ग्रीवांस मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजेच IGMS मध्ये आपली तक्रार नोंदवू शकतात. किंवा विमाधारक सरळ IRDAI कार्यालयातदेखील संपर्क साधू शकतात. IRDAI चे देबाशीष पांडा यांनी सांगितले, की IGMS आणि IRDAI च्या कार्यालयांमध्ये खूप तक्रारी येत आहेत. त्यामुळे या तक्रार निवारणासाठी सशक्त अशी यंत्रणा तयार करण्यात येणार आहे; तसेच डेटा एनालिटिक्सच्या माध्यमातून विमामधील ज्या अटींमुळे तक्रारी येत आहे अशा अटींची पडताळणी करण्यासही यातून मदत होणार आहे. एकदा विम्यामधील सर्व अटींची योग्य तपासणी झाल्यावर IRDAI किंवा इंशोरन्स इंडस्ट्री त्या अटींना बदलण्याचा विचार करु शकते, असेही पांडा यांनी सांगितले.

2020-21 मध्ये 2.8 कोटी विम्यांची विक्री

अनेक तक्रारी असल्या तरी IRDAI विमाधारकांचा विश्‍वास संपादन करण्यासाठी प्रयत्नशिल आहे. IRDAI भारतमधील इंशोरन्स आणि रि-इंशोरन्सच्या रेग्युलेशन आणि लायसेंसिंगचे काम करते. त्याच प्रमाणे IRDAI ने एखादी सूचना केल्यास ती ऐकणे संबंधित कंपनीला बंधनकारक असते. IRDAI च्या एका रिपोर्टनुसार, 2020-21 साली विमा कंपन्यांनी एकूण 2.8 कोटी विम्यांची विक्री केली आहे.